Monday, 10 December 2012

मानवी हक्काचे उल्लंघन होऊ नये म्हणून अधिकारी / कर्मचा-यांनी दक्षता घ्यावी - श्री. आत्माराम जाधव


             जळगांव, दि. 10 :- मानवी हक्कांचे उल्लंघन होणा-या घटना घडू नयेत म्हणून अधिकारी / कर्मचारी यांनी दक्षता घावी  तसेच सदरच्या घटना घडल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करुन आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचचे उपाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात मानवी हक्क दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
            यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी के. सी. निकम, उपजिल्हाधिकारी स्वाती थवील, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत आदिसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
            श्री. जाधव पुढे म्हणाले की, देशात बाल कामगार व महिलांचे प्रश्न गंभीर स्वरुप धारण करत असून महिलांच्या प्रश्नासंबंधी त्यांच्यात जागृत होणे आवश्यक आहे. तसेच मुलांना लहान वयात बाल कामगार म्हणून काम करावे लागत आहे. त्या पासून मुक्ती करिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून बाल कामगार वाचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
            मानवी हक्का संबंधी असलेले ज्ञान लोकांनी इतरांसाठी ही वापरणे आवश्यक आहे. त्यातून सर्व सामान्य नागरिकांमध्ये आपल्या अधिकारांप्रती जागृती घडेल, असे श्री. जाधव यांनी सांगितले. तसेच राज्य घटनेत बालक, महिला, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आदिंना देण्यात आलेल्या अधिकाराची अंमलबजावणी योग्य पध्दतीने व्हावी असे त्यांनी म्हटले.
            प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. निकम यांनी श्री. जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले  व आभार उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी मानले.                                                     

No comments:

Post a Comment