Tuesday, 20 November 2012

सैन्य भरती मेळाव्याकरिता प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर



          जळगांव, दि. 20 :-  जिल्हयात दि. 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2012 या कालावधीत पोलिस परेड ग्राऊंड व स्पोर्ट स्टेडियम येथे सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून सदरच्या मेळाव्याकरिता प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली. ते आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सैन्य भरतीबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.
            यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एस. जयकुमार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी   कॅ. मोहन कुलकर्णी, सुभेदार मेजर स्वर्णसिंह, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) साजीद  पठाण, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरीनाथ पवार, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अनिकेत भारती, क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, करमणूक कर अधिकारी शेलार, जळगांव तहसिलदार कैलास देवरे आदि उपस्थित होते.
            जळगांव शहरात भरती कालावधीत धुळे, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी, जळगांव, बुलढाणा व औरंगाबाद आदि 9 जिल्हयातून सुमारे 50 -60 हजार उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या ठिकाणी गोंधळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली. त्याप्रमाणेच क्रीडा विभाग, सैनिक कल्याण, मनपा, महसूल व पोलिस विभागातील सर्व अधिका-यांनी परस्परात समन्वय ठेवून भरती मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
            पोलिस अधिक्षक एस. जयकुमार यांनी भरतीकरिता इतर जिल्हयातून येणा-या उमेदवारांनी शांतता पाळून भरतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. तसेच रहदारीचे नियम पाळावेत व कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन केले आहे. पोलिस विभागाकडून शहरात येणा-या गर्दीवर नियंत्रण ठेवून भरती यशस्वी पार पाडली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
             सेना भरती कार्यालयाचे अस्सिटंट रिक्रुटींग ऑफिसर स्वर्ण सिंह म्हणाले की, भरती कालावधीत इच्छूक उमेदवारांनी आप – आपले शैक्षणिक पात्रतेसंबंधी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर पहाटे 3 ते सकाळी 7 वाजेपर्यत उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी 7 नंतर आलेल्या उमेदवाराला मैदानात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी वरील नऊ जिल्हयातील उमेदवार सैन्य  दलातील  सोल्जर जी. डी. टेक्नीकल, सोल्जर जी. डी. महार, ट्रेसमन, सोल्जर क्लार्क, नर्सिग सहाययक आदि पदासाठी निवडले जाणार आहेत. त्यातील सोल्जर जी . डी. टेक्नीकल, सोल्जर जी. डी. महार पदाकरिता 30 नोव्हेंबर रोजी ( धुळे व नंदुरबार), 1 डिसेंबर  (हिंगोली , नांदेड ), 2 डिसेंबर ( जालना, परभणी ), 3 डिसेंबर (जळगांव), 4 डिसेंबर ( बुलढाण ), 7 डिसेंबर (औरंगाबाद) आदि जिल्यांची भरती प्रक्रिया संपन्न होणार असल्याचे श्री. सिंह यांनी सांगितले.
तर दिनांक 7 डिसेंबर रोजी वरील सर्व नऊ जिल्हयातील उमेदवारांची ट्रेडसमन पदाकरिता चाचणी होईल. त्याप्रमाणेच 8 डिसेंबर रोजी सर्व जिल्हयातील उमेदवारांकरिता सोल्जर कलार्क, सोल्जर टेक्नीकल, नर्सिग सहाययक आदि पदांची भरती प्रक्रिया होणार आहे.  आणि शेवटी 9 डिसेंबर रोजी वरील नऊ  जिल्हयातील सैनिक, माजी सैनिक युधदामध्ये वारलेले त्यांचे मुले, एन. सी. सी., नॅशनल खेळाडू करिता वरील दिलेल्या सर्व पदाकरिता भरती प्रक्रिया संपन्न होणार असून  दिनांक 5 डिसेंबर रोजी मेडीकल फिटनेस टेस्ट घेण्यात येईल. अशी माहिती अस्टिंट रिक्रुटींग ऑफिसर स्वर्ण सिंह यांनी बैठकीत दिली.
            मैदानाची पाहणी
            बैठकीनंतर जळगांव उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरीनाथ पवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी, मेजर सुभेदार स्वर्ण सिंह, देवेद्र राणा आदिनी पोलिस परेड ग्राऊंड व स्पोर्ट स्टेडियमची पाहणी केली व तेथे प्रशासनाकडून भरतीकरिता देण्यात    येणा-या सोयी – सुविधांची माहिती सेना कार्यालयातील अधिका-यांना देण्यात आली. यावेळी प्रशासनाने केलेल्या सैन्य भरतीच्या तयारीबाबत सदरच्या अधिका-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment