Monday, 12 November 2012

कापूस खरेदी केंद्राचा ना. देवकर यांच्या हस्ते शुभारंभ

 कापूस खरेदी केंद्राचा ना. देवकर यांच्या हस्ते शुभारंभ

             जळगांव दिनांक 12:-  शेतकरी हा अर्थ व्यवस्थेतील प्रमुख घटक असून तो बळकट झाल्यावर अर्थ व्यवस्था बळकट होते. शेतक-यांच्या शेतमालास आधारभाव घोषीत करुन त्याची खरेदी शासनामार्फत केल्यास खाजगी व्यापा-यांकडून होणारी शेतक-यांची अडवणूक थांबू शकते. यासाठी कापूस खरेदी केंद्र सुरु केली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री श्री. गुलाबराव देवकर यांनी आज येथे केले त्यांच्या हस्ते आव्हाणे येथील कापूस खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन  ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर पणनमहासंघाच्या संचालिका श्रीमती उषाताई शिंदे , ॲड. रविंद्रभैय्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रावसाहेब पाटील , जळगांव पंचायत समितीचे उपसभापती विजय नारखेडे, विनोद तराळ, मंगलाताई पाटील, वाल्मीक पाटील, विलास पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
            श्री. देवकर पुढे म्हणाले शासनाने कापसासाठी 3850 रुपये भाव जाहीर केलेला आहे. विविध वाणासाठी गुणवत्तेनुसार दर राहाणार असून संकर कापसासाठी कमीत कमी 3850 रुपये भाव प्रति क्विटंल आहे. घोषित भावापेक्षा कमी किंमतीत व्यापारी शेतक-यांकडून कापूस घेणार नाही. व्यापा-यांमध्ये स्पर्धा निर्माण होवून अधिका अधिक भाव शेतक-यांना मिळेल निर्यात सुरु होणार असल्याचे सूतोवाच देखील देवकर यांनी केले. गिरणा नदी पात्रात सात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे घेण्यात आले असल्याचे ही त्यांनी  सांगितले.
             प्रास्ताविकात पणन महामंडळाचे संचालक ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी महाराष्ट्रात एकूण 109 कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असून जळगांव जिल्हयात त्याचा शुभारंभ होत आहे. हंगाम संपेपर्यत कापूस खरेदी केंद्र सुरु राहातील.  
           या कार्यक्रमास परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्येत उपस्थित होते.

* * * * * * *

No comments:

Post a Comment