Thursday, 1 November 2012

व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या द्विवर्षीय अभ्यासक्रमास 12 वी समकक्षता



            मुंबई, दि. 1: विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या हितार्थ निर्णय आपल्याला घ्यायचे असून त्यात काही अडीअडचणी असल्यास त्या दूर कराव्यात असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तथा ऊर्जा मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.
            मंत्रालय येथे आयोजित तंत्र शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत घेतलेल्या महत्वपूर्ण अशा मंडळाच्या द्विवर्षीय अभ्यासक्रमास 12 वी समकक्षता या  निर्णयाची माहिती व त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
            देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये शिक्षणास अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. काळाची ही गरज ओळखून शासनाने व्यवसाय शिक्षणाच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगार, मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज असून त्यासाठी व्यवसाय शिक्षणाच्या संधी आणि दर्जा उंचावणे ही  अत्यंत आवश्यक आहे. करिता शासनाने सध्याच्या  व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमातील उमेदवारांची कुंठीतता घालवून भविष्यात त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी तसेच रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने समिती नेमून अभ्यास केला. या समितीच्या अहवालानुसार उपरोक्त निर्णय घेण्यात आला.
             शासनाने समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले. यात मंडळाचे 2 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम + 2 स्तराची (म्हणजेच इयत्ता 12 वी सर्व शाखा समकक्षता देणेत आली. म्हणजेच ज्या ज्या उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रमासाठी इयत्ता 12 वी प्रवेश शैक्षणिक अर्हता नमूद करणेत आलेली आहे, त्या त्या ठिकाणी मंडळाचे अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार अर्ज करणेस पात्र होत आहेत.
            तसेच मंडळाचे 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमास पर्यायी शैक्षणिक अर्हता म्हणून मान्यता देणेत आली, याचाच अर्थ ज्या ज्या नोकरीच्या पदाची शैक्षणिक अर्हता इयत्ता 12 वी अथवा आय. टी. आय. अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार अशी अट आहे. त्या त्या ठिकाणी मंडळाचे अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार त्या पदासाठी अर्ज करण्यास पात्र होत आहे.
            मात्र उपरोक्त मान्यता गुणवत्तेचा विचारही करण्यात आला असून त्यासाठी शासनाने संबंधीत संस्थांसाठी काही अटी लागू केलेल्या आहेत. या अटीनुसार 1) संस्थेस मंडळामार्फत Accrediation करुन घेणे आवश्यक आहे. 2) संस्थेचे वर्षातून कमीत कमी 2 वेळा मंडळामार्फत Academic Audit करण्यात येते. 3) मंडळामार्फत मान्यता दिलेल्या व भविष्यात मान्यता देण्यात येणाऱ्या अशासकीय संस्थांनी 6 महिने, 1 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी रु. 1 लाख प्रती अभ्यासक्रम आणि 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी रु. 2 लाख प्रती अभ्यासक्रम एवढी डिपॉझिट (अनामत) म्हणून मंडळाकडून जमा करणे आवश्यक राहील. मंडळ कार्यालयाने सदर रक्कम मंडळाच्या स्वीय प्रपंची लेखा खात्यामध्ये (PLA) जमा करावी. सदर अट मान्यता प्राप्त सर्व अशासकीय संस्थांसाठी लागू राहील. तसेच मंडळाची मान्यता असे पर्यंत सदर अनामत रक्कम मंडळाकडे राहील. मान्यता रद्द केल्यास व संस्थेकडे कोणतेही दायित्व नसल्यास अनामत रक्कम परत करण्यात येईल. 4) संस्थेत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचे प्रवेशित विद्यार्थ्यांचे 6 महिने, 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे किमान 120 दिवस, 200 दिवस आणि 400 दिवस प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. 5) संस्थेस अभ्यासक्रम चालविण्यासाठी मान्यता देण्यापूर्वी संस्थेकडे अभ्यासक्रमांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मंडळाने निश्चित केलेल्या निकष व मानकानुसार असणे आवश्यक आहे. आणि 6) संस्थेची प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता व निकाल यांचे मागील 3 वर्षाचे सरासरी प्रमाण कमी कमी 60 टक्के असणे आवश्यक राहील.
            सध्या व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत 6 महिने, 1 वर्ष आणि 2 वर्ष कालावधीचे अर्धवेळ व पूर्णवेळ स्वरुपाचे एकूण 1091 अभ्यासक्रम जवळजवळ 2600 संस्थांमधून राबविणेत येत असून त्यांची प्रवेश क्षमता 1 लाख 35 हजार एवढी आहे.

No comments:

Post a Comment