Friday, 30 November 2012

दहावी व बारावीच्या गुणपत्रिका मिळणार 3 डिसेंबर रोजी

                मुंबई, दि. 30 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) ऑक्टोबर, 2012 चा निकाल 28 नोव्हेंबर, 2012 रोजी जाहीर करण्यात आला आहे. गुणपत्रिकांचे वाटप संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी
11 वाजता करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप त्याच दिवशी दु. 3 वाजता करण्यात येईल, असे सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
            ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर (मंगळवार दि. 4 डिसेंबर 2012 पासून) विहित नमुन्यात विहित शुल्कासह (गुरुवार दि. 13 डिसेंबर,2012 पर्यंत) संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणीसाठी केलेले अर्ज अवैध ठरविण्यात येतील.
            ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत पाहिजे असेल त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमुन्यात विहित शुल्कासह मंगळवार दि. 18 डिसेंबर पर्यंत संबंधित मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची किंवा ऑनलाईन गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यातील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
            ज्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च 2013 मध्ये होणाऱ्या परीक्षेस प्रविष्ट व्हावयाचे आहे, त्यांनी नियमित शुल्कासह गुरुवार दि. 13 डिसेंबर पर्यंत व विलंब शुल्कासह मंगळवार दि. 18 डिसेंबर पर्यंत माध्यमिक शाळांकडे / कनिष्ठ महाविद्यालयांकडे आवेदनपत्र सादर करावीत.
            परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत पुन:श्च परीक्षेस प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2012 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी-मार्च 2013 ही संधी उपलब्ध राहील.
            मार्च 2012 मध्ये इयत्ता 12वी मधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांची जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा घेण्यात आली. या  परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2012 व मार्च 2013 या दोन परीक्षांना संधी देण्यात आली आहे.
            भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांचे उच्चकरण झाल्याने या विषयांची उच्चीकृत अभ्यासक्रमानुसार प्रथम परीक्षा मार्च 2013 मध्ये होणार आहे. त्यामुळे मार्च 2013 च्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाचे या विषयाचे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2013 मध्ये उच्चीकृत अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल. मार्च 2013 ही शेवटची संधी राहील.
            विभागीय मंडळनिहाय हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
            पुणे- (020) 25536712; नागपूर-(0712) 2553503; औरंगाबाद (0240) 2334228; मुंबई - (022) 27893756; नाशिक -(0253) 2592143; कोल्हापूर -(0231) 2696103; अमरावती - (0721) 2662608; लातूर- (02382)228570; कोकण (2352) 231250.

No comments:

Post a Comment