Thursday, 18 October 2012

जलभूमी अभियानातंर्गत मिळालेला निधी वेळेवर खर्च करावा - जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर


          जळगांव, दि. 18 :- महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान अंतर्गत सन 2012-2013 मध्ये जळगांव जिल्हयातील सात तालुक्यासाठी 3 कोटी 39 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. सदरचा निधी वेळेवर व योग्य कामांवर खर्च करुन जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी आयोजित महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान बैठकीत बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल उगले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. वाघमारे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सी. एम. धारणकर, यावल उपवनसंरक्षक प्र. म. राहुरकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता शरद आंतारी, उप विभागीय कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक के. डी. महाजन, सहाय्यक प्रकल्प  संचालक अनिल भोकरे, तंत्र अधिकारी श्री. गुंजाळ आदि उपस्थित होते.
            सदरच्या योजनेतंर्गत चाळीसगांव, जामनेर, जळगांव, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ या सात तालुक्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 48 लाख 54 हजार रुपये प्राप्त झाले असून त्याअंतर्गत एकूण 45 कोल्हापूर बंधारे, 70 विहीर / तलाव / बंधारा दुरुस्ती कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कृषि अधिक्षक किसन मुळे यांनी बैठकीत दिली.
            वरील सात तालुक्यापैकी मुक्ताईनगर तालुक्यात मंजूर निधी पेक्षा 2 लाख 95 हजार रुपये अधिक निधीची आवश्यकता आहे. तर जळगांव तालुक्याचा सुमारे 29 लाख रुपयाचा निधी शिल्लक असल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले. जळगांव तालुक्याचा शिल्लक निधीतून जळगांव वनविभागांने डी. पी. सी. सी. टी  व तलावाचे प्रस्ताव दोन दिवसात सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली. तसेच प्रपत्र – 2 मधील धरणगांव तालुक्यातील 66 फळयांची संख्या असलेल्या कोल्हापूर बंधा-याच्या कामाला आवश्यक असलेला सुमारे 6 लाखाचा निधी वर्ग करण्याची सूचना श्री. राजूरकर यांनी केली. सदरच्या योजनेतून काम प्रस्तावित करत असताना संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधीशी प्राथमिक चर्चा करुन त्यांना कामांबाबत माहिती देण्याची  सूचना त्यांनी दिली.
            महात्मा फुले जलभूमी अभियानातून वरील सात तालुक्या व्यतिरिक्त यावल, अंमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगांव, भडगांव व पाचोरा आदि आठ तालुक्यांना प्रत्येकी 3 लाख 75 हजार रुपये निधी मंजूर झालेला असून त्यातून कोल्हापूर बंधारे 13, वनविभाग  डी पी सी सी टी 1 आदि कामे करण्याचे प्रस्तावित असल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले.
                 जिल्हा पाणलोट विकास युनिट अंतर्गत जिल्हयात सन 2009-2010 मध्ये 7 कामे चाळीसगांव तालुका (3) व जामनेर  (4) मंजूर आहेत. तर सन 2010 -2011 मध्ये पाचोरा (2) व जामनेर (3) कामे मंजूर असल्याची माहिती श्री. मुळे यांनी दिली. या 12 पाणलोट क्षेत्रात सुमारे 113 गांवे समाविष्ट आहेत. तर सन 2012-2013 मधील 19 पाणलोट प्रकल्पांना मंजूरी मिळाली असून त्यात 165 गांवे समाविष्ट आहेत. तर प्रकल्पाचा एकूण खर्च 9698.81 लक्ष रुपये असून प्रकल्पाचे क्षेत्र सुमारे 79 हजार हेक्टर आहे असे त्यांनी सांगितले.
            यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी श्री. आघाव यांनी भडगांव तालुक्यातील मेगा पाणलोट क्षेत्राचे पॉवर प्रेझेंटेशन करुन पाणलोट प्रकल्पाची माहिती  जिल्हाधिकारी राजूरकर यांना दिली.
            महात्मा फुले जलभूमी अभियान व जिल्हा पाणलोट विकास युनिट अंतर्गत जळगांव जिल्हयाला विविध कामांसाठी प्राप्त झालेला निधी वेळेवर व योग्य कामांवर खर्च करण्याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले.                   

No comments:

Post a Comment