Wednesday, 1 August 2012

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पुढील 50 वर्षाची दिशा ठरवावी - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्रचा औद्योगिक क्षेत्रात प्रथम क्रमांक रहावा, राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पुढील 50 वर्षाची दिशा ठरवावयाची आहे असे उद्‌गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे काढले.
            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे आज आयोजित करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
            खासगी उद्योजगकांशी भागीदारी करुन नवीन उद्योग उभारावे लागतील. लोकांना आर्थिक सुबत्ता हवी आहे, रोजगार निर्मिती हवी आहे. परंतु आपल्या भागात औष्णिक प्रकल्प नको आहे, यामुळे मोठे आव्हान औद्योगिक विकास महामंडळापुढे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
            उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान उद्योग वाढले आहे. पुण्यात ऑटोमोबाईल क्षेत्र वाढले आहे. परंतु पार्किंग, रस्ते, वाहतूक अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास आपल्या धोरणात काही बदल करावे लागतील.
            उद्योगमंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष नारायण राणे यावेळी म्हणाले शेतीबरोबर राज्यातील उद्योगही वाढले पाहिजेत. नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाने सर्व सहकार्य दिले आहे. परंतु मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपले जास्तीत जास्त योगदान द्यावे. राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी. महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी पसंतीचे स्थान व्हावे म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्ग 3 व 4 चे कर्मचारी यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बक्षिस श्री. राणे यांनी यावेळी जाहीर केले.
            उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज वृक्षात रुपांतर झाले आहे, असे सांगून महामंडळाने राज्याच्या औद्योगिक प्रगतीत केलेल्या यशाचा आढावा घेतला.
            महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी म्हणाले की, आगामी वर्षात उद्योजकांची शिबीरे भरविण्यात येणार आहे. औद्योगिक विकासासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील राहील.
            निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांना यावेळी स्मृती चिन्हे देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव उद्योग डॉ. के. शिवाजी व उद्योग विकास आयुक्त संजय सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन तसेच अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment