Thursday, 9 August 2012

मुंबई उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 14 ऑगस्ट रोजी विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन -- सांगता समारंभ 18 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत


          मुंबई, दि.9 : मुंबई उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून दि. 14 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलींद देवरा यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन उच्च न्यायालयाच्या केंद्रीय सभागृहात करण्यात येणार आहे.     यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहीत शाह उपस्थित राहणार आहेत. 
          या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 वाजता उच्च न्यायालयाच्या केंद्रीय सभागृहात भरवण्यात आलेल्या महत्त्वाचे दस्तऐवज, लेख आणि कागदपत्रे यांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतील. हे प्रदर्शन 16 सप्टेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.
          शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ 18 ऑगस्ट रोजी एनसीपीए मधील जमशेद भाभा हॉल येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारताचे मुख्य न्यायाधीश एस.एच.कपाडीया, केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री सलमान खुर्शीद, गोव्याचे राज्यपाल भारत वांच्छू, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश अल्तमास कबीर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment