Tuesday, 21 August 2012

राष्ट्रीय आर्थिकदृष्टया दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षेची आवेदन पत्रे 31 ऑगस्ट पर्यंत पाठवावीत महाराष्ट्रातील परीक्षा 18 नोव्हेंबरला


     मुंबई, दि. 21 : इ. 8 वीतील नियमित आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ही एन. सी. ई. आर. टी., नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येईल. राज्यस्तर परीक्षेची आवेदन पत्र 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावीत. राज्यातील परीक्षेचा दिनांक 18 नोव्हेंबर 2012 आहे.    
    ही शिष्यवृत्ती 12 वी पर्यंत मिळते. इ. 8वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. 1 लाख 50 हजार पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येईल. उत्पन्नाचा दाखला तहसिलदार, सक्षम अधिकारी, तलाठी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला असावा.
   शिष्यवृत्ती संख्या:- NMMS परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे NCERT नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार शिष्यवृत्या दिल्या जातील. राज्य आरक्षणाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असेल.
शिष्यवृत्ती संख्या
   अनुसूचित जाती  - 13 टक्के, अनुसूचित जमाती- 7 टक्के, विमुक्त जाती-3 टक्के, भटक्या जमाती- 8 टक्के, इतर मागासवर्ग -19 टक्के, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय- 2 टक्के तसेच अपंगासाठी प्रत्येक संवर्गात 3 टक्के आरक्षण असेल. प्रत्येक जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात सवंर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात येतील.
शिष्यवृत्तीची रक्कम
  एन.सी.ई.आर.टी. च्या नियमांना अधिन राहून प्रत्येक शिष्यवृत्तीधारकास दरमहा रु. 500/-शिष्यवृत्ती देण्यात येईल.
विद्यार्थ्यांची निवड
   विद्यार्थ्यांची निवड परिक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने केलेल्या मागासवर्गींयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
पात्रता
   सन 2012-13 मध्ये इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांनी  राज्यस्तर परीक्षेसाठी आवेदन पत्रे शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद/शिक्षण निरीक्षक यांच्याकडे 31 ऑगस्टपर्यंत सादर करावीत. महाराष्ट्रातील परीक्षा 18 नोव्हेंबर , 2012 रोजी घेण्यात येणार आहे. संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशातील शासनमान्य, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील इ. 8वीतील नियमित विद्यार्थीच राज्याने आयोजित केलेल्या NMMS परीक्षेसाठी पात्र असतील. विद्यार्थ्यांस इ. 7वी मध्ये 55 टक्के पेक्षा अधिक गुण असावेत तर मागासवर्गीयांसाठी 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
परीक्षा पध्दत व शुल्क
            या परिक्षेसाठी मानसिक क्षमता कसोटी व शालेय क्षमता कसोटी (मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्रे, गणित) हे विषय असतील. महाराष्ट्र राज्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी परीक्षा शुल्क 100 रुपये असून प्रत्येक शैक्षणिक वर्षाकरिता प्रत्येक शाळेसाठी संलग्नता शुल्क 100 रुपये आहे.
आवेदन पत्रांचे वाटप
      शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune.in) ही ऑनलाईन आवेदन पत्रे 1 ऑगस्ट, 2012 पासून उपलब्ध होतील. आवश्यक SBI चलने संबंधित जिल्ह्यांचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक), शिक्षण निरीक्षक, परीक्षा केंद्रे यांच्या मार्फत शाळांनी घेऊन जावयाचे आहे.
आवेदनपत्रांचे संकलन
     ऑनलाईन प्रिंटआऊट आवेदन पत्रे आवश्यक जात, अपंग व उत्पन्न प्रमाणपत्रांच्या सत्य प्रतींसह विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह तसेच S फॉर्म आणि एकत्रित रकमेच्या SBI चलनांसह 31 ऑगस्ट, 2012 पूर्वी पूर्ण करुन संबंधित शिक्षण अधिकारी (माध्यमिक), शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांच्याकडे मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह दिलेल्या मुदतीत सादर करावयाचे आहे.

No comments:

Post a Comment