Sunday, 7 April 2013

शेळगाव ग्रामस्थांनी कृषि विज्ञान मंडळामार्फत राबविल्या जाणा-या योजनांचा लाभ घ्यावा- पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर



            जळगांव दि. 7 :- महात्मा फुले कृषि विज्ञान मंडळामार्फत स्थानिक स्तरावर कृषि विकासाच्या योजना राबविल्या जात असतात. सदर मंडळांतर्गत जमिनीचे माती व पाणी परिक्षण करुन त्याप्रमाणात खताची मात्रा देण्याची सूचना केली जाते. त्यामुळे शेळगांव ग्रामस्थांनी कृषि विज्ञान मंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ घेऊन शेती उत्पादन वाढविण्याचे आवाहन कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
            शेळगांव ता. जळगांव येथे आयोजित दलित वस्ती काम, रस्ता क्रांकीटीकरण काम  व कृषि विज्ञान मंडळाचा लोकार्पण सोहळा ना. देवकर यांचे हस्ते आज संपन्न झाला. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमास जळगांव पंचायत समिती सभापती दिलीप पाटील, उपसभापती विजय नारखेडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, बळीराम सोनवणे, दिलीप धनगर, राजेश पाटील, घनशाम सोनवणे तालुका कृषि अधिकारी श्री. चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
            ना. देवकर म्हणाले, कृषि विज्ञान मंडळाला राज्य शासनाकडून मोठया प्रमाणात सवलती देण्यात येत असतात. सदर मंडळ स्थानिक स्तरावर शेतक-यांना कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शन देत असते. तसेच जमिनीचे माती परिक्षण करुन आरोग्य पत्रिका तयार करते. त्यामुळे जमिनीची पोत सुधारणा करुन शेती उत्पादन वाढविले जाते, असे त्यांनी सांगितले.
            कृषि विभागाकडून गावातील दहा-बारा शेतक-यांनी गटाने एमएआयडीसीकडे नोंदणी केल्यास बांधावर खत पुरवठा केला जाते. तसेच आत्मा अंतर्गत शेतक-यांना दहा हजाराचा फिरता कर्ज पुरवठा केला जातो, अशी माहिती देवकर यांनी दिली.
            शेळगांव गांवामध्ये महात्मा फुले कृषि विज्ञान मंडळाची स्थापना झाल्याने सदर मंडळाचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
            प्रारंभी ना. देवकर व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन  करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. तर घनशाम सोनवणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment