Saturday, 25 January 2014

मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा :जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर


               मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा                                                                            :जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर

         जळगाव, दि. 25 :- लोकशाही बळकटीकरणाच्या प्रकियेत निर्भयमुक्त वातावरणात पार पडणा-या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण असे महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान बाळगून प्रत्येक मतदारांनी  निवडणूक प्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात केले.
         यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, अप्पर पोलीस अधिक्षक एन.अंबीका, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उप विभागीय अधिकारी अभिजीत भांडे, उप जिल्हाधिकारी निवडणूक मनोहर चौधरी यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नवमतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मतदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल मत - आपला हक्क- आपला मतदान केंद्र याबाबतीत जागरूक राहतांना मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं. मतदानाचा मुलभूत अधिकार बजवावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासिनता मनातून काढून टाकावी. तरुणांना आपण देशाचा आधारस्तंभ मानतो. याच आधारस्तंभांने पुढे येऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हाव, समृध्द, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. त्याचे 4 थे वर्ष आज साजरा करतांना मनस्वी आनंद होत असून या दिवसाचे महत्व व आपला मौल्यवान मताधिकार ओळखून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
         यावेळी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री.व्हि.एस.संपत यांची मतदार दिनाचे महत्व पटविणारी चित्रफित प्रदर्शीत करण्यात आली तर तहसिलदार गोविंद शिंदे यांनी निर्भयपणे व निपक्षपातीपणे सर्वांनी मतदान करण्यासाठी शपथ दिली. प्रसंगी नवमतदारांना मतदान कार्डांचे वाटप करण्यात आले तर मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप जिल्हाधिकारी निवडणूक मनोहर चौधरी यांनी केले तर आभार तहसिलदार निवडणूक श्रीमती हेमलता बढे यांनी मानले.

* * * * * *

No comments:

Post a Comment