Monday, 13 January 2014

ई-टपाल सेवेचा सर्व सामान्य जनतेने लाभ घ्यावा : पालकमंत्री संजय सावकारे


ई-टपाल सेवेचा सर्व सामान्य जनतेने लाभ घ्यावा
                                                          : पालकमंत्री संजय सावकारे
  
चाळीसगाव, दिनांक 13 :- वेब बेस्ड ई-टपाल सेवेमुळे उपविभागीय अधिकारी चाळीसगाव या कार्यालयात येणारे व जाणारे संपुर्ण टपाल हे संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून आपण दाखल केलेल्या टपालाची सद्यस्थिती पहाण्यासाठी संकेतस्थळावर ही कार्यप्रणाली उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्व सामान्य जनतेला मोठया प्रमाणात फायदा होणार असून या सेवेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी केले.
उप विभागीय कार्यालयातील ई-टपाल सेवेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे ना.रामराव वडकुते, तालुक्याचे आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप देशमुख, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्यासह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 या कार्यप्रणालीमुळे कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येऊन नागरिकांनी दाखल केलेल्या प्रत्येक पत्रव्यवहारात पारदर्शकता येणार असल्याने ख-या अर्थाने महसूल विभाग हा लोकाभिमूख होण्यास मदत होणार आहे. या प्रणालीचा वापर हा केवळ टपालापुरताच मर्यादीत न राहता महसूल व फौजदारी दाव्यांचीही सद्यस्थिती यावर आपल्याला पहायला मिळणार असल्याचे आमदार राजीव देशमुख यांनी सांगितले.
अवघ्या पाच महिन्यापुर्वी सुरु झालेल्या उप विभागीय कार्यालयात राबविण्यात येणारी ई-टपाल प्रणाली शासनाचे सुवर्ण जयंती राजस्व अभियानाबाबतचे उद्दिष्ट निश्चित कार्यसाधक ठरेल असा आशावाद जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी  व्यक्त केला असून टप्प्या-टप्प्याने संपुर्ण जिल्हयातील महसूल प्रशासनात या कार्यप्रणालीचा अवलंब केला जाईल असेही त्यांनी यावेळी  सांगितले.
ई-टपाल संगणकीय प्रणाली बद्दल माहिती देतांना उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सांगितले की, सदर संगणकीय प्रणालीचा शुभारंभ तालुक्यातून होतांना मनस्वी आनंद होत आहे. ही संगणकीय प्रणाली सर्वसामान्य जनता व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा ठरणार असून, आजतागायत 148 दाव्यांची माहिती या प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे. लवकरच कार्यालयातील संपुर्ण माहितीचे संगणकीय प्रणालीत रुपांतर करण्यात येणार असल्याचे सांगून ही प्रणाली कार्यन्वित करण्यासाठी तालुक्याचे आमदार राजीव देशमुख व जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे सांगितले.
चाळीसगांव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.संजय नानकर यांनी संगणकीय प्रणालीबाबत प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, या प्रणालीमुळे सामान्य जनतेला निश्चीतच फायदा होऊन उप विभागीय अधिका-यांनी आधुनिक युगाची मुहर्तमेढ केल्याने त्यांचे अभिनंदन केले. व ही प्रणाली नियमीत अद्यावत ठेवण्याची विनंतीही केली.
प्रारंभी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी पालकमंत्री ना.सावकारे व उपस्थितांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर प्रास्ताविक व आभार तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले.

                                   * * * * * * * * 

No comments:

Post a Comment