Tuesday, 28 October 2014

स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल



स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
 

जळगाव, दि.28-  स्वच्छता ही सा-यांची आणि सामूहिक जबाबदारी आहे. एकाने स्वच्छता करायची आणि इतरांनी अस्वच्छता करायची  यामुळे स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यासाठी स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज केले. जिल्हा नियोजन भवनात आयोजित बैठकीस आज त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिका-यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस शहरातील व्यापारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी आदिंनी  उत्स्फूर्त प्रतिसाद देत अभियानात योगदान देऊ केले.

स्वच्छ भारत अभियानातर्गत जळगाव जिल्ह्यात राबवावयाच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सर्व विभागप्रमुख, सामाजिक , स्वयंसेवी संस्था, व्यापारी, उद्योजक, त्याच्या संघटनांची एकत्र बैठक बोलावली.  या बैठकीस जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी , विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.मुगळीकर, मनपा अपर आयुक्त साजिदखान पठाण, उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आदी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानाची जळगाव जिल्ह्यातील सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. जळगाव शहरातील बळीराम पेठेतील घाणेकर चौकातून या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयात हे अभियान राबविले जात असतांनाच ग्रामीण भागातही सर्व ग्रामपंचायतींमध्ये, तालुका मुख्यालय, नगरपालिका, नगर परिषदांच्या ठिकाणीही हे अभियान राबविले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या की,  स्वच्छता ही सामुहिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचे भान सा-यांना यावे ,सर्व जनतेपर्यंत संदेश पोहोचावा या हेतूने हा कार्यक्रम होणार आहे.या अभियानाची सुरुवात आधी आपापल्या कार्यालयांपासून करावी. आधी स्वतः पासून सुरुवात करा. प्लास्टीक पिशवीचा वापर टाळा. सर्व नागरिकांनी आणि समाजातील सर्व घटकांनी या अभियानात सहभागी होऊन 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे.

पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी सांगितले की, पोलीस दलही या अभियानात सहभागी होणार असून पोलीस स्टेशनचा परिसर, पोलीस दलाचे या अभियानासाठी संपूर्ण सहकार्य राहिल.

जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी  मुगळीकर यांनी सांगितले की जिल्ह्यातील 1151 ग्रामपंचायतीत ही मोहिम राबविली जाईल. त्यासाठी दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी  गावागावांत स्वच्छता फे-या काढण्यात येतील.

या बैठकीच्या प्रारंभी सहभागी झालेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधींनी  या अभियानासंदर्भात आपापली मते मांडली. तसेच अनेक संघटनांनी शहरातील वेगवेगळ्या परिसरांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली. तसेच या अभियानासाठी लागणारे झाडू, टोपल्या, फावडे, मास्क आदी साहित्य देण्यासाठीही अनेकांनी पुढाकार घेतला. या बैठकीप्रमाणे तालुकास्तरावर बैठका घेऊन तेथील स्वच्छता अभियानाचे नियोजन करावे अशा सुचनाही जिल्हाधिका-यानी यावेळी उपस्थित अधिका-यांना केल्या.

या बैठकीस  इंडस्ट्री असो. चे अंजनीकुमार मुंदडा, लायन्स सिटी चे सिसोदिया, विनोद बियाणी, जैन इरिगेशनचे फारुख शेख,  रोटरी क्लबच्या डॉ. मंगला झोपे, कमलेश वासवानी, जिंदाचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, युवा शक्ती फाऊंडॆशन आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी केले.

                                                                   0000

No comments:

Post a Comment