Wednesday, 10 July 2013

वाघुर धरण पाटचारींच्या कामासाठी शेतक-यांनी सहकार्य करावे कार्यकारी अभियंत्यांचे आवाहन



            जळगांव, दि. 10 :- वाघुर प्रकल्पास सन 1976 मध्ये मंजूरी मिळाली आहे. धरणाची साठवण क्षमता 325 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. परंतू वाघुर धरणस्थळी एकूण 455 दलघमी पाणी उपलब्ध आहे. त्यापैकी वाघुर जलाशयाचे वर जामनेर तालुक्यामध्ये 83 दशलक्ष घनमीटर पाणी वापर करणेसाठी लघू पाटबंधारे तलाव व के. टी. वेअर बांधण्यात आले आहेत. वाघुर धरणात साठविण्यात येणा-या पाण्यातून फक्त 64 दलघमी पाणी सिंचनाव्यतिरिक्त जळगांव शहर पाणी पुरवठा योजना, नेरी व 7 गांवे, सुप्रिम इंडस्ट्रीज व इतर औद्योगिक वापरसाठी राखीव आहे. उर्वरीत पाणी शेतीकरीता वापरण्याचे नियोजन आहे.
              वाघुर प्रकल्पातील कालव्याचे कामाची सद्यस्थिती मुख्य कालवे डावा कालवा 17 कि.मी. सद्यस्थिती डावा कालावा 100 टक्के पूर्ण, उजवा कालवा 23 कि. मी.  सदयस्थिती उजवा कालवा 21 कि. मी. पूर्ण, शाखा कालवे (अ)  आसोदा शाखा 11 कि.मी. सद्यस्थिती असोदा शाखा कालव्याचे मातीकाम 9 कि.मी. लांबीचे पूर्ण, (ब) भादली शाखा 7.4 कि.मी. सद्यस्थिती  भादली शाखा कालव्याचे मातीकाम 6 कि.मी. पूर्ण, वितरीका (अ) असोदा वितरीका 21 कि. मी. सद्यस्थिती आसोदा वितरीकेचे काम 9 कि. मी. लांबीचे पूर्ण (ब) भादली वितरीका 41 कि. मी.  सद्यस्थिती भादली वितरीकेचे काम 12 कि. मी. लांबीचे पूर्ण, उपवितरीका पळसोद 12 कि. मी. जामोद 12 कि. मी. सद्यस्थिती शेतकरी विरोधामुळे कामास सुरुवात नाही. उर्वरीत कामे भुसंपादनाचे विरोधामुळे हाती घेता आली नाही.
          वाघुर प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रात सरासरी 761 मी. मी. पाऊस पडतो. परंतू मागील  5/6 वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. हीच परिस्थिती कायम राहील असे म्हणता येणार नाही. कारण निसर्गाची खात्री कोणालाही देता येत नाही. सन 2012 मध्ये धरणामध्ये काही प्रमाणात पाणी साठल्याने कालव्यातून चाचणीसाठी पाणी सोडण्यात आलेले होते. ते प्रत्यक्षात  आसोदा व भादली गावापर्यत पोहचले होते व त्यामुळे या भागातील शेतक-यांना त्याचा मोठया प्रमाणात फायदा झाल्याचे तेथील शेतकरी मान्य करीत आहेत.
         सध्या वाघुर कालवाचे काम भादली व नांद्रा परिसरापर्यत पुर्ण झालेले आहे. त्यामुळे त्या गावांना वाघुर प्रकल्पाचे पाटाचे कामे झाल्यानंतर पाणी येणार आहे. त्या पुढील पाटचा-यांसाठी 39 गावातील सुमारे 594 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. या करीता अंदाजे 400 शेतक-यांची जमीन संपादीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना जमिनीचा मोबदला, भाडेपट्टा , पिक नुकसान भरपाई नियमानुसार अदा करणे येईल. पाटचारीची कामे पूर्ण झाल्यानंतर जळगांव तालुक्यातील 51 गावातील सुमारे 15000 हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. भादली, कडगांव, ममुराबाद, नशिराबाद शिवारात पाण्याची तीव्र टंचाई असते. वाघुरचे एक दोन पाणी जरी  या भागात आले तरी जमिनीतील पाण्याची पातळी उंचावून या भागातील जमिनी बागायती होती व नेहमीची पारंपारीक पिके करण्याऐवजी लोक बारमाही
पिके, केळी व इतर नगदी पिकाकडे वळतील व लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. ज्या शेतक-यांच्या जमिनी पाटचारीत जातील त्यांचा पाटचारीस विरोध असणे स्वाभाविक आहे. परंतू त्याशिवाय कालवे काढता येत नाही व पर्यायाने इतरांना पाणी मिळणार नाही. धरणाची कामे करतांना बुडीत क्षेत्रात 7 गांवे पुर्णत: बुडाली आहेत. पाटचा-यांसाठी काही शेतक-यांनी जमीनी देण्याची तयारी दर्शविल्यास कालवा लवकर करण्यास मदत होईल. परंतू त्या भागातील सर्व शेतक-यांना कालवा नकोच असेल व त्यांनी ग्रामसभेचा ठराव करुन दिला तर वाघुरचे पाटचारी कायमची रद्द करण्याबाबत शासनस्तरावर विचार होवू शकतो. परंतू सर्व सामान्य शेतकरी मात्र यामुळे पाण्यापासून कायमचे वंचित राहतील याचाही विचार होणे आवश्यक आहे.
       शासनस्तरावर याबाबत बैठका झाल्या व त्यामध्ये ठरल्याप्रमाणे या भागातील शेतक-यांचे शेतात पुन्हा एकदा कालव्याची आखणी करावी व जमिनीची मोजनी करावी व शेतक-यांच्या भावना समजून घ्याव्यात असा निर्णय झाला आहे. त्यानुसार 39 गावांमध्ये 65 प्रस्तावांची मोजणी करण्याचा कालबध्द कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, भूमिअभिलेख विभाग (मोजणीसाठी) व जलसंपदा विभाग यांचे मार्फत एकत्रितपणे आखण्यात आला आहे. व ही प्रक्रिया जुलै, ऑगस्ट या महिन्यात पूर्ण करुन शासनास अहवाल सादर करावाचा आहे. यामध्ये ज्या शेतक-यांना त्यांचे म्हणणे मांडावयाचे आहे, त्यांनी मोजणीचे दिवशी  शांततेने लेखी स्वरुपात मांडावे अशी या निवेदनाव्दारे विनंती करणत येत आहे. या कामी शासकीय कर्मचा-याचे संरक्षणासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत. मोजणीचे वेळी शेतक-यांचे पिकांचे नुकसान होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतली जाईल. मोजणीचे वेळी व्हीडीओ शुटींग तसेच फोटो घेतले जातील जर शेतक्-यांचे पिकांचे नुकसान झाले तर पिक नुकसान भरपाई देण्याचीही शासनाची तयारी आहे. त्यामुळे शेतक-यांनी पाटचारी हवी किंवा नको याबाबत विचार करुन तसे लेखी कळविण्यात यावे म्हणजे शासनास वस्तुस्थिती कळविण्यात येईल व पुढील दिशा ठरविण्यात येईल. तरी या कामी शेतक-यांनी सहकार्य करावे अशी विनंती कार्यकारी अभियंता वाघुर धरण विभाग, जळगांव यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.

No comments:

Post a Comment