Monday, 28 May 2012

आपत्ती निवारण कार्यात सर्व यंत्रणांच्या अधिका-यांनी आपसात समन्वय ठेऊन कार्य करावे -- जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर


जळगांव, दिनांक 29:- नैसर्गिक आपत्तीच्या निवा-यासाठी सर्व यंत्रणांच्या अधिका-यांनी आपआपसात समन्वय ठेऊन व घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत दिले.
     यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्येक तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांनी धरणाच्या ठिकाणी, नगर परिषद व महानगरपालिका यांनी नोडल ऑफिसरची नेमणूक करावेत आणि हे नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहतील याची दक्षता घ्यावी.
     सर्व यंत्रणांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व वाहने व साधन सामुग्री सुस्थितीत राहिल व कामाच्यावेळी व्यत्यय येऊ नये म्हणून सर्व चालकांचे दूरध्वती क्रमांक ठळकपणे निदर्शनास येतील असे प्रदर्शित करावेत. तसेच सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचा-यांचे नाव, पत्ते व दूरध्वनी क्रमांक सूचीत ठेवावेत.  यापुढे कोणीही अधिकारी व कर्मचा-यांनी रजेची मागणी केल्यास पर्यायी व्यवस्था झाल्या शिवाय रजा मंजूर करण्यात येऊ नये असेही निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी आपआपसात समन्वय ठेवावा. नैसर्गिक आपत्तीत जे आदेश देण्यात येतील त्यानुसार घटनेचे पुरेसे गांभिर्य लक्षात घेऊन कार्य करत रहावे असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
     सर्व जिल्हयातील शहरामधून सर्व प्रकारचे अतिक्रमणे हटवून शहरातील वाहणारे नाले, नदया यांच्यात साचलेला गाळ काढून पाणी वाहते राहिल अशी व्यवस्था करावी. धोकादायक इमारती, रस्ते, यांची यादी करुन घरमालकांना नोटिसा द्याव्यात व भाडेकरुनांही हटवावे.
     सर्व मोठे , मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरु करावेत खराब व नैसर्गिक आपत्तीमुळे बंद होणारे रस्ते मोकळे करावेत.  विद्युत मंडळ व दूरसंचार विभागाचे खांब पडले असतील तर ते सुध्दा त्वरीत दुरुस्त करावेत.  आपत्ती निवारणासाठी लागणा-या साहित्याची यादी तयार ठेवावी तसेच जेसीबी मशिन, डंपर, ट्रक यांचीही माहिती ठेवावी जिल्यातील सर्व रेशन दुकानदार, पोलिस पाटील यांनी सतर्क राहवे तसेच पाणी शुध्दीकराणासाठी टीसीएल, मेडीक्लोर या औषधांचा पुरेसा साठा ठेवावा.  तसेच जिल्हयातील आपत्तीग्रस्त 137 गावे कायमस्वरुपी लक्षात ठेऊन त्यांच्याबाबत काळजी घ्यावी.  नदीचे पात्र किंवा बंधारा फुटल्यास पर्यायी रस्ते तात्पुरते निवारे उभारतांना ती जागा चांगली असावी तिथे राहण्याची योग्य ती सुविधा उपलब्ध करुन द्यावी. अन्न पाकिटे पुरविणे व आपदग्रस्तांना पिण्यासाठी शुध्द पाणी पुरवावे अशा सुचना जिल्हाधिका-यांनी या बैठकीत दिल्यात.
     आपत्ती निवारणासाठी बचाव पथकांना पुरविण्यात येणा-या साहित्याची माहिती देण्यात येऊन ही साधने सर्वाना दाखविण्यात आली.
     बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्रीगिरीवार, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंग रावळ, विमल नाथाणी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                 * * * * * * *

No comments:

Post a Comment