जळगांव, दि. 24 :- गारपीट, वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या केळी
उत्पादक शेतक-यांना प्रती हेक्टरी 10 हजार रुपयांची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी
शासन दरबारी प्रयत्न करु अशी माहिती राज्याचे कृषी परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव
जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव देवकर यांनी आज प्रसार माध्यमांच्या
प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
यावल तालुक्यातील
न्हावी, बोरखेडा, मारुळ, हंबर्डी या परिसरातील केळी उत्पादक शेतक-यांच्या केळी
बागांचे गारपीट व वादळाने झलेल्या केळी बागेस भेट देवून त्यांनी पहाणी केली यावेळी त्यांच्या समावेत खासदार
हरिभाऊ जावळे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, अधिक्षक कृषी
अधिकारी सुभाष नागरे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, वाल्मिक पाटील, शरद महाजन,
विलास पाटील, अनिल साठे आदि उपस्थित होते.
ना. देवकर पुढे
म्हणाले की, प्रती हेक्टर 10 हजार रुपये मदतीसाठी मी आग्रही राहणार असून
मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रति खोड केळी उत्पादक शेतक-यास नुकसान भरपाई मिळावी
यासाठीही प्रयत्न केले जातील. शेतक-यांना पीक वीमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी
जिल्हयातील केळी उत्पादक तालुक्यात जिल्हा नियोजन विकास समितीच्या नाविण्यपूर्ण
योजनेअंतर्गत वेधशाळा स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे दैनंदिन हवामानातील
बदलांचा अभिलेख तयार होईल. शेतक-यांना पीक वीमा संरक्षणाचा लाभ मिळविता येईल. केळी
वरील करपा निर्मूलनासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या
पथदर्शक प्रकल्पात आवश्यक बदल करण्याबाबत सूचना काही शेतक-यांनी केल्या आहेत.
त्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
* * * * * * *
No comments:
Post a Comment