Thursday, 31 May 2012

धार्मिक उत्सव साजरे करतांना जनतेने प्रशासनास सहकार्य करावे - खा.ए.टी.पाटील

चाळीसगांव दि.30 : धार्मिक उत्सव सण साजरे होत असतांना सामाजिक शांतता जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम केवळ पोलीसांचेच नाही तर हे काम प्रत्येक नागरिकाचे आहे आणी म्हणून प्रत्येक नागरिकाने आपणच पोलीस आहोत अशा भुमिकेतून धार्मिक सण उत्सव साजरे करतांना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन खा.ए.टी.पाटील यांनी चाळीसगांव पोलीस स्टेशनमध्ये पिर मुसा कादरी बाबा उरुसाच्या पार्श्वभुमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चाळीसगांव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड होते.
     धार्मिक सण उत्सवाच्या काळात या शहरात जातीय सलोखा अबाधित ठेवला जातो. त्याचबरोबर सामाजिक सलोखा देखील जपला जातो. याकामी सर्व जाती धर्माच्या लोकांचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते, संघटनांचे पदाधिकारी यांचा समन्वय असतो. म्हणून चाळीसगांवमध्ये धार्मिक सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडत नाही या परंपरेमुळेच चाळीसगांवचा लौकीक वाढलेला आहे असे खा.पाटील यांनी सांगून पिर मुसा कादरी बाबा उरुसाच्या काळात सर्वांनी एकत्रितरित्या काम करण्याची आणि या शहराची आदर्श परंपरा जपण्याचे आवाहनही केले.
     भाविकांच्या कोणत्याही गैरसोयी होवू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील असे आमदार राजीव देशमुख यांनी यावेळी बोलतांना सांगून उरुसाच्या काळात पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीस प्रदिप देशमुख, तहसिलदार शशिकांत हदगल, मुख्याधिकारी सुनिल पवार, पोलीस निरीक्षक लक्ष्मण गायकवाड, शेतकरी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे किसनराव जोर्वेकर, नगरसेवक के.बी.साळुखे, राजेंद्र चौधरी, नारायण अग्रवाल, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
    
                                      * * * * * *

Wednesday, 30 May 2012

नागरिकांनी बंद मध्ये सहभागी होऊ नये ! जिल्हा प्रशासनाचे आवाहन


जळगांव, दिनांक 30:- बंदचे आवाहन करणे पूर्णत: बेकायदेशीर असल्याने नागरिकांनी बंद मध्ये सहभाग घेऊ नये जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक प्रकाश मुत्याळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकारी व शासकीय अधिका-यांच्या बैठकीत केले.
     पेट्रोल दरवाढी विरोधात काही राजकीय संघटांनानी 31 मे 2012 रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.  बंद काळात जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहणार असून रस्ते व रेल्वे वाहतूकही सुरु राहणार आहे.  तरी नागरिकांनी कायदा व सुव्यस्था अबाधित राहिल व जिल्हयात असलेल्या शांततेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी . बंदच्या दिवशी ऑटो रिक्षा सुरु राहणार असून भाजीपाला, दुध, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल डिझेल विक्री, किराणा भूसार, जव्हेरी बाजार आदि संस्था सुरु राहणार असून कृषि उत्पन्न बाजार समितीही नेहमी प्रमाणे सुरु राहणार आहेत.  आरोग्य सेवा व अग्निशमन सेवाही सुरु राहणार आहेत.  बंदच्या काळात गोरगरीब जनतेचे व नागरिकांचे नुकसान होणार नाही याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
     बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, विविध संघटांनांचे प्रतिनिधी , प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                                 * * * * * * *

Monday, 28 May 2012

आपत्ती निवारण कार्यात सर्व यंत्रणांच्या अधिका-यांनी आपसात समन्वय ठेऊन कार्य करावे -- जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर


जळगांव, दिनांक 29:- नैसर्गिक आपत्तीच्या निवा-यासाठी सर्व यंत्रणांच्या अधिका-यांनी आपआपसात समन्वय ठेऊन व घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत दिले.
     यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्येक तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांनी धरणाच्या ठिकाणी, नगर परिषद व महानगरपालिका यांनी नोडल ऑफिसरची नेमणूक करावेत आणि हे नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहतील याची दक्षता घ्यावी.
     सर्व यंत्रणांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व वाहने व साधन सामुग्री सुस्थितीत राहिल व कामाच्यावेळी व्यत्यय येऊ नये म्हणून सर्व चालकांचे दूरध्वती क्रमांक ठळकपणे निदर्शनास येतील असे प्रदर्शित करावेत. तसेच सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचा-यांचे नाव, पत्ते व दूरध्वनी क्रमांक सूचीत ठेवावेत.  यापुढे कोणीही अधिकारी व कर्मचा-यांनी रजेची मागणी केल्यास पर्यायी व्यवस्था झाल्या शिवाय रजा मंजूर करण्यात येऊ नये असेही निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी आपआपसात समन्वय ठेवावा. नैसर्गिक आपत्तीत जे आदेश देण्यात येतील त्यानुसार घटनेचे पुरेसे गांभिर्य लक्षात घेऊन कार्य करत रहावे असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
     सर्व जिल्हयातील शहरामधून सर्व प्रकारचे अतिक्रमणे हटवून शहरातील वाहणारे नाले, नदया यांच्यात साचलेला गाळ काढून पाणी वाहते राहिल अशी व्यवस्था करावी. धोकादायक इमारती, रस्ते, यांची यादी करुन घरमालकांना नोटिसा द्याव्यात व भाडेकरुनांही हटवावे.
     सर्व मोठे , मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरु करावेत खराब व नैसर्गिक आपत्तीमुळे बंद होणारे रस्ते मोकळे करावेत.  विद्युत मंडळ व दूरसंचार विभागाचे खांब पडले असतील तर ते सुध्दा त्वरीत दुरुस्त करावेत.  आपत्ती निवारणासाठी लागणा-या साहित्याची यादी तयार ठेवावी तसेच जेसीबी मशिन, डंपर, ट्रक यांचीही माहिती ठेवावी जिल्यातील सर्व रेशन दुकानदार, पोलिस पाटील यांनी सतर्क राहवे तसेच पाणी शुध्दीकराणासाठी टीसीएल, मेडीक्लोर या औषधांचा पुरेसा साठा ठेवावा.  तसेच जिल्हयातील आपत्तीग्रस्त 137 गावे कायमस्वरुपी लक्षात ठेऊन त्यांच्याबाबत काळजी घ्यावी.  नदीचे पात्र किंवा बंधारा फुटल्यास पर्यायी रस्ते तात्पुरते निवारे उभारतांना ती जागा चांगली असावी तिथे राहण्याची योग्य ती सुविधा उपलब्ध करुन द्यावी. अन्न पाकिटे पुरविणे व आपदग्रस्तांना पिण्यासाठी शुध्द पाणी पुरवावे अशा सुचना जिल्हाधिका-यांनी या बैठकीत दिल्यात.
     आपत्ती निवारणासाठी बचाव पथकांना पुरविण्यात येणा-या साहित्याची माहिती देण्यात येऊन ही साधने सर्वाना दाखविण्यात आली.
     बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्रीगिरीवार, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंग रावळ, विमल नाथाणी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                 * * * * * * *

 






आपत्तीव्यवस्थापन समितीची आढावा बैठक अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी श्री. ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी मंचावर लाभक्षेत्र विकास विकास प्राधिकरणाचे अभियंता श्रीगिरीवार, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, दुस-या छायाचित्रात उपस्थित अधिकारी व बचाव पथकांना पुरविण्यात येणारे साहित्य दिसत आहेत.
                                                    ( छाया - जिमाका, जळगांव ) 

लोकराज्यचा कृषि विशेषांक


जळगांव, दि. 28 :- माहे जून 2012 चा लोकराज्यचा अंक कृषि विशेषांक म्हणून प्रसिध्द करण्यात येत आहे. हा अंक कव्हरसहित 56 पानांचा असून अंकाची किंमत रु. 10/- एवडी ठेवण्यात आली आहे. या अंकामध्ये 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. वसंत आबाजी डहाके यांची प्रदिर्घ मुलाखत प्रसिध्द करण्यात येणार असून साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख या अंकात समाविष्ट करण्यात येत आहेत.

शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश


    जळगांव, दि. 28 :- शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र एन.12 हडको, औरंगाबाद या संस्थेत सन 2012 - 13 या शैक्षणिक वर्षासाठी प्रौढ अस्थिव्यंगाना प्रवेश देणे आहे. या संस्थेत शिवणकला, आर्मेचर वायडीग, (विद्युत) हस्त जुळाई छापाई, पुस्तक बांधणी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी साठी फिटर या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. शिवणकला पुस्तक बांधणीसाठी चौथी उत्तीर्ण हस्तजुळाई छापाई तसेच आर्मेचर वायडिंग (विद्युत) साठी उमेदवार 9 वी उत्तीर्ण असावा या संस्थेत वय वर्ष 16 ते 45 या वयोगटातील अस्थिव्यंगानाच प्रवेश दिला जातो.
       अंध, मुकबधिर, मतीमंद या प्रवर्गातील मुलांना प्रवेश दिला जात नाही. प्रवेशित प्रशिक्षणार्थीना निवास, भोजन अंथरुण, पांघरुण शैक्षणिक साहित्य, विद्यावेतन, वैद्यकीय औषध उपचार इ. सोय विनामुल्य करण्यांत येते.
     तरी गरजुनी प्रत्यक्ष किंवा पत्राव्दारे या संस्थेस संपर्क साधुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयातीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून दिनांक 1 जुन 2012 पर्यत विनामुल्य मिळतील. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जुन 2012 ही आहे.
     वेळेअभावी प्रवेश अर्ज मागविण्यास अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी साध्या कागदावर स्वत:चे संपुर्ण नांव, वय, पुर्ण पत्ता, शिक्षण, मिळालेली गुण रहिवासी अपंगत्व इ. उल्लेख करुन त्यासोबत संबंधित प्रमाणपत्राच्या छायांकित प्रमाणित प्रतीसह अर्ज करावा. अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, इयत्ता 4 थी 9 वी पासचे गुण पत्रक इत्यादी , असे अधिक्षक , शासकीय प्रौझ् अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, एन. 12 हडको, औरंगाबाद यांनी कळविले आहे.        
                                                                                         *****
शासकीय मुलींचे वसतीगृहामध्ये प्रवेश
     जळगांव, 28   :- जळगांव येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहामध्ये सन 2012-13 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरु आहे.
वसतीगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येतो.
वसतीगृहामध्ये इयत्ता आठवी , अकरावी, बी.ए,बी.कॉम, बी. एस्सी इतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासून प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थींनींना शासनामार्फत मोफत निवास,भोजन,क्रमीक पुस्तके शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येत असून दरमहा रु. 600/- प्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येतो.
 इच्छुक विद्यार्थीनीनी अधिक्षिका, शासकीय मुलींचे वसतीगृह जळगांव येथे संपर्क साधावा असे अधिक्षिका यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेले आहे.