Monday, 19 January 2015

धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची सामुहिक जबाबदारी ! अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद खान यांचे आवाहन


धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची सामुहिक जबाबदारी !
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद खान यांचे आवाहन
                                                   
चाळीसगांव,दिनांक 19:- धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी आज पाचोरा येथे केले. दंगलग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते पाचोरा येथे आले होते प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत अल्पसंख्याक आयोगाचे सचिव मोहम्मद हुसेन मुजावर, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, अप्पर पोलीस अधिक्षक संदिप जाधव, तहसिलदार गणेश मरकड, उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा रमेश गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर रमेश पवार, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, नायब तहसिलदार आबा महाजन, नायब तहसिलदार राजेंद्र नजण आदि उपस्थित होते.
दंगलीमध्ये कुठल्याही समाजातील सभ्य व चांगल्या संस्कृतीच्या लोकांचा समावेश नसतो, समाजातील मुठभर समाजकंटकांचे हे कृत्यु असून शांतता प्रिय शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. घटनास्थळाची पहाणी करतांना त्यांनी दोन्ही समुदायांच्या लोकांशी चर्चा केली असता जनतेला विश्वासात घेऊन तालुका प्रशासनाने दंगलीचे सावट दुर करण्यात यश मिळविल्याने तालुका प्रशासनासह पोलीस प्रशासनाचेही कौतुक करुन दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. नुकसान ग्रस्तांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्ष खान यांनी यावेळी पाचोरा शहरातील आपदग्रस्त भागातील जामा मस्जिद, रंगाल गल्ली, कृष्णापुरी परिसर आदि भागांची पहाणी केली व दोन्ही समाजातील व्यक्तींच्या समस्या, गा-हाणी व तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी जामा मस्जिदचे चेअरमन रशीद देशमुख, नगरसेवक नसिर बागवान, खलील बागवान, कांतीलाल जैन, अझहर शेख आदी समाज सेवकांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त करत काही सुचना मांडल्या. त्याअनुषंगाने अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री.खान यांनी प्रशासनास काही सुचनाही दिल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात म्हणाले की, शांतता प्रिय शहरास अशा घटनांचा गालबोट लागल्याने यात गरिब मजुरांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते व अशा भयभीत वातावरणामुळे मजुर वर्ग मोठया प्रमाणावर स्थलांतरीत होत असतो. तरी मजुर वर्गाने भयभीत न होता पुन्हा आपला व्यवसाय जोमाणे सुरु करावा व आपल्या शांतता  प्रिय शहराची ओळख अबाधित राखण्यास मदत करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
अल्पसंख्याक आयोगाचे सचिव मोहम्मद हुसेन मुजावर यांनी सगळया घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली. तर अप्पर पोलीस अधिक्षक संदिप जाधव यांनी नागरिकांकडून तसेच प्रसारमाध्यमांकडून योग्य सहकार्य मिळाल्याने तपास कामात मोठी मदत झाल्याने समाधान व्यक्त केले. मोहल्ला मिटींग, शांतता समितीच्या बैठका यातही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment