Wednesday, 14 January 2015

वहिवाट रस्ते मोकळे करण्यास मिळाली चालना, खराडीच्या शिवार रस्त्यानेही घेतला मोकळा श्वास


वहिवाट रस्ते मोकळे करण्यास मिळाली चालना
खराडीच्या शिवार रस्त्यानेही घेतला मोकळा श्वास
  चाळीसगांव,दिनांक 14:- सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत लोकसहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहिम राबविण्यात येत असून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे व शेतक-यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील पातोंडया नंतर खराडी येथील अतिक्रमीत ग्रामीण गाडीमार्ग 0.5 कि.मी. हा रस्ता देखील लोकसहभागातून मोकळा करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, सरपंच गोरख राठोड, तलाठी पी.आर.जाधव व मंडळ अधिकारी आर.एस.मोरे यांच्यासह या रस्त्याचा लाभ घेणारे शेतकरी व  ग्रामस्त उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विविध प्रकारचे रस्ते जसे ग्रामीण रस्ते (एका गावाहून दुस-या गावास जाणारे), हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग (पोटखराब), शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग हे सिंचन सुविधा वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी तलाव, कालवे निर्माण झाल्यामुळे, पारंपारिक रस्ते बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न उदभवले, यासाठी पर्यायी सोय म्हणून अतिक्रमीत शेतरस्ते मुक्त करण्याची आवश्यकता भासू लागली. काही गावांच्या पुनर्वसनामुळे गावठाण बदलले असल्यामुळे अतिक्रमीत रस्ते मोकळे करण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक गावा-गावात ग्रामस्थांसोबत बैठका घेण्याचे व चर्चा करुन अतिक्रमीत रस्ते मोकळे करण्याची मोहिम राबविण्याच्या सुचना केल्या त्या अनुषंगाने खराडी येथील तलाठी पी.आर.जाधव व मंडळ अधिकारी आर.एस.मोरे यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करुन अतिक्रमीत असलेला खराडी येथील 0.5 कि.मी. लांबीचा गाडीरस्ता मोकळा केला या रस्त्यामुळे गावातील एकूण पाच शेतक-यांना याचा लाभ होणार असून गावातील जुना मारुती मंदिरात येण्या-जाण्यासाठी देखील या रस्त्यामुळे सोय होणार असल्याचे मंडळ अधिकारी आर.एस.मोरे यांनी कळविले आहे.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या संकल्पनेतुन अतिक्रमीत रस्ते मोकळे करण्यासाठी राबविण्यात येणारी  मोहिम ही शेतक-यांच्या हिताची असून या मोहिमेचा तालुक्यातील अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक गावातील तलाठी व मंडळ अधिका-यांनाही या बाबत मार्गदर्शक सुचना दिल्या असून ग्रामस्थांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

* * * * * * * *

No comments:

Post a Comment