Wednesday, 25 December 2013

कामाच्या प्रतिक्षेत असलेल्या हातांना काम देण्यास शासन कटिबध्द् : पालकमंत्री ना.सावकारे



 कामाच्या प्रतिक्षेत असलेल्या हातांना काम देण्यास शासन कटिबध्द्
                                            : पालकमंत्री ना.सावकारे

            जळगाव, दि. 25 :-  राज्यात वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग कार्यरत असून या दुर्लक्षित असलेल्या विभागामार्फत कामाच्या प्रतिक्षेत असलेल्या हातांना काम मिळवून देण्यास शासन कटिबध्द् असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा कृषि राज्य मंत्री ना.संजय सावकारे यांनी आज भुसावळ येथे आयोजित विभागीय रोजगार मेळावा-2013 च्या कार्यक्रमात केले. रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे संगणकीकरण करण्यात आले असून आता ऑनलाईन नावनोंदणीचे काम सुरु करण्यात आले आहे. या विभागाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना शासकीय नोकरी बरोबर खाजगी क्षेत्रातील  रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रमुख उद्देश समोर ठेवून रोजगार मेळाव्याची संकल्पना उदयास आली आहे. त्याला मिळणारा वाढता प्रतिसाद पहाता बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात येते. ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार वर्ग रोजगारासाठी बाहेर पडण्यास तयार नाही ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी यांवेळी सांगितले.
               राज्यातील मोठमोठया 12 उद्योजकांना व बेरोजगार तरुणांना आमंत्रीत करुन एकूण 1340 रिक्त पदांवर आज भरती प्रक्रीयेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना आमंत्रीत करण्यात आले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरीक्त पोलीस अधिक्षक एन.अंबीका, उपसंचालक रोजगार व स्वयंरोजगार अनिल पवार, सहाय्यक संचालक रोजगार व स्वयंरोजगार प्रकाश सोनवणे यांना आमंत्रीत करण्यात आले होते.
     अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी म्हणाले की, बुध्दी आणि श्रमाची सांगड घालून आलेल्या संधीचे सोने करा. बेरोजगारीचा व दारिद्रयाचा जवळचा संबंध असल्यामुळे रोजगार मिळविण्यासाठी  परिश्रम, धडपड व जिवघेण्या स्पर्धेला सामोरे जा, बुध्दीमत्ता सर्वांची सारखी नसते, आपली बौध्दीक क्षमता व इच्छा ओळखून भविष्याचा वेध घेऊन  योग्य पर्याय निवडा. तारुण्य् ही एक मोठी संपत्ती आहे. उद्योग व्यवसायात मोठया प्रमाणात होणारे आधुनिकीकरणासाठी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन स्वत:शी स्पर्धा करायला शिका व बेरोजगारीपासून मुक्त व्हा असे आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या तरुणांना केले.
     अतिरीक्त पोलीस अधिक्षक एन.अंबिका यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर उपसंचालक रोजगार व स्वयंरोजगार अनिल पवार व सहाय्यक संचालक प्रकाश सोनवणे यांनी समायोचित भाषणे केली.
      यावेळी पंचायत समितीच्या सभापती मंगलाताई झोपे, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पाटील, उप विभागीय अधिकारी विजय भामरे, जिल्हा परिषद तथा पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आदि मान्यवरांसह तरुण बेरोजगार मोठया संख्यने उपस्थित होते.


* * * * * * *

No comments:

Post a Comment