Monday, 1 July 2013

शेतक-यांच्या बांधावर खत योजनेची पुर्नरचना आवश्यक - कृषीराज्यमंत्री श्री. संजय सावकारे

जळगांव, दि. 1 :- राज्य शासन शेतक-यांसाठी विविध योजना राबवित आहे. कृषी विभागाची शेतक-यांना शेतक-यांच्या बांधावर खत पुरविण्याची योजना असून ती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्याची पूर्नरचना करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे कृषी कृषीराज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भुसावळ येथील कार्यक्रमात व्यक्त केले. भुसावळ पंचायत समितीच्यावतीने आय. एम. ए. सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ पंचायत समितीच्या सभापती श्रीमती मंगलाताई ज्ञानदेव झोपे  होत्या प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती शेख खलील गनी,जिल्हा परिषद सदस्य र्स्वश्री संजय पाटील, समाधान पवार, राजेंद्र साहेबराव चौधरी, श्रीमती मंदाताई अवसरमल, पंचायत समिती सदस्य संतोषभाऊ निसळकर, मुरलीधर पाटील, पंचायत समिती सदस्या श्रीमती अलकाताई पारधी, मनिषाताई पाटील, विजयाताई मोरे उपस्थित होत्या.
              सावकारे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, नव नवीन प्रयोग करुन शेतकरी आपले शेती उत्पादन वाढवीत असतो असे चांगले कार्य  करणा-या शेतक-यांचा कृषी दिनी सन्मान केला जातो. शेतक-यांपर्यत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी काही अधिकारी, कर्मचारी उत्तम कामगरी करीत असतात अशा अधिकारी व कर्मचा-यांचा उचित सन्मान कृषी दिनी शासनाकडून झाला पाहिजे! यासाठी मी शासन दरबारी प्रयत्न करीन जलसंधारणात शेत तळयाचे अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर शेततळी निर्माण करीत असून त्यांचे दृष्य परिणाम पहाव्यास मिळत आहे. भुसावळ तालुक्यातील शेतकरी यात मागे का ?  असा प्रश्न मला पडतो ! योजना त्यांच्या पर्यत पोहचली नाही किंवा त्यांना याचे महत्व पटलेले नाही ! याची माहिती मी घेणार आहे. शेतक-यांनी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबिणे ही काळाची गरज असल्याचेही ते  म्हणाले.
           प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते कै. वसंतरावजी नाईक, यशवंतराव चव्हाण , सरस्वतींच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
             या कार्यक्रमास गट विकास अधिकारी आर. पी. तायडे, तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. झांबरे, कृषी अधिकारी एस. जी. पाटील, ए. डी. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. किसान गप्पागोष्टी कार्यक्रमात पाणी व्यवस्थापनावर डॉ. जडे, हिवरे सर, आत्माचे प्रमोद जाधव यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील शेतकरी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment