Friday, 9 September 2016

उत्कृष्ट अधिकारी म्हणून झालेला गौरव केवळ माझा नसून सर्व कर्मचाऱ्यांचा : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील


उत्कृष्ट अधिकारी म्हणून झालेला गौरव
केवळ माझा नसून सर्व कर्मचाऱ्यांचा
                                                   : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील

चाळीसगाव दि. 09 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीसगांव उपविभागाची सुरवात करतांना झालेली दमछाक व कर्मचारी/सहकार्यांची लाभलेली साथ यामुळेच चाळीसगावातील प्रशासकीय कामातून उत्कृष्ट अधिकारी म्हणून महसूल दिनी झालेला गौरव हा केवळ माझा नसून सर्व कर्मचारी/सहकार्यांचा आहे. तालुक्यातील प्रत्येकाने माझ्यावर भरभरून प्रेम केले. या प्रेमाची शिदोरी कायमच माझ्याबरोबर राहील असे भावोद्गार मावळते उप विभागीय अधिकारी मनोज घोडे-पाटील यांनी व्यक्त केले.
            तहसिल कार्यालयातील सभागृहात तत्कालीन उप विभागीय अधिकारी  श्री.मनोज घोडे पाटील यांची फैजपूर येथे बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, उपनगराध्यक्ष शाम देशमुख, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, तहसिलदार कैलास देवरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी राजपुत, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व महसूलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना श्री.घोडे-पाटील म्हणाले, चाळीसगावात रूजू झाल्यापासून खान्देशच्या वेगळ्या संस्कृतीची अस्मिता दिसून आली. सर्वसामान्य माणसांसाठी काम केले. त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. उप विभागाचा प्रमुख या नात्याने प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून घेत त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. लोकांची सेवा करणे हेच आपले काम आहे, हीच भावना मनात ठेवून चांगले काम करु शकलो. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवितांना प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यात कोणताही वाईट हेतु नव्हता असेही श्री.घोडे-पाटील यांनी नमूद केले.
            यावेळी तहसिलदार कैलास देवरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, चांगल्या अधिकाऱ्यांचा सहवास  व मार्गदर्शन मिळाल्यास प्रशासकीय कामांना योग्य दिशा मिळते. प्रातांधिकारी मनोज घोडे पाटलांच्या सुक्ष्म नियोजनामुळे महाराजस्व अभियानातून तालुक्याला बहुमान मिळाला. त्यांच्या कार्यकाळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह सातबारा संगणकीकरणाचे उत्कृष्ट काम तालुक्यात झाले आहे. कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन नैतीक पाठबळ, आधार व प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांना आज निरोप न देता शुभेच्छा देण्यात येत असल्याचेही श्री.देवरे यावेळी म्हणाले.
            यावेळी प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र जाधव, लक्ष्मण शिरसाठ, देवीदास पाटील, नानासाहेब आगळे, शैलेंद्र परदेशी, मंडळ अधिकारी बोरसे, तलाठी सचिन मोरे, शितल गढरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी केले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment