Thursday, 8 September 2016

शेतकऱ्यांना देणार हक्काचं पाणी आणि वीज - ना.गिरीष महाजन


लोहारा येथे महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर
शेतकऱ्यांना देणार हक्काचं पाणी आणि वीज -ना.गिरीष महाजन

 जळगाव दि.7- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे हे ध्येय्य डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखली आहेत. राज्य सरकार त्यानुसार आपले काम करीत आहे. गेल्या दीड- दोन वर्षात योग्य नियोजन केल्याने आता शेतकऱ्यांना वीज मिळू लागली आहे, तर राज्यातील सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. त्यासाठी केंद्राकडून 17 हजार कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांनी आज लोहारा येथील सभेत बोलतांना दिली.
मुख्यमंत्री समाधान शिबिर योजना राबवून त्यामाध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यासाठी सध्या जामनेर विधानसभा क्षेत्रात समाधान शिबिर योजना राबविली जात आहे. या योजनेमुळे ‘शासन आपल्या दारी’चा प्रत्यय जनतेला येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आज लोहारा येथे दाखल्यांसाठी नोंदणी व दाखले वितरण करण्यात आले. यावेळी ना. गिरीष महाजन, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, कृषिभूषण विश्वासराव पाटील, शिवाजी सोनार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
 या कार्यक्रमात ना.महाजन व खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ना. महाजन म्हणाले की, पुर्वी दाखले मिळविण्यासाठी कचेऱ्यांमध्ये फेऱ्या माराव्या लागत. मात्र विद्यमान शासन लोकाभिमुख असल्याने थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे. लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यात या उपक्रमाला गती देण्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज बस याभागात आणून गावोगावी जाऊन दाखले देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ना. महाजन यांनी सांगितले.
 त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. त्यासाठी शेतकऱ्याला हक्काचं पाणी आणि वीज देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे, असे त्यांनी सांगितले.
 यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनीही गरजूंपर्यंत शासन यंत्रणा पोहोचून लाभ देत असल्याबद्दल उपक्रमाचे कौतूक केले.
यावेळी शिबिराचे प्रमुख समन्वयक अरविंद देशमुख यांनी उपस्थितांना या शिबिराची माहिती दिली. तर तहसिलदार दीपक पाटील यांनी शिबीराच्या कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना सांगुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. या शिबीरास डॉ. के.ई.चौधरी. हसन कुरेशी, मरियम कुरेशी, सीमा पाटील, बाळू गुजर,  शेखर काळे,  प्रमोद पाटील, सागर भोई, रुपा बाविस्कर,  प्रभाकर माळी, सविता निकम, आदी प्रमुख पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने लोहारा आणि पंचक्रोशीतील शेतकरी , नागरिक उपस्थित होते.
मंत्र्यांनी स्वतः घरी जाऊन दिली शिधापत्रिका
लोहारा येथे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरात अनेक लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले. याच गावात राहणाऱ्या बेबाबाई भिल या वृद्धेस द्यावयाची शिधापत्रिका स्वतः मंत्री महोदय ना. गिरीष महाजन यांनी तिच्या झोपडीत जाऊन दिली. झोपडी समोर जेव्हा हा लालदिव्याची गाडी आणि मंत्र्यांचा ताफा थांबला तेव्हा या वस्तीतील लोक आश्चर्यचकित झाले.  तेथे शेजारीच राहणाऱ्या शांताराम भिल यांनाही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना दिली जाणारी पिवळी शिधापत्रिका स्वतः मंत्र्यांनी दिली. खासदार रक्षाताई खडसे, प्रांताधिकारी शर्मा, तहसिलदार दीपक पाटील यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ या उक्तीची खरीखुरी प्रचिती यानिमित्ताने लोहारेवासीयांना आली.
* * * * * * *

No comments:

Post a Comment