Thursday, 29 September 2016

चाळीसगाव प्रातांधिकारी पदी शरद पवार रुजू


चाळीसगाव प्रातांधिकारी पदी शरद पवार रुजू

चाळीसगाव दि. 29 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीसगावचे तत्कालीन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांची फैजपूर प्रातांधिकारी पदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर बिलोली जि.नांदेड येथील उपविभागीय अधिकारी शरद भगवान पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्या अनुषंगाने श्री.पवार यांनी चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.
            मुळचे कराड ता.सातारा येथील रहिवासी असलेले शरद पवार यांचे शिक्षण एम.एस.सी.ॲग्री पर्यंत झाले आहे. एक वर्ष तालुका कृषी अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावल्यानंतर त्यांनी  मे-2014 रोजी महसूल प्रशासनातील उप विभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. बिलोली येथे कार्यरत असतांना त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यातही मोठे यश संपादन केले आहे.
            चाळीसगाव तालुक्यात हजर होतांना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले, तर तालुक्यातील लोकप्रतिनीधींसह सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून चांगले काम करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



* * * * * * * *

Tuesday, 27 September 2016

अभय योजनेच्या लाभासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

अभय योजनेच्या लाभासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


            विक्रीकराबाबतच्या प्रलंबित प्रकरणांसाठी महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड अधिनियम-2016 अंतर्गत कलम 2, 4 व 5 मध्ये सुधारणा करुन अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींची पूर्तता करण्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2016 वरुन 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत वाढविण्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
            विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये अनेक वर्षे अडकून पडलेल्या विक्रीकराचा महसूल उपलब्ध होऊन त्याचा कल्याणकारी योजनांसाठी उपयोग होण्यासाठी विक्रीकर विभागामार्फत अभय योजना सुरू करण्याचे यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड अधिनियम-2016 संमत करण्यात आला. त्यातील कालावधीत करण्यात येणाऱ्या वाढीसाठी करावयाच्या बदलाच्या प्रारुपास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.

* * * * * * *

वैद्यकीय शिक्षण विभागाचे बळकटीकरण करणार - गिरीष महाजन

वैद्यकीय शिक्षण विभागाचे बळकटीकरण करणार - गिरीष महाजन

मुंबई, दि. 27 : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा राज्य शासन देत आहेत. रुग्णांना उत्कृष्ट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने  शिक्षण, रुग्णसेवा व संशोधन याना चालना देऊन वैद्यकीय शिक्षण विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांनी दिली.
            आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वित्तमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. महाजन बोलत होते. या बैठकीस, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्र. वाकोडे, आयुर्वेदचे सहसंचालक वै. श्रद्धा सुडे, विधी व न्याय विभागाचे सहसचवि राजेंद्र सावंत, जे.जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता तात्यावर लहाणे यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            श्री. महाजन पुढे म्हणाले की, राज्यात एकूण १६ शासकीय महाविद्यालय, ३ दंत महाविद्यालय व ४ आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच एक रसशाळा कार्यरत आहे. या सर्व महाविद्यालयात उत्तम प्रकारचे शिक्षण व सेवा देण्याच्या उद्येशाने बैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांना कालबध्द पदोन्नती / वेतनश्रेणी लागू करण्याबाबत, ग्रामीण भागातील वैद्यकिय महाविद्यालयामधील अध्यापकांना दुप्पटीने व्यवसायरोध भत्ता देण्योबाबत,नियमित व करार पध्दतीने नेमण्यात आलेल्या अध्यापकांना देण्यात येणारा मोबदला वाढवून देण्याबाबत, पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाढविण्याबाबत अतिरिक्त वित्तीय तरतूद करण्याबाबत,संचालनालय वैद्यकिय शिक्षण विभागामध्ये १ महासंचालक, ८ उपसंचालक आणि नेत्र संचालक महाराष्ट्र राज्य अशी पदे निर्माण करण्याबाबत, सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत, संचालक वैद्यकिय शिक्षण अंतर्गत स्वतंत्र सी.एस.आर.कक्ष निर्माण करण्याबाबत, संचालक वैद्यकीय शिक्षण अंतर्गत स्वतंत्र लीगल सेल निर्माण करण्याबाबत, ई-ऑफिस प्रणाली/एच.एम.आय.एस. प्रणाली सक्षमरित्या कार्यरत करण्याबाबत, प्रत्येक वैद्यकिय महाविद्यालयात नोडल ऑफिसर नियुक्ती करण्याबाबत, प्रत्येक वैद्यकिय महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स सेंटर सुरु करण्याबाबत, गोंदिया व चंद्रपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये सर्व पदे निर्माण करण्याबाबत, टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ४ विभागात कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याबाबत,सर ज.जी. रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करिता येत्या ३ वर्षात ६५० कोटी निधी उपलब्ध करण्याबाबत, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दंत विभाग सुरु करण्याबाबत व लागणा-या ४८ अध्यापकांना जागा तसेच लागणारी यंत्र सामुग्री व जागा उपलब्ध करण्याबाबत,प्रत्येक शासकिय महाविद्यालयामध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरु करणे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात नवीन सुपर स्पेशालिटी विभाग सुरु करणे. इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिसेस हा विभाग सर्व शासकिय महाविद्यालयात पदवीत्तर अभ्यासक्रम म्हणून सुरु करणे इत्‍यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
            यावर वित्त विभागाकडून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन मा. वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्याकडून मिळाले. त्यामुळे या माध्यमातून निश्चितच वैद्यकीय शिक्षण विभागाचे बळकटीकरण होईल असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केला.
* * * * * * 

Wednesday, 21 September 2016

जळगांव जिल्ह्याचे दिनांक 22 सप्टेंबर, 2016 पर्यंतचे पर्जन्यमान . . .


जळगाव जिल्ह्याचा धरणसाठा दिनांक 22 सप्टेंबर, 2016 अखेर . . .


डेंग्यु आजार नियंत्रणासाठी लोकसहभाग महत्वाचा : तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लांडे

डेंग्यु आजार नियंत्रणासाठी लोकसहभाग महत्वाचा
                                                      : तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लांडे

चाळीसगाव दि. 21 (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यात किटकजन्य आजाराचे डेंग्यु सदृश्य रुग्ण आढळून येत आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये किटकजन्य (डेंग्यु) साथरोग प्रतिबंध पंधरवाडा राबविण्यात येत असून या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शहरातील काही भागात अतिवर्षा तर काही भागात दुर्भिक्ष, वाढते शहरीकरण, स्थलांतरांचे प्रश्न विविध विकास कामे या व अश्या अनेक कारणांमुळे किटकजन्य (डेंग्यु) आजाराचे प्रमाण विविध भागात आढळते. या पार्श्वभुमीवर किटकजन्य आजारांचे प्रभावी पणे प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी 20 सप्टेंबर ते 04 आक्टोंबर 2016 दरम्यान चाळीसगाव तालुक्यात शहरी व ग्रामिण भागामध्ये किटकजन्य (डेंग्यु) साथरोग प्रतिबंध पंधरवाडा साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
         साथरोग पंधरवाडा आयोजनाच्या अनुषंगाने तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा संपन्न्‍ झाली. कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी डेंग्यु आजाराच्या नियंत्रणासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे सांगत तालुक्यातील ग्रामिण/शहरी भागात डासांचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक गावात वार्डनिहाय स्वच्छता मोहिम राबविणे, निरुपयोगी टायर्स, नारळाच्या करवंट्या, प्लास्टीकच्या वस्तु या अशा अनेक अनावश्यक गोष्टी नष्ट करणे, गावातील खतांचे खड्डे व उकिरडे  गावाबाहेर नेणे पाण्याची डबकी बुजवणे तसेच साचणारे पाणी नेहमी प्रवाहित ठेवणे, शौचालयाच्या पाईपला व घरांच्या  खिडक्यांना जाळया बसविणे. आठवडयातील 1 दिवस कोरडा दिवस पाळणे, या दिवशी घरांतील सर्व भांडी धुवून पुसून कोरडी करणे, डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यात गप्पी मासे साडणे, इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांना झाकणे बसविणे, पिंप व सिमेंट टाक्यांत अनावश्यक पाणी साठा करू नये. शहरी/निमशहरी भागात साप्ताहिक अळ्या नाशकाचा (ॲबेट) वापर करावा, गप्पी मासे पैदास केंद्राची सुयोग्य देखभाल करावी, उद्रेकजन्य परिस्थितीत गावात, वार्डात धुरळणी करणे इत्यादी उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधितांना यावेळी सुचना देण्यात आल्या.
लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण देऊन व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिम आरोग्य विभागामार्फत राबविली जात आहे. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवीका घरोघरी गृहभेटी देऊन प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देत आहेत. प्रत्येक दिवशी काय कार्यवाही करावी व धडककृती कार्यक्रम राबवून या आजारावर कसे नियंत्रण मिळवीता येईल याबाबत चर्चा व नियोजन या कार्यशाळेत करण्यात आले. कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना जिल्हा साथरोग शास्त्रज्ञ डॉ.बाळासाहेब वाबळे, तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  

* * * * * * * *

डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी . . .


डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी . . .
               
 सध्या जिल्ह्यात किटकजन्य आजाराचे आणि तापाचे डेंग्यु सदृश्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतांना दिसतात. काही भागात अतिवर्षा तर काही भागात दुर्भिक्ष, वाढते शहरीकरण, कचऱ्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचे सदोष व्यवस्थापन, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल या व अशा अनेक कारणांमुळे किटकजन्य (डेंग्यु) आजाराचे प्रमाण विविध भागात आढळून येत आहे. या पार्श्वभुमीवर डेंग्यु आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळविण्यासाठी थोडे . .

            जगामध्‍ये डेंग्‍यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्‍ण, समशितोष्‍ण व उष्‍ण कटीबंधात आढळून आलेला आहे. डेंग्‍यूचा पहिला उद्रेक इसवी सन 1635 मध्‍ये फेंच वेस्‍ट इंडीज येथे आढळून आला. डेंग्‍यू ताप व एडिस इजिप्‍टाय डास प्रामुख्‍याने जगातील शितोष्‍ण कटिबंधात पसरलेला आहे. सध्‍या 25 दशलक्ष लोक डेंग्‍यू संवेदनशील भागात वास्‍तव्‍य करतात. आजतागायत जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या (डब्‍ल्‍यू.एच.ओ.) सहा विभागात (युरोप व्‍यतिरिक्‍त) डेंग्‍यूचा मोठया प्रमाणात उद्रेक आढळून आलेला आहे. डेंग्‍यू हा विषाणू पासून होणारा आजार असून त्‍याचा प्रसार एडीस ईजिप्‍टाय डासांमार्फत होतो. मागील दोन दशकांपासून डेंग्‍यू, ताप, डेंग्‍यू रक्‍तस्‍त्रावीताप व डेंग्‍यू शॉक सिंड्रोमचे रुग्‍ण संपूर्ण जगात आढळून आलेले आहेत व त्‍यात सातत्‍याने वाढ होत आहे. डेंग्‍यू हा डासापासून पसरणारा गंभीर विषाणूजन्‍य आजार आहे. डेंग्‍यूताप (डी.एफ.) व डेंग्‍यू रक्‍तस्‍त्रावी ताप (डी.एच.एफ.) हा डेंग्‍यू विषाणू 1,2,3 व 4 पासून होतो व त्‍यांचे सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात.
            हा आजार कोणाही व्‍यक्तिला होऊ शकतो, मात्र प्रामुख्‍याने लहान मुलांना डेंग्‍यू संसर्गाचा धोका अधिक असतो.  डेंग्‍यू उद्रेकासाठी पर्यावरणातील खालील विविध घटक कारणीभूत आहेत.
Ø  अनियंत्रित लोकसंख्‍या वाढ.
Ø  अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण.
Ø  कच-याचे अपुरे व अयोग्‍य व्‍यवस्‍थापन.
Ø  पाणीपुरवठयाचे सदोष व्‍यवस्‍थापन – पाण्‍याचे दुर्भिक्ष्‍य आणि अनियमित पाणीपुरवठा.
Ø  जागतिक पर्यटनात होणारी वाढ.
Ø  ग्रामीण भागातील मानवी हस्‍तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल
 रोगाचा प्रसार 
मानवातील संसर्ग हा विषाणू बाधित एडिस एजिप्‍टाय डास चावल्‍यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानव – डास –मानव असा असतो. या डासांची उत्‍पत्‍ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्‍या व टाकाऊ वस्‍तू (मोटारीचे टायर, नारळाच्या करवंट्या,फुलदाणी, झाडांच्या कुंड्या, कुलर व फ्रीज मध्ये साठणारे पाणी) यात साठविलेल्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात होते.
 अधिशयन काळ 
विषाणू बाधित डासाने चावा घेतल्‍यानंतर लक्षणे 5 ते 6 दिवसांच्‍या अधिशयन काळात दिसून येतात. मात्र हा काळ 3 ते 10 दिवसांपर्यतचा असू शकतो.
रोगांची सर्वसाधारण चिन्‍हे व लक्षणे
डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्‍यामागे दुखणे इ. रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्‍याच्या सोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसात याची लक्षणे साध्‍या डेंग्‍यू तापासारखी असतात व क्‍वचित त्‍वचेवर पुरळ दिसून येतात. रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू तापाचे निदान अंगावरील दर्शनिय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्‍या पुरळांवरुन केली जाते. नाकातून, हिरडयातून व गुदव्‍दारातून रक्‍तस्‍त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.
रोग निदान
Ø  DF व DHF चे निदान रक्‍तजल चाचणीव्‍दारे (Serology) निश्चित केले जाते. IgM अॅन्‍टीबॉडी लक्षणे दिसू लागल्‍यानंतर आठवडयाने दिसून येतात आणि त्‍यानंतर सुमारे 1 ते 3 महिन्‍यांपर्यत आढळतात.
Ø  10 दिवसानंतर घेतलेल्‍या दुस-या रक्‍तजलनमून्‍यात IgG अॅन्‍टीबॉडीजमध्‍ये वाढता आलेख दिसून आल्‍यास निश्चित निदान ग्राहय धरले जाते.
Ø  IgGअॅन्‍टीबॉडीजआढळून येणे हे पूर्वीचा संसर्ग असल्‍याचे लक्षण असून रक्‍तजल चाचणीव्‍दारे रोगाची सदयस्थिती व रुग्‍णाची प्रतिकारशक्‍ती यांचा स्‍थानिक पातळीवर अभ्‍यास करण्‍यासाठी उपयोग केला जातो.
औषधोपचार
डेंग्‍यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत, तथापि रोगलक्षणानुसार उपचार करावे. या रुग्‍णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि झटके प्रतिबंधक औषधे देऊ नयेत.  
Ø  डेंग्‍यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्‍यास त्‍या रुग्‍णाला संपूर्ण विश्रांती (बेड रेस्‍ट ) घेणेबाबत सल्‍ला देणे.
Ø  रुग्‍णाचे तापमान 39 डिग्री सेल्सिअसच्‍या खाली राहण्‍यासाठी ताप प्रतिबंधक (केवळ पॅरासिटेमॉल) औषधे देणे
  व रुग्‍णांना ओल्‍या कपडयाने पुसून घेणे.
Ø  ज्‍या रुग्‍णांना मोठ्या प्रमाणात वेदना होतात त्‍यांना वेदनाशामक औषधे देण्‍याची आवश्‍यकता भासू शकते.
Ø  ज्‍या रुग्‍णांना मोठया प्रमाणात उलटया, जुलाब, मळमळ व घाम येतो अशा रुग्‍णांच्‍या शरीरातील क्षार / पाणी
  कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्‍या फळांचा रस व ओ.आर.एस.चे द्रावण दयावे.
Ø  डेंग्‍यू तापाच्‍या व्‍यवस्‍थापनाप्रमाणेच डेंग्‍यू शॉक सिंड्रोमचे व्‍यवस्‍थापन करावे.
Ø  शरीरात जास्‍त प्रमाणात पातळ द्रव जातील याची काळजी घ्‍यावी.
Ø  वैदयकिय आवश्‍यकतेनुसार रक्‍त /रक्‍तद्रव संक्रमण
प्रतिबंधात्‍मक उपाययोजना
Ø  नियमित सर्वेक्षण (अ) प्रत्‍यक्ष (ब) अप्रत्‍यक्ष
Ø  उद्रेकग्रस्‍त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण.
Ø  हिवतापासाठी रक्‍तनमूने गोळा करणे आणि त्‍याची तपासणी करणे.
Ø  उद्रेकग्रस्‍त भागातील संशयित डेंग्‍यूच्‍या रुग्‍णांपैकी ५ टक्‍के रुग्‍णांचे रक्‍तजलनमूने सर्वेक्षण रुग्‍णालयामध्‍ये  
  विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
Ø  उद्रेकग्रस्‍त गावात धूरफवारणी.
Ø  डेंग्‍यूचा रोगवाहक शोधण्‍यासाठी (एडीस ईजिप्‍टाय) किटकशास्‍त्रीय सर्वेक्षण करावे.
Ø  भांडी तपासणी सर्वेक्षण करुन घर निर्देशांक (हाऊस इंडेक्‍स) व ब्रॅटयू निर्देशांक (ब्रॅटयू इंडेक्‍स) काढणे.
Ø  ज्‍या भांडयामध्‍ये एडीसच्‍या अळया आढळून आलेल्‍या आहेत ती सर्व भांडी रिकामी करणे.
Ø  जी भांडी रिकामी करण्‍यायोग्‍य नाहीत अशा भांडयामध्‍ये टेमिफॉस अळीनाशक टाकणे.
Ø  आरोग्‍य शिक्षण
आरोग्य संदेश
1.      आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.
2.      पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे.
3.      घरा भोवतालची जागा  स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी.
4.    घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकऊ साहित्‍य ठेऊ नये.
                                                                                       संकलन :
मनोहर पाटील,
प्र.माहिती सहाय्यक,
उप माहिती कार्यालय, चाळीसगांव


* * * * * * * *

Saturday, 17 September 2016

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

          चाळीसगाव दि. 17 (उमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारांच्या छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 16 सप्टेंबर,2016  ते  05 जानेवारी, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
       या कार्यक्रमात 16 सप्टेंबर, 2016 रोजी  प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार असून 16 सप्टेंबर ते 14 आक्टोंबर, 2016 दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.  16 सप्टेंबर, 2016 (शुक्रवार) व 30 सप्टेंबर,2016 (शुक्रवार) रोजी मतदार यादीमधील संबंधित भागांचे/सेक्शनचे/ग्रामसभा/स्थानिक संस्था येथे वाचन तर आरडब्ल्युए सोबत बैठक आणि नावांची खातरजमा करण्यात येईल. 18 सप्टेंबर, 2016 (रविवार) व  09 ऑक्टोंबर,2016 (रविवार) रोजी विशेष मोहीम राबविण्यात येईल. 16 नोव्हेंबर, 2016 (बुधवार) पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. 15 डिसेंबर,2016 संपुर्ण डाटाबेसचे अद्यावतीकरण  तर 05 जानेवारी 2017 रोजी अंतिम मतदार यादया प्रसिध्द केल्या जातील या प्रकारे मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
     तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.



* * * * * * * *

तालुक्यात राबविणार कुष्ठरोग शोधमोहिम : आरोग्य अधिकारी डॉ.लांडे

तालुक्यात राबविणार कुष्ठरोग शोधमोहिम
                                                         : आरोग्य अधिकारी डॉ.लांडे

चाळीसगाव दि. 17 (उमाका वृत्तसेवा) :  केंद्र शासनाच्या प्रगती योजनेतंर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यात 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर, 2016 या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह 2 ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संशयीत रुग्णांचे मोफत निदान व उपचार केले जातील, या मोहिमेचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी केले आहे.
            या त्वचारोग व कृष्ठरोग शोध मोहिमेत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचे पथक प्रत्येक घरोघरी जाऊन कृष्ठरोगाबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहेत. सर्व्हेक्षणादरम्यान संशयीत रुग्ण आढळल्यास त्याचे मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन संपुर्ण कुटूंबाची तपासणी करण्यासाठी योगदान द्यावे.
            या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले असून ग्रामीण भागात 255 तर शहरी भागात 14 पथकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक गावनिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 538 आशा व स्वयंसेवक 14 दिवस घरोघरी जावून घरातील सर्व सदस्यांची फिक्कट लालसर न खाजवणारा,  न दुखणाऱ्या बधीर चट्टयाची तपासणी करणार आहेत. तालुक्यातील 130 पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवणार असून बाधीत रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत.
            त्वचारोग व कुष्ठरोगावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्यामुळे समाजामध्ये या रोगाविषयी असलेले समज गैरसमज बाजूला सारुन संशयीत रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेत तात्काळ निदान व उपचार घेतल्यास रोगप्रसाराला आळा बसू शकेल. तालुक्यातून अशा रोगांना हद्दपार करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            प्रगती योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन मोहिम ही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्याचे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.जयवंत मोरे यांचे आदेशानुसार आयोजित करण्यात आली आहे. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी तालुका स्तरावरुन आरोग्य विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे, तालुका पर्यवेक्षक भागवत देवरे, श्रीमती नरवाडे, तालुका कृष्ठरोग तंत्रज्ञ हमीद पठाण, धनंजय जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभणार असल्याचेही श्री.लांडे यांनी कळविले आहे.



* * * * * * * *

Monday, 12 September 2016

जलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उपयुक्त ठरेल जलयुक्त शिवार योजना : ना.गिरीष महाजन


जलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी
उपयुक्त ठरेल जलयुक्त शिवार योजना
                                                         : ना.गिरीष महाजन
चाळीसगाव दि. 12 (उमाका वृत्तसेवा) :  राज्यात जलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.गिरीष महाजन यांनी आज केले. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील जलयुक्त शिवार योजनेच्या जलपुजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी  ते बोलत होते.
            यावेळी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील, सरपंच देविदास साळुंखे, तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र राठोड, विश्वजीत पाटील, खेडगांवचे सुपुत्र तथा आयबीएन लोकमतचे प्रफुल्ल साळुंखे, समन्वय समिती सदस्य सुनिल साहेबराव पाटील, राजेंद्र चौधरी, किरण साळुंखे, जि.प.सदस्य प्रभाकर जाधव, पं.स.सदस्य जगन्नाथ महाजन व धनंजय मांडोळे, मार्केट कमीटी सदस्य ॲङ राजेंद्र सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, साहेबराव साळुंखे, हेमंत साळुंखेंसह पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
            यावेळी बोलतांना ना.श्री.महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पथदर्शी काम होणार असून या कामातून संपुर्ण राज्यातील गावे जलयुक्त होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर जलसंपदा विभागामार्फत प्रथमच खरेदी करण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीचा शुभारंभ खेडगांव पासुन करण्यात आल्याने या गावातील कामेही पथदर्शी ठरतील असे त्यांनी यावेळी नमुद केले.
            पुढे बोलतांना ना.श्री.महाजन म्हणाले की, विवाह सोहळा व आजारपण यांच्या खर्चामुळे बेजार होऊन मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतात, मात्र आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन कुठल्याही गंभीर आजाराच्या उपचारासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याची सामाजीक जबाबदारी स्विकारत गरजुंनी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            यावेळी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृध्द करण्याची योजना आहे. मात्र  जुवार्डी, खेडगांव, खेडी, पोहरे येथील लघु पाटबंधारे अंतर्गत असलेल्या जुन्या पाटचाऱ्यांची दुरूस्ती तसेच डाव्या पांझण कालव्यातंर्गत असलेल्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती निधीअभावी प्रलंबीत असून त्यास शासनाने निधी पुरविण्याची मागणी केली. तर ना.श्री.महाजन यांनी खेडगांवसह पंचक्रोशीतील गावांना जलसमृध्द करण्यासाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.
            यावेळी खेडगावचे सुपूत्र प्रफुल्ल साळुंखे यांनी गावाच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला सारून विकासकामांना चालना देण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांना निवेदन देत गावातील 12 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी 160 कोटी खर्च अपेक्षीत आहे मात्र हे  संपुर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाचे कृषी, रोहयो व जलसंपदा विभाग एकवटून तसेच अपेक्षीत लोकसहभाग मिळाल्यास केवळ 6 कोटीमध्ये पुर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यास गावकऱ्यांनीही भरभरुन प्रतिसाद यावेळी दिला.

* * * * * * * *

Sunday, 11 September 2016

जळगाव जिल्ह्याचा धरणसाठा दिनांक 12 सप्टेंबर, 2016 अखेर . . .


जळगांव जिल्ह्याचे दिनांक 12 सप्टेंबर, 2016 पर्यंतचे पर्जन्यमान . . .


समाधान शिबीराचा चाळीसगाव पॅटर्न ठरेल आदर्शवत :आमदार उन्मेश पाटील


समाधान शिबीराचा चाळीसगाव पॅटर्न ठरेल आदर्शवत
                                                         :आमदार उन्मेश पाटील

चाळीसगाव दि. 11 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीगावात जुलै महिन्यात आयोजीत भव्य अशा समाधान शिबीरात महसूल प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात दाखले वाटप करण्यात आले होते. समाधान शिबीराचा चाळीसगाव पॅटर्न हा राज्यभर आदर्शवत ठरेल असा विश्वास तालुक्याचे आमदार उन्मेशदादा पाटील यांनी आज व्यक्त केला. चाळीसगावातील यशस्वी शिबीराची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या खामगाव महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आमदार श्री.पाटील बोलत होते.
            जुलै महिन्यात आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव येथे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील व जलसंपदामंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य समाधान शिबिरात महसूल प्रशासनामार्फत 71 हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 67 प्रकारच्या विविध योजनांचाही समावेश करण्यात आला होता. या यशस्वी शिबीराची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असून यामाध्यमातून शासन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून राबविण्यात आली आहे. या समाधान शिबिराची दखल घेत संपूर्ण राज्यभरात या शिबिरासारखे मोठे शिबिर तालुकास्तरावर आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
त्याअनुषगाने समाधान शिबिराची माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री ना.पांडुरंगजी फुंडकर व खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या सूचनेवरून खामगावचे प्रांताधिकारी श्री.बंडे व तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी महसूल प्रशासनासह आमदार उन्मेशदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी तहसिलदार कैलास देवरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे व नानासाहेब आगळे आदी उपस्थित होते. लोकाभिमुख आणि गतिमान शासन-प्रशासन जनतेच्या हितासाठी राबविणे यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा समन्वय अत्यंत गरजेचा असून क्रियाशील कार्यकर्ते यांच्या मेहनतीनेच शिबिर यशस्वी करू शकलो अशी भावना यावेळी आमदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी तहसिलदार कैलास देवरे म्हणाले, चाळीसगाव येथे भरविण्यात आलेल्या भव्य अशा समाधान शिबीराची राज्यभरातुन माहिती मागविली जात आहे. राज्याला पथदर्शी ठरेल अशा उपक्रमांसाठी आमचे महसूल प्रशासन सदैव तयार असल्याचा विश्वास त्यांनी खामगाव येथून आलेल्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला.
* * * * * * * *

Friday, 9 September 2016

उत्कृष्ट अधिकारी म्हणून झालेला गौरव केवळ माझा नसून सर्व कर्मचाऱ्यांचा : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील


उत्कृष्ट अधिकारी म्हणून झालेला गौरव
केवळ माझा नसून सर्व कर्मचाऱ्यांचा
                                                   : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील

चाळीसगाव दि. 09 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीसगांव उपविभागाची सुरवात करतांना झालेली दमछाक व कर्मचारी/सहकार्यांची लाभलेली साथ यामुळेच चाळीसगावातील प्रशासकीय कामातून उत्कृष्ट अधिकारी म्हणून महसूल दिनी झालेला गौरव हा केवळ माझा नसून सर्व कर्मचारी/सहकार्यांचा आहे. तालुक्यातील प्रत्येकाने माझ्यावर भरभरून प्रेम केले. या प्रेमाची शिदोरी कायमच माझ्याबरोबर राहील असे भावोद्गार मावळते उप विभागीय अधिकारी मनोज घोडे-पाटील यांनी व्यक्त केले.
            तहसिल कार्यालयातील सभागृहात तत्कालीन उप विभागीय अधिकारी  श्री.मनोज घोडे पाटील यांची फैजपूर येथे बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, उपनगराध्यक्ष शाम देशमुख, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, तहसिलदार कैलास देवरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी राजपुत, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व महसूलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना श्री.घोडे-पाटील म्हणाले, चाळीसगावात रूजू झाल्यापासून खान्देशच्या वेगळ्या संस्कृतीची अस्मिता दिसून आली. सर्वसामान्य माणसांसाठी काम केले. त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. उप विभागाचा प्रमुख या नात्याने प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून घेत त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. लोकांची सेवा करणे हेच आपले काम आहे, हीच भावना मनात ठेवून चांगले काम करु शकलो. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवितांना प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यात कोणताही वाईट हेतु नव्हता असेही श्री.घोडे-पाटील यांनी नमूद केले.
            यावेळी तहसिलदार कैलास देवरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, चांगल्या अधिकाऱ्यांचा सहवास  व मार्गदर्शन मिळाल्यास प्रशासकीय कामांना योग्य दिशा मिळते. प्रातांधिकारी मनोज घोडे पाटलांच्या सुक्ष्म नियोजनामुळे महाराजस्व अभियानातून तालुक्याला बहुमान मिळाला. त्यांच्या कार्यकाळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह सातबारा संगणकीकरणाचे उत्कृष्ट काम तालुक्यात झाले आहे. कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन नैतीक पाठबळ, आधार व प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांना आज निरोप न देता शुभेच्छा देण्यात येत असल्याचेही श्री.देवरे यावेळी म्हणाले.
            यावेळी प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र जाधव, लक्ष्मण शिरसाठ, देवीदास पाटील, नानासाहेब आगळे, शैलेंद्र परदेशी, मंडळ अधिकारी बोरसे, तलाठी सचिन मोरे, शितल गढरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी केले.

* * * * * * * *

Thursday, 8 September 2016

जळगांव जिल्ह्याचे दिनांक 9 सप्टेंबर, 2016 पर्यंतचे पर्जन्यमान . . .


परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशबंदी

सरळसेवा भरती परीक्षा
परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशबंदी
                                               
जळगाव दि 8 – जिल्हा निवड समिती, जळगाव यांचेमार्फत दि. 11 रोजी सरळसेवा भरती परीक्षा 2016 अंतर्गत तलाठी (पेसा क्षेत्रातील व पेसा क्षेत्राबाहेरील) संवर्गातील रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव व फैजपूर येथील एकूण 91 उपकेंद्रांवर (शाळा/महाविद्यालय) सकाळी 11 ते दुपारी एक वाजपावेतो घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्या वेळी शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणुन जळगाव जिल्हादंडाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सर्व  91 परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात रविवार दि. 11 रोजी सकाळी 10ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. सदर बंदी आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु असणार नाही.

०००००

जिल्ह्यातील 92 हजार आस्थापनांच्या तपासणीला सुरुवात

राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही पडताळणी
जिल्ह्यातील 92 हजार आस्थापनांच्या तपासणीला सुरुवात
        जळगाव दि.8- तेराव्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय व्यवसाय नोंदवहीतील आस्थापनांची पडताळणी  जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत करण्यात येत असून जिल्ह्यातील विविध 7 कायद्यान्वये स्थापित 92 हजार आस्थापनांच्या तपासणीला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
 जिल्ह्यात कंपनी कायदा 1956, दुकाने व आस्थापना अधिनियम 1948, कारखाने अधिनियम 1948, सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा 1950, सहकारी संस्था कायदा 1960, उद्योग अधिनियम, खादी व ग्रामोद्योग अधिनियम 1960 या सात वेगवेगळ्या कायद्यांअंतर्गत नोंदणी झालेल्या आस्थापनांची पडताळणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या पडताळणीसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे कर्मचारी-अधिकारी आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देणार आहेत.
सदर पडताळणीचे काम हे विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने क्षेत्रकाम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती आस्थापना चालकांनी तातडीने उपलब्ध करुन द्यावी. या पडताळणीदरम्यान संकलित होणारी माहिती  ही शासनाच्या विविध विकास योजना तयार करण्यासाठी पायाभुत आकडेवारी म्हणुन वापरली जाणार असल्याने माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच ही माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे, याची आस्थापना मालक व चालकांनी नोंद द्यावी व संबंधित क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी पी.एस. पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रीय व्यवसाय नोंदवहीच्या क्षेत्रीय पडताळणीच्या कामासाठी निवडण्यात आलेल्या आस्थापनांची संख्या

अ.क्र.
7 कायदे
क्षेत्रीय पडताळणी करावयाच्या आस्थापनांची संख्या
1
कंपनी कायदा,1956
1325
2
कारखाना अधिनियम,1948,(DISH)
1101
3
सार्वजनिक विश्वस्थ्‍ संस्था कायदा,1950
11207
4
दुकाने व आस्थापना अधिनियम,1948
62140
5
सहकारी संस्था कायदा,1960
4580
6
उद्योग अधिनियम(MSME)
2854
7
खादी ग्रामोद्योग अधिनियम,1960
8802

एकूण
92009


०००००