Tuesday, 24 February 2015

मार्च अखेर महसुल वसुलीचे उध्दीष्ट पुर्ण करा : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल


मार्च अखेर महसुल वसुलीचे उध्दीष्ट पुर्ण करा !
:जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल

चाळीसगांव, दिनांक 24 :- आर्थिक वर्ष सन 2014-2015 हे 31 मार्च अखेर पुर्ण होत असून चाळीसगाव विभागातील महसुल वसुली ही मार्च अखेर शंभर टक्के पुर्ण करण्याच्या सक्त सुचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज तहसिल कार्यालयात आयोजित महसुल प्रशासनाच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, विजय सुर्यवंशी,  वाघ, अनंत परमार्थी यांच्यासह मंडळ अधिकारी व  तलाठी उपस्थित होते.
                     आढावा बैठकीत चाळीसगांव महसुल प्रशासनाला यापूर्वी 7 कोटी 12 लाखाचे उध्दीष्ट देण्यात आले होते. त्यात सुधारणा करुन सुधारित उध्दीष्ट 7 कोटी 50 लाख रुपयांचे देण्यात आले आहे. यापैकी आजतागायत 5 कोटीचे उध्दीष्ट पूर्ण करुन महसुल प्रशासनाने सरासरी 72 टक्के महसुल वसुली पुर्ण केली असून उर्वरित उध्दीष्ट पुर्ण करण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचा आढावा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी घेतला. यावेळी जलयुक्त शिवार अभियानासह  कृषी विभाग, वनविभाग तसेच  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला असता तालुका प्रशासनाच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित उध्दीष्ट शंभर टक्के पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. यावेळी कार्यालयातील अभिलेखाची दप्तर तपासणी तसेच सातबारा संगणकीकरणाची माहितीही त्यांनी संबंधितांकडून जाणून घेतली.
उध्दीष्ट पुर्ण न करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई करणार
                     महसुल वसुलीचे काम करतांना कुठल्याही अधिकारी, कर्मचा-याने हयगय केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी  मंडळ अधिकारी व तलाठयांच्या आढावा बैठकीत दिल्या. तालुक्यातील 67 गावांमध्ये जे खरीप अनुदानाचे वाटप महसूल प्रशासनातर्फे करण्यात येत आहे त्या अनुदान वाटपामध्ये ज्या लाभार्थ्यांचे बँक खात्याचा तपशिल अपुर्ण अथवा चुकीचा आहे अशा लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहचून त्यांच्या अचुक बँक खात्याचा तपशिल संबंधित गावाच्या तलाठयांनी प्राप्त करावा. तसेच अनुदान वाटपाची कार्यवाही देखील मार्च-2015 अखेर पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तर खरीप अनुदानापासुन वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी देखील आपला बँक खात्याचा अचुक तपशिल महसूल यंत्रणेस देण्याचे आवाहन त्यांनी तालुक्यातील नागरिकांना यावेळी केले.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment