Friday, 28 November 2014

महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजसुधारणेत मोठे योगदान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजसुधारणेत मोठे योगदान
                     : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वसामान्य, दुर्बल कष्टकरी, शेतकरी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजसुधारणेसोबतच शिक्षणाची दारे खुली करुन  देशावर मोठे उपकार केले. असे  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  केले.
रेशिमबाग येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 124 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार  होते. यावेळी व्यासपीठावर  महापौर प्रवीण दटके, आमदार नागो गाणार, आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार अशोक मानकर, नगरसेवक अविनाश ठाकरे, शंकरराव  लिंगे, श्रीमती भाग्यश्री बानाईत, प्रेम सातपुते  उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळयास माल्यार्पण व   दीप प्रज्वलन  करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, महात्मा फुले यांनी  स्त्री शिक्षण सक्तीचे करण्यासाठी समाजाच्या विरोधात जाऊन प्रचंड विरोध सहन करीत स्त्री शिक्षणाचा पाया  रोवला. महात्मा फुले यांनी समाज सुधारण्यासाठी स्त्रीला शिक्षण देणे काळाची गरज असल्याचे ओळखून  सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. महात्मा फुले यांनी शिक्षणाची सर्वसामान्यांसाठी दारे खुली केली. फुले यांच्या समग्र साहित्य केंद्राच्या निर्मितीसाठी  राज्य शासनामार्फत उचित आराखडा तयार करुन ते निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून हे केंद्र नागपूरच्या जनतेला भूषणावह ठरेल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  महादेवराव श्रीखंडे यांना महात्मा स्मृती पुरस्कार तर श्रीमती  सरोजताई  काळे यांना सावित्री आई स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच  योगा चॅम्पीयन सुवर्ण  पदक प्राप्त कु. धनश्री लेकुरवाळे यांचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सत्कार केला.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात  महात्मा फुले शिक्षण संस्थेचे  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती  दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती  मंजुषा सावरकर यांनी केले. तर  आभार देविदासजी लामखाडे यांनी केले.

* * * * * * *

No comments:

Post a Comment