Thursday, 14 March 2013

सामाजीक स्वास्थासाठी प्रत्येकाने वाचन करण्याचे आवाहन

 
 

 
            जळगांव दिनांक 14 :- सामाजीक स्वास्थ्य टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची जोपासना होणे आवश्यक आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार ग्रंथ संपदा उपलब्ध करुन दिली असल्याने प्रत्येकाने एक तरी पुस्तक खरेदी करण्याचे आवाहन दिशा बहुउददेशीय संस्थेच्या कलाकारांनी वाचन संस्कृती बाबतच्या नाटिकेमधून केले.
           राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सवाचे  व.वा. वाचनालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आज संपन्न झाले . यावेळी विनोद ढगे व अन्य कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करुन त्यातून वाचन  संस्कृती वाढविण्याकरिता लोकांनी दर्जेदार साहित्य वाचणे व त्याकरिता किमान एक तरी पुस्तक खरेदी करुन दररोज  वाचन करणे किती महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
           मी सावित्री बोलतेय . . . . या एकपात्री प्रयोगातून एसएनडीटी महाविद्यालयाची विद्यार्थीनी किर्ती ढपे यांनी आजच्या स्त्रीच्या सामाजीक स्थितीवर व स्त्रीमुक्ती मधून बळावलेल्या स्वैराचारावर जबरदस्त प्रहार केला. तसेच या प्रयोगातून शिक्षणाचे महत्व सांगून सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी शिक्षण व विशेषत: स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाचे महत्व विषद केले. तर बाई या कवितेतून गर्भाशयातच मुलीच्या होणाऱ्या हत्येवर केलेले परखड भाष्य उपस्थितांची मने हेलावणारे ठरले.
           मूलजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची यशोगाथा हा पोवाडा सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर दिपाली जाधव या विद्यार्थीनीने सादर केलेल्या नृत्याने रसिकांची दाद मिळविली तसेच धनाजी नाना महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोल जाधव याने सादर केलेले गणेश नमन व नटरंग मधील नृत्यांने रसिकांना मंत्रमुग्ध केले व लक्षवेधी फाऊंडेशनाच्या कलाकारांनी सादर केलेला भवानी मातेचा गोंधळास उपस्थित रसिकांनी टाळयांचा कडकडाट करुन दाद दिली.
           बाबुराव ( विनोद ढगे ) व आबुराव ( दीपक पाटील ) यांनी वाचन वृध्दीबाबत मार्मिक, उपहासात्मक व लोकांनी वाचन संस्कृतीची जोपासना करावी असे आवाहन करणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण केले. यातून लोकांनी किमान एक तरी पुस्तक खरेदी करुन वाचन करण्याचे आवाहन केले. तसेच ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
           प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ नेहरु युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम यांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करुन झाला. यावेळी जिवन विमा कंपनीचे विकास अधिकारी श्री. करंजकर , प्राध्यापीका श्रीमती सपकाळे, सुनिल पंजे आदिसह रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.
           सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी  व कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर माहिती अधिकारी सुनिल सानेटक्के यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment