Friday, 15 August 2014

शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा ! आमदार राजीव देशमुख


             शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा !          
                                                                        :आमदार राजीव देशमुख

चाळीसगाव,दिनांक 15 :- सुवर्ण जयंती राजस्व अभियान सन 2014 अंतर्गत लोकसहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहिम राबविण्यात येत असून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार राजीव देशमुख यांनी आज कोदगांव येथील शिवार रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी केले.

सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवितांना लोक सहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी ‍मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश शेतक-यांना जाण्यायेण्यासाठी सुयोग्य रस्ता उपलब्ध करुन देणे हा असून ब-याच शेतक-यांना इच्छा असूनही उस, केळी, फळबाग, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतरस्ता उपलब्ध नसल्यामुळे घेता येत नाही. बैलगाडी किंवा इतर वाहने  अतिक्रमीत रस्त्यावरुन जावू शकत नसल्यामुळे पावसाळयात पेरणी वेळेवर होऊ शकत नाही. आंतर मशागतीसाठी आवश्यक अवजारांची ने-आण करणे कठीण होते. शेतमाल तात्काळ बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे शेतरस्त्याअभावी जिकरीचे होते. शेतरस्त्याअभावी काढणी, कापणी यंत्रे शेतापर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार राजीव देशमुख यांनी याप्रसंगी केले.

विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविण्यात येत असून तालुक्यातूनही या मोहिमेला चांगला प्रतीसाद मिळत असल्याची प्रतीक्रिया  प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिली. तालुक्यातील कोदगांव  शिवरस्ता लांबी 0.700 कि.मी. , अलवाडी शिवार रस्ता लांबी 1.500 कि.मी. तर तामसवाडी  शिवार रस्ता लांबी 0.750 कि.मी. या तीनही  शिवार रस्त्यांचे आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन लोकार्पण करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.  सिंचन सुविधा वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी तलाव, कालवे निर्माण झाले. यामुळे पारंपारिक रस्ते बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न उदभवले, यासाठी पर्यायी सोय म्हणून अतिक्रमीत शेतरस्ते मुक्त करण्याची आवश्यकता भासू लागली. काही गावांच्या पुनर्वसनामुळे गावठाण बदलले. त्यामुळे पूर्वीच्या गावठाणातून शेताकडे जाणारे रस्त्यांची समस्या निर्माण झाली.  अतिक्रमीत रस्त्यांमुळे प्रशासनात आणि न्यायालयात अनेक वाद आणि दावे दाखल होत गेले. हे सर्व प्रश्न आणि समस्या या मोहिमेमुळे संपुष्टात येतील असा विश्वासही प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी यावेळी बोलून दाखविला. व या ‍मोहिमेचा अधिकाधीक शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले.

या कार्यक्रमासाठी तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, संबंधित गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment