जिल्हयात अनधिकृत बालगृहे, अनाथाश्रमे
चालविणाऱ्या
संस्थाचालकावंर कठोर कारवाई करण्यात
येईल
--जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
जळगाव, दिनांक 3 ( जिमाका वृत्तसेवा ) : जिल्हयातील संस्थांमधील बेकायदेशीररीत्या बालगृहे, अनाथाश्रम चालविणे, बालकांना अनधिकृतपणे डांबून
ठेवणे, त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत असल्याबाबत
निदर्शनास येत आहे. जिल्हयात अनेक अनधिकृत संस्था सुरु असल्याबाबत तसेच अनधिकृत संस्था
सामाजिक माध्यमांचा वापर करुन त्यावर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची छायाचित्रे
प्रसिध्द करुन बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७४ मधील तरतूदीचे
सर्रास उल्लंघन करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.
या सामाजिक माध्यमांचा वापर करुन
समाजातील विविध स्तरावरील नागरीकांना भावनिक आवाहन करून मोठ्या प्रमाणात निधी गोळा
करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. अनधिकृत संस्थांचे हे कृत्य अतिशय गंभीर असून
शासनाजवळ याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेशितांवर
लैंगिक अत्याचार, मारहाण, पलायन, बलात्कार, अतिप्रसंग, शारिरीक, मानसिक छळ, अशा अनुचित
घटना घडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्तरावर अशा अनधिकृत संस्था आढळून आल्यास
तात्काळ ग्राम बाल संरक्षण समिती यांनी तालुका बाल संरक्षण समितीच्या निदर्शनास आणून
द्यावे.
जिल्हयामधील अशा अनधिकृत संस्थांचा
शोध घेण्याच्या सुचना सर्व पोलिस अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची तक्रार
प्राप्त झाल्यास संबंधितांवर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील
कलम ४२ नुसार कारवाही करण्यात येईल. यामध्ये कलम ४२ नुसार १ वर्षापर्यंत कारावास किंवा
एक लाख रुपये पर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. यासाठी जळगाव जिल्हयात १८ वर्षे पर्यंतच्या
वयोगटात काम करणाऱ्या मुला-मुलींच्या निवासी संस्थांची नोंदणी असणे आवश्यक आहे.
जिल्हयामध्ये अनधिकृत संस्था आढळल्यास
जिल्हा बाल संरक्षण कक्ष (७३५०४१४७६८), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय
जळगाव (०२५७-२२२८८२८), तसेच चाईल्ड हेल्प लाईन १०९८ टोल फ्री (२४ तास सेवा) येथे त्वरीत
संपर्क साधावा. अशा गैरप्रकारास आळा घालून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.वनिता सोनगत,
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0 0 0 0
No comments:
Post a Comment