Monday, 3 October 2016

जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्काराची घोषणा

जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणाऱ्या
पत्रकारांसाठी पुरस्काराची घोषणा
मुंबई, दि.3 : उत्कृष्ट लिखाणाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.
जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणारे पत्रकार आणि जलयुक्त शिवारअभियानाची त्या त्या परिसरात जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यास योगदान देणारे पत्रकार या पुरस्कारांसाठी पात्र राहणार आहे.
  या पुरस्काराचे पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असे दोन गट करण्यात आले आहे. पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर तर इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरावर हे पुरस्कार देण्यात येणार आहे.
  राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
  पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 35 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 25 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. विभागस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 30 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 20 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 15 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 12 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 51 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. पुरस्काराचा कालावधी हा एप्रिल ते मार्च असा राहील.
  पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील दैनिके, साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा तर इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी मराठी भाषेतील वृत्तकथेचा विचार करण्यात येईल.
          राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी जलसंधारणाचे महत्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लिखाण करुन या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.


* * * * * *

No comments:

Post a Comment