Friday, 5 May 2017

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कामांना गती द्यावी : आमदार उन्मेश पाटील


सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कामांना गती द्यावी
                         : आमदार उन्मेश पाटील
             
       चाळीसगाव दि. 5 मे (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कामांना गती द्यावी असे निर्देश आज तहसिल कार्यालयात आयोजित तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत आमदार उन्मेश पाटील यांनी दिले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पोपट भोळे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, सदस्य सुनिल साहेबराव पाटील, शशीकांत साळुंखे, भाऊसाहेब खैरनार, लिलाबाई पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, भाऊसाहेब जगताप, तहसिलदार कैलास देवरे, गट विकास अधिकारी मधुकर वाघ, प्रकल्प अधिकारी, वनक्षेत्रपाल(प्रा.) संजय मोरे, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्तार अधिकारी अे.बी.राणे, के.एन.माळी, लागवड अधिकारी खैरनार, अे.आर.चंदिले, सर्प मित्र राजेश ठोंबरे, ज्ञानेश्वर अमृतकार आदि उपस्थित होते.
            तालुका प्रशासनाचा आढावा घेतांना सर्वप्रथम मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी तसेच माता बालसंगोपनासाठी महिला व बाल कल्याण विभागाने शासनाच्या योजनांची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषी विभागाच्या अंजेड्यावरील उन्नत शेती-समृध्द शेतकरी अभियानावर विशेष भर द्यावा. 1 ते 7 जुलै दरम्यान होणारी 4 कोटी वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी वनविभागासह सामाजिक वनिकरण व इतर सर्व विभागांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. भारनियम करतांना प्रामाणिक ग्राहकांवर होणारा अन्याय लक्षात घेता विज गळती व विज चोरी रोखण्यासाठी महावितरणने विशेष पथकांची नियुक्ती करावी. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व बायोमॅट्रीक हजेरी तपासणीअंती केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. कुटूंब कल्याण, लिंग गुणोत्तर, गरोदर माता नोंदणी, माता मृत्यू दर, मानव विकास मिशन कार्यक्रमासह आरोग्य यंत्रणेने विशेष खबरदारी घेण्याच्या सुचनाही आमदार श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.
            पुढे बोलतांना आमदार श्री.पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल शाळा केल्याने शासनातर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी व महसूल प्रशासनाने समन्वय साधून मोहिम राबवावी. जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे मिशन मोडमध्ये करण्याच्या सुचना केल्या तर एक पाऊल धवलक्रांतीकडे टाकत पशुधन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी ग्रामीण भागात शिबीरांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार कैलास देवरे यांनी केले तर आभार निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment