Saturday, 6 May 2017

आदर्श आमदार ग्राम वाघळीच्या 835 प्रस्तांवाना तात्काळ मंजूरी द्या : आमदार उन्मेश पाटील


आदर्श आमदार ग्राम वाघळीच्या 835 प्रस्तांवाना तात्काळ मंजूरी द्या !
आढावा बैठकीत आमदार उन्मेश पाटीलांनी दिले निर्देश
             
       चाळीसगाव दि. 6 मे (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील आदर्श आमदार ग्राम म्हणून वाघळी या गावाची निवड करण्यात आली आहे. या गावातील 450 शोषखड्डे, 225 शौचालये व 160 गोठे असे एकूण 835 प्रस्ताव मंजूरीसाठी आले असून येत्या 13 मे, 2017 पर्यंत या सर्व प्रस्तावांना मंजूरीसह लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्याचे निर्देश आज आढावा बैठकीत आमदार उन्मेश पाटील यांनी दिले.
            या बैठकीला जि.प.कृषी सभापती पोपट भोळे, पंचायत समिती सभापती सौ.स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, सदस्य सुनिल साहेबराव पाटील, भाऊसाहेब केदार, कैलास निकम, रुपाली साळुंखे, अजय पाटील, मायाबाई पाटील, माजी सदस्य दिनेश बोरसे, सरपंच विकास चौधरी तहसिलदार कैलास देवरे, गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
            आपले गाव आपला आपला आराखडा सादर करतांना आदर्श आमदार ग्राम विकास कामांसाठी कुठलाही विशेष निधी दिला जात नाही. परंतु तालुक्याचा विकास साधतांना एक आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी नियोजन समितीसह आमदार निधी वापरुन शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून आदर्श ग्राम निर्मीतीचा आपला मानस आहे. यासाठी राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना आमदार श्री.पाटील यांनी उपस्थितांना दिल्या.
            वाघळी गावातील 1318 कुटूंबाचा सर्व्हे पुर्ण झाला असून या गावातील 2293 हेक्टर शेत जमीनीचे 1400 खातेदारांची शेतजमीन संपुर्ण सिंचनाखाली आणण्यासाठी या गावाची जलयुक्त शिवारात निवड करण्यात आली आहे. गावातील सर्व शाळा डिजीटल करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे दाखले वितरीत करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. गावातील 27 कुपोषीत बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधींनी दत्तक घेऊन गाव कुपोषणमुक्त करण्याचा निर्धारही करण्यात आला.  तर महसूल प्रशासनामार्फत महाराजस्व अभियानातंर्गत वाघळी गावात शिबीराचे आयोजन करुन ग्रामस्थांना लागणारे विविध दाखले वाटप करण्याच्या सुचनाही महसूल प्रशासनास यावेळी देण्यात आल्या.
मोतीबींदू मुक्त गावाचा मानस
            गावातील एकही नागरिकास मोतीबींदू राहणार नाही यासाठी आरोग्य प्रशासनाने शिबीराचे आयोजन करुन मोतीबींदूची तपासणी व शस्त्रक्रीया करुन संपुर्ण गांव मोतीबींदूमुक्त करण्याच्या सुचनाही आमदार श्री.पाटील यांनी  यावेळी दिल्या. शासनाच्या विविध योजनांचे लाभ यापुढे रोख स्वरुपात देण्यात येणार नसल्याने गावातील 100 टक्के नागरिकांचे बँक खाते उघडली जाणार असून प्रत्येक बँक खातेधारकांचा बारा रुपये भरून विमा उतरविण्यात येणार.  तसेच शासनाच्या मुद्रा लोन योजनेतून सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी चालना देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. गावात व्यायामशाळा, वाचनालय, वृक्षलागवड, स्वच्छता अभियान, आरोग्य व शिक्षण या मुलभूत गरजांची पुर्तता होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करणे अपेक्षीत आहे. केवळ कागदोपत्री कामे न करता ग्रामस्थांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून काम करणे हे प्रत्येक शासकीय अधिकारी व  कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे आणि हे त्यांनी लोकसेवक या नात्याने पार पाडणेही गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
                       

* * * * * * * *

No comments:

Post a Comment