Thursday, 7 February 2013

लोकांनी वेळेवर वीज बिले भरण्याची मानसिकता ठेवावी --पालकमंत्री ना. देवकर



         जळगांव, दि. 7 :- थकित वीजबिला अभावी वीज कंपनीकडून वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही याकरिता लोकांनी आपल्या मानसिकतेत बदल करुन वेळेवर वीज बिले भरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
      क्रॉम्प्टन ग्रीव्हज व नांद्रा बु. ग्रामस्थ यांचे समवेत आज सकाळी 11 वाजता झालेल्या बैठकीत ना. देवकर मार्गदर्शन करत होते. यावेळी  क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या वाणिज्य प्रमुख श्रीमती वंदना यरमाळकर, ग्रामीण भागाचे प्रमुख यु.डी. चौधरी , विदयुत अभियंता संदीप वराडे आदिसह नांद्रा ग्रामस्थ उपस्थित होते.
      ना. देवकर म्हणाले क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीने नांद्रा गावाला योग्य दाबाने व सुरळितपणे वीज पुरवठा व्हावा म्हणून नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित बसविण्याची कार्यवाही करावी तसेच गावांमध्ये अनाधिकृत वीज कनेक्शन असणा-या लोकांवर कारवाई करुन त्यांना तात्काळ विहित पध्दतीचा अवलंब करुन नवीन वीज कनेक्शन दयावे असे त्यांनी सांगितले.
       नांद्रा बु. मधील सर्व वीज ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकित वीज बिलाची रक्कम तात्काळ भरण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. तसेच लोकांनी जी सेवा वापरली आहे. त्यासंबंधीचे शुल्क सदरच्या कंपनीला अदा करणे आवश्यक असून त्याबाबत लोकांनी मानसिकतेत बदल करुन चांगली सेवा मिळण्यासाठी वेळेवर वीज बिले भरावी असे त्यांनी सांगितले
              नांद्रा बु. गावांमध्ये  क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी मार्फत दोन दिवसाच्या शिबीराचे आयोजन केले जाऊन त्यामध्ये गावांमधील अनाधिकृत वीज जोडण्या असलेल्या लोकांवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच त्यांना तेथेच नवीन कनेक्शन दिले जाईल अशी माहिती श्रीमती यरमाळकर यांनी दिली. तसेच सदरच्या लोकांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना मार्गदर्शन करुन थकित वीज बिले भरणे, वीज कनेक्शन घेणे आदि साठी पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले.              

1 comment:

  1. मंत्री साहेब, पण जर वेळेवर बिले भरून देखील ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर त्यांनी काय करावे? जसे - वीज कंपनी कडून कृषी पंपावर बसविलेले वीज मीटर फक्त शोभेची वस्तु बनून राहिले आहे. अनेक वेळा सांगून, लेखी अर्ज देऊन देखील मीटर प्रमाणे वीज बील शेतकर्‍यांना मिळत नाही. मीटर मधील युनिट तपासून वीज बिल देण्याचे कष्ट वीज कंपनीचे कर्मचारी घ्यायला तयारच दिसत नाहीत. तेव्हा आमच्या सारख्या सामान्य शेतकर्‍याने काय करावे?

    ReplyDelete