Sunday, 15 March 2015

ग्राहक जागरुक राहिल्यासच तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल : आमदार : उन्मेश पाटील

ग्राहक जागरुक राहिल्यासच
तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल
आमदार : उन्मेश पाटील

              चाळीसगांव, दिनांक 15 :- ग्राहक जागरुक राहिल्यासच तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल असे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी आज जागतिक ग्राहक दिनानिमीत्त तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे आयोजित कार्यक्रमात केले. प्रतिमा पुजन करुन प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार उन्मेश पाटील व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार उन्मेश पाटील हे होते.
                     अध्यक्षीय भाषणात आमदार उन्मेश पाटील  म्हणाले की,  ग्राहकांना आपल्या हक्काबद्दल पुर्ण जाणिव असने आवश्यक आहे. काही अज्ञानी ग्राहक व काही अनास्थादर्शक ग्राहकांमुळे ग्राहक हक्कात बाधा निर्माण होऊन व्यापारी व उत्पादक याचा फायदा घेतात. आमदार पाटील पुढे म्हणाले की, ग्राहक प्रबोधनासाठी व ग्राहक कायद्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रचार व प्रसार होण्यासाठी मी प्रायोजक म्हणून त्यासाठी वर्तमानपत्रांमधुन जाहिरात पत्रके, मुख्य चौकातील फलकाव्दारे जनजागृती करण्यासाठी लोकप्रतिनीधी या नात्याने माझ्याकडून मी स्वत: पंचवीस हजाराची मदत देण्यास तयार आहे. तसेच ग्राहक चळवळ अधिक बळकट होण्यासाठी ग्राहक संघटना, सार्वजानिक क्षेत्रातील संघटना, व्यापारी ठेकेदार, पुरवठादार, बि-बीयाणे व खत विक्रेते यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मौलीक सुचना देखील तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांना केली.
                     ग्राहक पंचायत चाळीसगांव अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र चाळीसगांव शाखेचे सचिव तथा ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक रमेश सोनवणे यांनी आप-आपल्या यथोचित भाषणात ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, ग्राहक कायद्याची निर्मीती, उद्देश, ग्राहक कायद्याचा इतिहास, ग्राहकांना मिळालेले न्याय, तक्रार करण्याची पध्दत, या विषयी विस्तृत माहिती देऊन काही प्रबोधनपर उदाहरणे दिली. व उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले.
                     मनुष्य हा आजन्म ग्राहक असतो म्हणून प्रत्येकाने एक जबाबदार ग्राहक बनावे, वस्तु घेतांना त्याची वैधता, आकारमान, दर, योग्यता या सर्व बाबी तपासल्यास आपली फसवणूक होणार नाही असे सांगून या कायद्याविषयी विस्तृत स्वरुपात विश्लेषण आपल्या प्रास्ताविकातुन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले.
                     या प्रसंगी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन चाळीसगांवचे सचिव विकास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहीदास पाटील, शाम शिरोडे, लालचंद बजाज, तालुका भाजपा अध्यक्ष के.बी.पाटील, कृष्णेश्वर पाटील, ग्रहक संघटना सदस्या डॉ.सुनिता घाटे, डॉ.मधुलिका महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बीएसएनएल, एमएसईबी  व वजनमापे कार्यालयाचे प्रतिनीधी, महसूल अधिकारी व कर्मचारी वर्गासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ यांनी मानले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment