लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने
जलयुक्त शिवार अभियान राबवावे
: प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील
चाळीसगांव, दिनांक 24 :- सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 हे
धोरण निश्चित करुन राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार
अभियानाचा मुख्य आत्मा हा लोकसहभाग आहे. लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने अभियान
राबविल्यास अभियान यशस्वी होऊन टंचाईवर यशस्वीपणे मात करणे शक्य होईल असे आवाहन
पाचोरा तालुक्यातील लोहारा गावचे प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील यांनी लोहारा
येथे केले.
राज्य व देशभरातुन अनेक कृषी पुरस्काराने सन्मानित
झालेले व सेंद्रीय शेतीमध्ये वेगळी ओळख निर्माण करुन आपल्या यशस्वी कार्याचा ठसा
देशभरात उमटविणारे पाचोरा तालुक्यातील लोहा-याचे प्रगतीशील शेतकरी विश्वासराव
पाटील यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनिय कामकाज व अनुभव पहाता त्यांना जलयुक्त
शिवार अभियानाच्या जिल्हा स्तरावरील समितीवर तज्ञ सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
त्यांच्या शेतशिवाराची पहाणी करण्यासाठी पाचोरा प्रातांधिकारी तथा जलयुक्त शिवार
अभियान समितीचे अध्यक्ष गणेश मिसाळ, तालुका कृषी अधिकारी तथा समिती सदस्य सचिव दिपक
ठाकूर, सरपंच अक्षय जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाणी दौ-यात श्री.पाटील
बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत लोहारा गावाची निवड झाली असून विश्वासराव
पाटील यांच्या कोरडवाहु शेतामध्ये जलसंधारण व मृदसंधारणाबाबत त्यांनी केलेल्या
विविध कामांची पहाणी करतांना म्हणाले की, स्वत:च्या खर्चातुन 25 वर्षापुर्वी
लोंदडी नाल्यावर केलेला सिमेंट बंधा-यामुळे त्यांच्या शेतीची वाढती उत्पादकता
पहाता सर्व शेतक-यांनी शासनाच्या मदतीची वाट न पहाता ज्यांना शक्य असेल त्यांनी
छोटे-छोटे बंधारे बांधले पाहिजेत. जिल्हयाभरात ज्या नाल्यांवर कृषी विभाग व
लघुसिंचन विभाग यांच्याकडून सिमेंट नालाबांधची कामे झाली आहेत तेथील बांधामध्ये
साचलेला गाळ व केरकच-यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. यासाठी बांधाकाठच्या शेतक-यांनी एकत्र येऊन जे.सी.बी.
च्या सहाय्याने खोदकाम करुन गाळ व कचरा काढून नाल्याची खोली व रुंदी वाढविल्यास
पाण्याची साठवण क्षमता वाढते व काढलेला गाळ हा सुपिक असल्यास शेतामध्ये टाकून शेतीची
सुपिकता देखील वाढते. त्यामुळे उत्पादन वाढीवर निश्चीत परिणाम होईल असा विश्वासही
त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोहा-यामध्ये मागील वर्षी सुमारे 2200 हेक्टरवर
कंपार्टमेंट बंडीगचे म्हणजेच शेताच्या बांधाचे मजबुतीकरण करण्याचे काम करण्यात
आले. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात जिरण्यास मोठी मदत झाली तर भुजल पातळीत देखील
मोठया प्रमाणात वाढ झाली. अशा प्रकारची कामे कृषी विभागामार्फत संपुर्ण जिल्हयात
करण्यात येत आहे मात्र यामुळे शेतात पाणी साचुन पिकांचे नुकसान व जमीन खराब होईल
या अज्ञानामुळे अनेक शेतकरी हे कंपार्टमेंट बंडींग फोडतात व केलेले जलसंवर्धनाचे
काम व्यर्थ जाते. शेतक-यांनी चुकीच्या समजावर आधारित राहून असे बांध फोडु नये असे
आवाहनही त्यांनी यांवेळी केले. जिल्हयाभरात
ज्या नाल्यांवर कोल्हापुरी पध्दतीने बंधारे झाले आहेत तेथील पाटया हया
पावसाळयापुर्वी काढणे व ऑक्टोंबर वा नोव्हेंबर महिन्यात पुन्हा टाकणे हे काम
आसपासच्या शेतक-यांनी स्वयंस्फुर्तीने समिती तयार करुन पुढाकार घेऊन केले पाहिजे.
शिवारातील पाणी जमिनीत जिरविल्यास त्याचा
फायदा सर्व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात होऊन चांद्या पासून बांधा पर्यंत संपुर्ण
परिसर सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त
केला.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ म्हणाले की,
मागील दोन वर्षापुर्वी याच गावाला दर दिवसाला 24 टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात
होता. त्यावरुन या गावातील पाणी टंचाईची भिषणता लक्षात येते. त्यावर मात
करण्यासाठी प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील यांनी जलसंधारणाच्या केलेल्या
कामाचा आदर्श सर्व शेतक-यांनी घेतल्यास जिल्हाभरात जल व मृदसंधारणाचे प्रचंड मोठे
काम होण्याचा आशावाद व्यक्त केला. तर तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकूर यांनी
विश्वासराव पाटील यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांचा सत्कारदेखील केला. यावेळी
सरपंच अक्षय जयस्वाल यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व शेतक-यांच्या वतीने
सर्वोतोपरी सहकार्य करण्याची हमी घेतली. तर मंडळ अधिकारी महेंद्र पाटील यांनी
सर्वांचे आभार मानले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment