Wednesday, 19 April 2017

मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहणार नाही : खासदार ए.टी.पाटील


मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहणार नाही
: खासदार ए.टी.पाटील

       चाळीसगाव,दि.19(उमाका वृत्तसेवा): मुद्रा लोन योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहू देणार नाही  यासाठी तहसिल कार्यालयासह पक्ष कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष उभारून लाभार्थ्यांना अधिकारी, पदाधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल असे प्रतिपादन खासदार ए.टी.पाटील यांनी आज केले.
            मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा तसेच त्यांचा सहभाग वाढावा यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वय करण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य अशा मुद्रा लोन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पंचायत समिती सभापती स्नेहल बोरसे, संपदा पाटील, के.बी.साळुंखे, घृष्णेश्वर पाटील, आण्णा कोळी, रंजना सोनवणे, तहसिलदार कैलास देवरे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, ज्ञानेश्वर अमृतकर, मानसिंग राजपूत, भरत गोरे यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            मुद्रा योजनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार तरुणांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगत खासदार श्री.पाटील पुढे म्हणाले, या योजनेची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना होण्यासाठी प्रत्येक बँकेत मुद्रा लोन योजनेचे फलक लावण्यात यावेत, तर मुद्रा लोन साठी नागरिकांना असलेल्या समस्या, तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यासाठी तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुद्रा लोन योजनेचा दरमहा आढावा घेण्यात येणार असून ही योजना तळागाळात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोहचावी, या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले. तर नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक प्रमाणात लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी प्रास्ताविकात तहसिलदार कैलास देवरे म्हणाले, मुद्रा लोन योजनेतंर्गत शिशु गट, किशोर गट आणि तरुण गट असून या गटानुसार पात्र लाभार्थ्यांना विविध बँकांव्दारे अर्थसहाय्य देण्यात येते. मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याच बरोबर सुतार, गवंडी काम, कुंभार, सलुन, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते आदी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेव्दारे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून छोटे-मोठे उद्योग निर्माण व्हावे या हेतुने प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून मुद्रा योजना राबविली जात आहे. या योजनेची प्रभावी आणि परिणामकारक जागृती करुन ही योजना अधिक गतिमान आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही तहसिलदार श्री.देवरे यांनी यावेळी केले.
            यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांनी योजनेची सविस्तर माहिती सांगतांना लाभार्थ्यांनी कुठल्याही मध्यस्थाशिवाय बँक व्यवस्थापनाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी उमंग समाजशिल्पी मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत या योजनेत महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर मुद्रा लोन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या युनियन बँकेसह बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँक अधिकाऱ्यांचा खा.ए.टी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खासदार ए.टी.पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
            यावेळी दारिद्‌रय रेषेखालील (बी.पी.एल.) कुटूंबाचा कर्ता प्रमुख व्यक्तीचे निधन झालेल्या कुटूंबांच्या वारसांना अर्थ सहाय्य देण्यासाठी राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना आज खासदार ए.टी.पाटील यांच्या हस्ते धनादेशांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब तहसिलदार विशाल सोनवणे तर आभार नानासाहेब आगळे यांनी मानले.

* * * * * * * *

Monday, 17 April 2017

मुद्रा लोनसह कॅशलेस व्यवहाराच्या प्रचार प्रसिध्दीसाठी मेळाव्याचे आयोजन : प्रातांधिकारी शरद पवार

मुद्रा लोनसह कॅशलेस व्यवहाराच्या
प्रचार प्रसिध्दीसाठी मेळाव्याचे आयोजन
                                                                                      :प्रातांधिकारी शरद पवार

       चाळीसगाव,दि.17(उमाका वृत्तसेवा):  मुद्रा लोन योजना ही सामान्य नागरिकांना आपले लहान मोठे उद्योग सुरु करण्यासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करुन देणारी योजना आहे. याव्दारे अर्थसहाय्य प्राप्त करुन आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा लोन योजना व कॅशलेस व्यवहाराबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा लोकसभा सदस्य खा.ए.टी.पाटील व विधानसभा सदस्य आ.उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 19 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पंचयात समितीच्या सभापती स्मितल बोरसे व नगराध्यक्षा आशालता चव्हाण याही उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यात तालुक्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन प्रातांधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
            या मेळाव्याच्या अनुषंगाने आज तहसिल कार्यालयात तालुक्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसिलदार कैलास देवरे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, ज्ञानेश्वर अमृतकर व विविध बँकांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुद्रालोन लाभधारकांची यादी, आजतागायत वितरीत करण्यात आलेल्या मुद्रा लोनची माहिती, प्रतिक्षेतील मुद्रालोन अर्जदारांचा आढावाही प्रातांधिकारी श्री.पवार यांनी घेतला.
            चाळीसगावात आयोजित केलेल्या या मेळाव्यात होतकरु, बेरोजगार आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांमध्ये उद्योजकतेचा विकास होण्यासाठी व त्या करिता मुद्रा बँक योजनेव्दारे त्यांना कर्ज मिळविणेकामी मार्गदर्शन तसेच सर्व सामान्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कॅशलेस व्यवहार जास्तीत जास्त प्रमाणात होण्याकरिता उद्योजक, बँक व सामाजिक संस्था यांच्याकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही प्रातांधिकारी श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.          
                         

* * * * * * * *

Thursday, 13 April 2017

ई-भुमिपूजन सोहळाः राज्यातील 28 शहरांसोबत पाचोरा येथील भुमिगत गटार योजनेचेही भुमिपूजन


ई-भुमिपूजन सोहळाः राज्यातील 28 शहरांसोबत
पाचोरा येथील भुमिगत गटार योजनेचेही भुमिपूजन
आ. किशोर पाटील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
             
       चाळीसगाव,दि.13(उमाका वृत्तसेवा): स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहरांसाठी शासन वचनबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील 28 शहरांत अमृत योजनेसह विविध प्रकल्पासाठी 1622 कोटीची कामे मंजूर करण्यात आली असून मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथून राज्यातील 28 शहरातील कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पाचोरा येथील भुमिगत गटार योजनांच्या कामाचाही समावेश आहे.
            यावेळी मुंबई येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नगर विकास राज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पाचोरा येथे नगरपरिषदेच्या सभागृहात आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, नगरसेवक अमोल शिंदे, मनिष भोसले, महेश सोमवंशी, दत्ता जळे, धर्मेंद्र चौधरी, सतिश चेडे, दादाभाऊ चौधरी, शीतल सोमवंशी, राम केसवाणी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनीधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            नगरोत्थान अभियानांतर्गत पाचोरा भुयारी गटार योजनेला 56.96 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी (ब्रँच शिवर) करिता 42.5 कोटी, सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी (ट्रंक मेन) 3.26 कोटी, नदी आणि रस्ता क्रॉसिंग करिता बांधकामासाठी 0.44 कोटी, पंपिंग स्टेशन बांधकाम व डिझाईनसाठी 1.09 कोटी, इलेक्ट्रीकल आणि मॅकेनिकल कामांसाठी 1.88 कोटी, उर्ध्ववाहिनीसाठी 0.45 कोटी , डिलीवरी चेंबरसाठी 0.02 कोटी , मलशुध्दीकरण केंद्रासाठी 7.25 कोटी  तर ॲप्रोच 200 मीटर रस्त्यांसाठी 0.07 कोटी असा एकूण 56.96 कोटी खर्चाचा आराखडा सादर करण्यात आल्याचे आमदार किशोर पाटील यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. ही सर्व कामे वेळेत, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले.
            पाचोरा शहराच्या विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार यावेळी बोलतांना व्यक्त केले. तसेच नगर विकास विभाग, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण आदी यंत्रणांचेही आभार व्यक्त केले.

* * * * * * * *

Friday, 7 April 2017

पाटणादेवी चैत्र महोत्सवानिमित्त भाविकांनी काळजी घ्यावी : तहसिलदार कैलास देवरे


पाटणादेवी चैत्र महोत्सवानिमित्त
भाविकांनी काळजी घ्यावी
                                                              : तहसिलदार कैलास देवरे
             
       चाळीसगाव दि. 07 (उमाका वृत्तसेवा) :  तालुक्यातील पाटणादेवी वासंतिक चैत्र महोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे यात्रोत्सवादरम्यान (दि. 10 ते 12 एप्रिल, 2017) करावयाच्या उपाययोजनांसदर्भात आज तहसिलदार कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
            यावेळी पोलीस निरीक्षक (ग्रामीण) श्री.गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) एल.एम.राठोड, आगार व्यवस्थापक सचिन चाचणे, मंडळ अधिकारी श्री.मोरे, पाटणादेवी संस्थानचे अध्यक्ष श्री.जोशी, तलाठी श्री.गुरव आदि उपस्थित होते.
            पाटणादेवी हे पवित्र ठिकाण असून येथील पावित्र्य जपण्यासह परिसरातील वन्यजीवांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन करत तहसिलदार श्री.देवरे म्हणाले भाविकांनी दर्शनासाठी येतांना सोबत आणलेल्या खाद्यपदार्थ व इतर वस्तुंमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. भाविकांना नवसाच्या कार्यक्रमासाठी ठरवून दिलेल्या जागेत कार्यक्रम करावा तसेच नवसानंतर उरलेले अन्न इतरत्र न टाकता सोबत घेऊन जावे. जागेअभावी मोठ्या वाहनांना प्रवेश निषिध्द असल्याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. वन परिसरात वाहनांसह  वाद्याचा तसेच लाऊडस्पिकर यांच्या कर्कश आवाजाचा वन्यजीवास बाधा होत असल्यामुळे याचा वापर टाळावा. भाविकांना दर्शन रांगेतच मंदिर संस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे प्लास्टिकच्या पाणी बाटल्या सोबत बाळगू नये, बाळगल्यास त्या इतरत्र फेकु नये. चैत्र महोत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांनी पाटणादेवी परिसरातील पावित्र्य जपण्यासोबत वन्यजीवांना बाधा पोहचणार नाही यासाठी वरील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
            पाटणादेवी यात्रोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात या ठिकाणी वन परिसरात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने तसेच उन्हाळी वातावरणामुळे प्राणी सायंकाळी बाहेर पडत असल्यामुळे भाविकांसाठी दर्शनाची वेळ ही सकाळी 08:00 ते सायंकाळी 06:00 निश्चित करण्यात आली आहे. सायंकाळी 06:00 ते सकाळी 08:00 या वेळेत या परिसरात कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड यांनी यावेळी सांगितले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कुठल्याही वन्यजीवाला धोका पोहचवू नये यासाठी वन्य जिव अधिनियम 1972 नुसार दंडास पात्र राहाल असेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


* * * * * * * *