Saturday, 5 December 2015

शाश्वत शेतीसाठी माती परिक्षण गरजेचे : आमदार उन्मेश पाटील


शाश्वत शेतीसाठी माती परिक्षण गरजेचे : आमदार उन्मेश पाटील

              चाळीसगांव, दिनांक 05:-  मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मृदा दिवस या दिवसाचे औचित्य साधून शाश्वत शेतीसाठी साठी माती परिक्षण करण्याचा संकल्प सर्व शेतकऱ्यांनी करावा व शाश्वत शेती करावी असे आवाहन आमदार उन्मेश पाटील यांनी कृषी विभागामार्फत आयोजित मृदा दिनाच्या कार्यक्रमात केले. शहरातील हिरापुर रोडवर असलेल्या गणेश मंगल कार्यालयात तालुका कृषी कार्यालयामार्फत मृदा दिनानिमीत्त शेतकऱ्यांना जमिनीचा मृद नमुना कसा घ्यावा, खताचा संतुलित वापर, शिफारशीनुसार खतांच्या मात्रा देणे, सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर अशा अनेक विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार बोलत होते.
                     मनुष्य ज्या प्रकारे आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत असतो त्याच प्रमाणे जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी माती परिक्षणासह पाणी परिक्षण हे गरजेचे असते, तर यामुळे आपण मातीचा सन्मान असून मातीविषयी मनुष्य प्राणी मात्राने व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. जमिनीचे आरोग्य चांगले राहील्यास आपोआप निसर्गासह सर्व मनुष्य प्राणी मात्रांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. शाश्वत शेती करण्यासाठी मोठया प्रमाणात आभ्यास साहित्य उपलब्ध असून त्याचाही वापर शेतकऱ्यांनी करावा. शाश्वत शेतीवर मार्च महिन्यामध्ये सुभाष पाळेकरांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असून त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी केले. प्रत्येक तालुक्यात मोबाईल सॉईल टेस्टींग लॅब कार्यान्वित करण्यात येणार असून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठीच उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या मोठया प्रमाणात योजना राबविल्या जातात त्याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांशी सुसंवाद साधुन गावपातळीपर्यंत त्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना करत त्यासंबंधीचे माहितीपत्रके सर्व शेतकऱ्यांना वितरीत करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या. आजच्या मृदा दिनाचे औचित्य साधत प्रातिनीधीक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करतांना यावेळी तालुक्यातील 1541 शेतकऱ्यांच्या शेतीच्या आरोग्य पत्रीकांचे वाटप होणार असून पुढील तीन वर्षामध्ये तालुक्यातील एकुण 64,866 इतक्या संपुर्ण खातेदारांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
                     कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची थोडक्यात माहिती करुन दिली त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, घन लागवड कापुस विकास योजना, संकरीत तुर उत्पादन कार्यक्रम, आंतरपिक प्रोत्साहनपर कार्यक्रम आदी योजनांची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांना हरभरा पेरणी करावयाचा आहे अशा शेतकऱ्यांनी महाबिज कडील बियाणे रु. 25 प्रति किलो अनुदानावर उपलब्ध असून मे.पंकज व सुयोग कृषी केंद्र चाळीसगांव यांचेकडे 30 किलोची बॅगला रु.750 अनुदान वगळता रु. 1560 ला शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
                     एकात्मिक अन्नद्रव्य संकल्पना, माती नमुना घेण्याची कार्यपध्दती व फायदे तोटे, नमुना तपासणी नंतर अहवाल वाचन, रासायनिक, जैवीक, सेंद्रीय खताचा वापर, जमिनीची रचना, भौतीक व रासायनिक गुणधर्म, सामु-क्षारता, भुसूधारकाचा वापर, जलसंधारण, मृदसंधारण, हिरवळीच्या खताचा वापर अशा अनेक बाबींवर तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी पी.डी.पाटील, पी.डी.वाघ, सुशील पाटील, तोरणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले तर शिंदी येथील प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी शेतीचा आभ्यास करुन केलेल्या शेतीबद्दल स्वत:चे अनुभव कथन केले. यावेळी जेष्ठ तज्ञ रामभाऊ शिरोडे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रेरीत केले.
                     या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, भाजपा जिल्हा सरचिटणीस देवयानी ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव, माजी सभापती संजय पाटील, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, पं.स.सदस्य दिनेश बोरसे, जि.प.सदस्य राजेश राठोड, अनिल निकम, ॲङ राजेंद्र सोनवणे, शिंदी गावचे प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब राऊत, विश्वजीत पाटील, रामभाऊ शिरोडे, सतिष पाटे आदि मान्यवर तसेच  विविध ग्रामपंचायतीचे सरपंचांसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

नागरी भागातील दुरचित्रवाणी केबलधारकांना सेट-टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील

नागरी भागातील दुरचित्रवाणी केबलधारकांना
सेट-टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य
                                                : प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील

              चाळीसगांव, दिनांक 05:-  केंद्र शासनाच्या 11 सप्टेंबर, 2015 च्या राजपत्रानुसार राज्यातील दुरचित्रवाणी केबल प्रसारणाच्या फेज-1 व फेज-2 मध्ये डिजीटायजेशन करण्यात आलेल्या क्षेत्राव्यतिरीक्त राज्यातील उर्वरित नागरी भागात फेज-3 मध्ये 31 डिसेंबर, 2015 पर्यंत डिजीटायजेशनची प्रक्रिया पुर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानुसार नागरी  भागातील सर्व दुरचित्रवाणी केबल धारकांनी त्यांच्या दुरचित्रवाणी संचास सेट-टॉप बॉक्स यंत्र 31 डिसेंबर, 2015 पर्यंत अधिकृत केबल सेवा पुरवठादाराकडून बसवून घेणे अनिवार्य आहे.  जे अधिकृत केबल सेवा पुरवठादार दिलेल्या मुदतीत सेट-टॉप बॉक्स बसविणार नाही अशा केबल सेवा पुरवठा दारांची सेवा खंडीत होऊन यामुळे केबल धारकांना या सेवेपासून वंचित रहावे लागेल तरी याची विहीत मुदतीत संबंधितांनी अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
                      दुरचित्रवाणी केबल सेवेच्या डिजीटायजेशन अंतर्गत विविध वाहिन्यांवरील प्रक्षेपण केबल दुरचित्रवाणी संचास पुर्ण क्षमतेने प्राप्त होईल. मोठया संख्येने उपलब्ध असलेल्या वाहिन्यांपैकी ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार व आर्थिक क्षमतेनुसार तथा गरजेनुसार वाहिन्यांची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होईल. प्रक्षेपणातील बहुतांशी दोष दुर होवून दुरदर्शन संचावरील चित्र व चलत चित्रे यांच्या गुणवत्तेत वाढ होवून ते अधिक सुस्पष्ट स्वरुपात दिसतील त्याचप्रमाणे आवाजाच्या गुणवत्तेत सुध्दा सुधारण होईल. उपलब्ध वाहिन्यांची संख्या पायाभूत सेवा पातळीवर कमीत कमी 100 चॅनल्स समाविष्ट आहेत, असे असले तरी ही पध्दत वर्गणीदारावर बंधनकारक नाही. वर्गणीदार जास्तीत जास्त आवडीचे फ्री टू एअर चॅनल्स घेऊ शकतो. वर्गणीदार पे चॅनल्स बरोबर एफ.टी.ए. किंवा त्याशिवाय चॅनल्सची निवडही करु शकतो, त्यासाठी दरमहा रु. 150/- पेक्षा जास्त भाडे त्यास आकारले जाणार नाही. या शिवाय इलेक्ट्रॉनिक प्रोग्रॅम गाईड, मुव्ही ॲण्ड व्हिडीओ ऑन डिमांड, पर्सनल व्हिडिओ रेकॉर्डरची मागणी करता येईल.  केबल संबंधीच्या तक्रारीचे निवारण टोल फ्री नंबर व वेबसाईटमुळे कालमर्यादेत शक्य व बंधनकारक झाले आहे. आणि महत्वाचे म्हणजे केबल धारकांना स्वतंत्र ओळखपत्र मिळणार असल्याने त्याचा इतर योजनांसाठीही फायदा होईल. तरी वरील सर्व बाबी लक्षात घेता तालुक्यातील नागरी भागातील सर्व दुरचित्रवाणी केबल धारकांनी आप-आपल्या भागातील अधिकृत एम.एस.ओ/एल.सी.ओ. यांचे कडून अधिकृत किंमत देऊन व रितसर पावती घेऊनच सेट-टॉप बॉक्सची खरेदी करुन बसवून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


                                                                * * * * * * * *

Friday, 4 December 2015

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानापासून वंचीत पात्र लाभार्थ्यांनी संबंधित गाव तलाठयाशी संपर्क साधावा : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानापासून वंचीत पात्र लाभार्थ्यांनी
संबंधित गाव तलाठयाशी संपर्क साधावा
                                                                        : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

              चाळीसगांव, दिनांक 04 :-  विविधी आपत्तीकरीता शासनामार्फत वितरीत करण्यात आलेल्या अनुदानातुन खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्याचे कामकाज अंतीम टप्प्यात असून या अनुदानासाठी पात्र असलेले लाभार्थी आपले खाते क्रमांक दुरुस्ती वा अन्य कारणांमुळे अनुदान लाभापासून वंचित आहेत त्यांनी आपल्या अचुक खाते क्रमांक व बँकेच्या पासबुकासह दिनांक 15 डिसेंबर, 2015 पावेतो आपल्या गाव तलाठयाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
मा. विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडील दिनांक 23 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या पत्रानुसार विविध आपत्तींकरीता शासनाने वितरीत केलेल्या निधीपैकी वाटपा अभावी बँकेत पडून असलेल्या शिल्लक रकमा शासन खाती चलनाद्वारे भरणा करणेबाबत सुचित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने तहसिलदार चाळीसगाव यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 02 डिसेंबर, 2015 रोजी जिल्हा बँकेच्या 21 शाखांचे विभागीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत खरीप अनुदान 2014 करीता बाधित शेतक-यांना अनुदान वाटप करणेकामी चर्चा झाली. त्यात ज्या लाभार्थ्यांचे चुकीचे खाते क्रमांक, गावात बदल, नावात बदल , मयत , इत्यादी अनेक कारणांमुळे अनुदान लाभार्थ्यांच्या खातेवर वर्ग न होता बँकेत पडून आहे. अशा सर्व लाभार्थ्यांची गावनिहाय यादी बँकेतील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तदनंतर सर्व लाभार्थी यांच्या वर्षेनिहाय , गावनिहाय व शाखानिहाय यादया बँकेमार्फत तहसिल कार्यालयात पाठविण्यात येणार असून सदरच्या यादयातील लाभार्थी यांचे खाते क्रमांक व नावातील किरकोळ दुरूस्त्या करून अनुदान लाभार्थी यांचे खातेवर वर्ग करण्यात येणार असल्याने जे शेतकरी लाभार्थी खाते क्रमांक दूरूस्ती वा अन्य कारणांमुळे अनुदान लाभापासून वंचित आहेत त्यांनी त्यांचे खाते क्रमांक आपले बँकेच्या पासबुकासह दिनांक 15 डिसेंबर, 2015 पावेतो तहसिल कार्यालय, चाळीसगांव अथवा गावचे संबंधित तलाठी यांचेकडे सादर करावेत. तदनंतर उर्वरीत रक्कम शासनाकडे समर्पित करण्यात येणार असल्यामुळे यानंतर अनुदान न मिळालेबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

* * * * * * * *

मृदा दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : तालुका कृषी अधिकारी राजपुत

मृदा दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
                                                       : तालुका कृषी अधिकारी राजपुत

              चाळीसगांव, दिनांक 04:- जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शनिवार दिनांक 5 डिसेंबर, 2015 रोजी सकाळी 10:00 वाजता शहरातील गणेश मंगल कार्यालय, हिरापूर रोड, चाळीसगांव येथे उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत यांनी केले आहे.             
                     मनुष्यवस्तीच्या विकासासाठी पाणी, जंगल आणि जमिन या तीन गोष्टींची नितांत गरज असते. पिकांच्या वाढीसाठी जमिनीकडुन अन्नांश घेतले जातात, त्या बदल्यात नविन अन्नांशाचा जमिनीस पुरवठा करणे गरजेचे असते. जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी तसेच मनुष्य व प्राणी मात्रांसाठी जमिनीचे मुल्य अनन्यसाधारण आहे, या बाबत संपुर्ण तालुक्यामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक 5 डिसेंबर, 2015 जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील राहणार असून या कार्यक्रमामध्ये जमिनीचे आरोग्य पत्रीका वाटप करण्यात येणार आहे. त्याच बरोबर जमिनीचा मृद नमुना कसा घ्यावा, खताचा संतुलित वापर, शिफारशीनुसार खतांच्या मात्रा देणे, सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर अशा अनेक विषयांवर तांत्रिक मार्गदर्शनदेखील होणार असून या कार्यक्रमास तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत यांनी केले आहे.

                                                                * * * * * * * *

Friday, 27 November 2015

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानासाठी पात्र खातेदारांना आवाहन

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानासाठी
पात्र खातेदारांना आवाहन

              चाळीसगांव, दिनांक 27 :-   पाचोरा तालुक्यातील खरीप-टंचाई अनुदान 2014 तसेच माहे फेब्रुवारी व मार्च 2014 गारपीट अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांना अनज्ञेय असलेल्या अनुदानाची रक्कम अद्यापपर्यंत बँकेत  शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. सदरची रक्कम खातेदारांच्या खात्यावर वर्ग न होता बँकेत शिल्लक असल्याने ती संबंधितांनी आपल्या खात्यावर जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करावी तसेच ज्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाली असेल अशा शेतकऱ्यांनी ती तात्काळ काढून घ्यावी असे आवाहन पाचोरा तहसिलदार दिपक पाटील यांनी केले आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांना खरीप-टंचाई अनुदान 2014 व गारपीट अनुदानाची रक्कम प्राप्न झाली नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावचे तलाठी यांचेशी व बँक अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधावा व आपणास वितरीत झालेल्या अनुदानाची रक्कम प्राप्त करुन घ्यावी. सदर अनुदानातील उर्वरित रक्कम तात्काळ शासन जमा करावयाची असल्याने शेतकऱ्यांनी कृपया प्राधान्याने याबाबत संबंधितांकडे चौकशी  करण्याचे आवाहन दिपक पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                    
* * * * * * * *

Monday, 23 November 2015

वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी वनविभाग, महसूल सह पोलीस विभागाची धडक कारवाई


वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी
वनविभाग, महसूल सह पोलीस विभागाची धडक कारवाई

              चाळीसगांव, दिनांक 23 :-   पाचोरा वनक्षेत्रातील शिवणी येथील सुमारे 100 एकर क्षेत्रातील वनजमिनीवर मागील 2 ते 3 वर्षापासून काही लोकांकडून अतिक्रमण करित शेतीसाठी जमीन तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर रहिवासासाठी झोपडया देखील बांधण्यात आल्या होत्या. वाढत्या अतिक्रमणामुळे वनक्षेत्राचा मोठया प्रमाणात  ऱ्हास होत होता. यासाठी जळगांव वन विभागाचे उपवन संरक्षक आदर्श रेड्डी यांनी हाती घेतलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या धडक मोहिमेतंर्गत सहाय्यक वनसंरक्षक आय.एम.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस विभागाच्या सहकार्याने ‍ भडगांव तालुक्यातील शिवणी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई  करण्यात आली.
                     या धडक मोहिमेची पुर्व तयारी म्हणून भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप निकम यांनी भडगांव तहसिलदार बि.ए.कापसे यांच्या अध्यक्षतेखाली वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील यांच्या उपस्थितीत सर्व अतिक्रमण धारकांची बैठक बोलावून स्वत: अतिक्रमण काढून घेण्याविषयी समज दिली तर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही या करिता विशेष खबरदारी घेण्यात आली. मोहिम राबवितांना उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड व सहाय्यक उपवनसंरक्षक आय.एस.पाटील हे उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेची पहाणी करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नायब तहसिलदार अमित भोईटे, पोलीस निरीक्षक दिलीप निकम, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, उत्तमराव जाधव, संजय मोरे, संजय पाटील या अधिकाऱ्यांसह वनविभागाचे 65 कर्मचारी, पोलीस विभागाचे 50 कर्मचारी, एस.आर.पी.एफ. प्लाटुनसह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खबरदारीची उपाययोजना म्हणुन एका रुग्णवाहिकेची देखील यावेळी व्यवस्था करण्यात आली होती.
अतिक्रमण निर्मुलणासह जलसंधारणाचेही काम
                     सदर कारवाई अंतर्गत 16 जे.सी.बी. च्या सहाय्याने अतिक्रमीत जमिनीवरील अतिक्रमण काढून प्रत्येकी 10 मिटर अंतरावर लांब व खोल असे चर खोदण्यात आले त्यामुळे अतिक्रमणाला आळा बसून पावसाचे पाणी या चरांच्या माध्यमातून जमिनीत मुरविण्यात मोठी मदत होईल व या दोन चरामधील जमिनीवर वन विभागामार्फत लवकरच वृक्षलागवडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर वनजमिनीवर पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर भविष्यात कठोर कारवाई करण्यात येईल असे महसुल प्रशासनाने एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                     काही दिवसापुर्वीच भडगांव तालुक्यातील धोत्रे व वलवाडी परिसरातील एकुण सुमारे 130 एकर  वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. तर आता शिवणी परिसरातील 100 एकर जमिनीवरील अतिक्रमण काढल्यामुळे संपुर्ण पाचोरा वनपरिक्षेत्र अतिक्रमणाच्या विळख्यातुन मुक्त झाल्याचे महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. सदर कारवाईचे शिवणी गावचे सरपंच स्वरुपसिंग राजपुत, ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.
                    
* * * * * * * *

Friday, 9 October 2015

ब्रेस कँसर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक : डॉ.निलेश चांडक


ब्रेस कँसर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक : डॉ.निलेश चांडक

चाळीसगांव, दिनांक 09 :-  ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्या विषयी मोठया प्रमाणात गैरसमज असून  ब्रेस कँसर बाबत जनजागृतीसाठी व्यापक चळवळ गरजेची असल्याचे प्रतिपादन कँसर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी शहरातील स्व.चंदीराम बजाज हॉल सिन्धी कॉलनी चाळीसगाव येथे आरोग्य विभागामार्फत आयोजित कँसर जनजागृती कार्यशाळेत केले.

            यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचायत समिती सभापती श्रीमती आशाताई साळुंखे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उन्मेश पाटील, उपसभापती लताताई दौंड, गट विकास अधिकारी डॉ.आर.के.मोराणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दुसाणे, महिला बालविकास अधिकारी वनिता सोनगड, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद सोनवणे, शशिकांत साळुंखे, बाजीराव दौंड, डॉ.कमलेश चव्हाण, डॉ.प्रमोद ओसवाल आदी उपस्थित होते.

            मानवाची बदलती जिवनशैली, व आरोग्याबाबत असलेल्या गैरसमजामुळे मोठया प्रमाणात आजार बळावत असतात, मानवाचा अनियमीत आहार, व्यायामाचा अभाव  व फास्ट फुड हे आजारांना पाय पसरविण्यासाठी पोषक वातावरण तयार करत असतात. तर मोठया प्रमाणात असलेल्या आरोग्याच्या गैरसमजामुळे आजाराचे अचुक निदान केले जात नाही. या सर्व कारणांमुळे आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. आज स्तनांच्या कँसरचे जवळपास दिड लाख नवीन रुग्ण दाखल होतांना दिसतात, तर दर दिवशी 200 रुग्ण हे कँसर आजारामुळे मृत्युमूखी पडतात हे भयावह आकडे नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती महत्वाची असून ग्रामीण भागात कर्तव्यास असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी गावपातळी पर्यंत जाऊन महिलावर्गाशी सुसंवाद साधावा व ब्रेस कँसरची लक्षणे, घ्यावयाची काळजी व उपचारासाठी शासकीय रुग्णालयात असलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती पोहचवावी.  तसेच शासनाच्या जिवनदायी योजनेअंतर्गत या आजारांवर मोफत उपचाराची सोय असल्यामुळे संशयीत रुग्णांना तात्काळ निदान व उपचारासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन डॉ. निलेश चांडक यांनी या आरोग्य शिबीरात उपस्थित महिला वर्गाला केले. कँसरचे प्रमाण महिलांसोबत व्यसनांमुळे पुरुषांमध्येही मोठया प्रमाणात वाढले असून तंबाखु , सिगारेट, गुटखा या सारख्या तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाच्या कँसरचे प्रमाणही भयावह आहे. व्यसनमुक्तीसाठी शासनामार्फत मोठया प्रमाणात प्रचार प्रसिध्दी केली जात असूनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहनही डॉ.चांडक यांनी यावेळी केले. स्तनांचा कँसर, मुखाचा कँसर, त्वचेचा कँसर, जठराचा, फुप्फुसाचा व स्वरयंत्राचा अशा विविध प्रकारच्या कँसर विषयी मार्गदर्शन करतांना कँसरची प्राथमिक लक्षणे, प्राथमिक अवस्था, निर निराळी परिक्षणे या विषयी माहिती देऊन कँसरचे पहिल्या टप्प्यात निदान व उपचार घेतल्यास रुग्णाचे 95 टक्के आयुष्य सुरक्षीत होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वर्षभरात उप जिल्हा रुग्णालयासह ट्रामा सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करणार : आमदार उन्मेश पाटील

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार उन्मेश पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, तालुक्याची आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी येत्या वर्षभरात उप जिल्हा रुग्णालयासह ट्रामा सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी म्हणाले. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेवीका व आशा वर्कर हया आरोग्य सेवांचा मुळ कणा असून त्या गावपातळीवर घराघरात जाऊन महिलांशी संवाद साधतात त्यामुळे यांचेमार्फत आरोग्या विषयी जनजागृती फलदायी ठरणार आहे. तर आमदार होण्यापुर्वी सेंद्रीय शेतीबाबत मी स्वत: मोठया प्रमाणात प्रचार केला असून सेंद्रीय शेतीमधुन मिळणाऱ्या खाद्यान्नामुळे कँसर सारख्या आजारांना फाटा देता येऊ शकतो. त्यामुळे सेंद्रीय शेतीबाबतही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

            यावेळी शशीकांत साळुंखे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना आरोग्य शिबीराचा उपक्रम स्तुत्य असुन असे उपक्रम नियमीत राबवावे, कँसर तज्ञामार्फत प्रबोधनासाठी राबविण्यात आलेले शिबीरास मिळालेला उत्तम प्रतिसाद पहाता विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांना आमंत्रीत करुन प्रबोधन करण्यात यावे असे मतही त्यांनी यावेळी मांडले. तालुक्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रमोद ओसवाल यांनी केले तर आभार डॉ.सुरेश पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मोठया संख्येने उपस्थित होत्या.
* * * * * * * *

Wednesday, 7 October 2015

महाराजस्व अभियानामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख होणार : तहसिलदार बाबासाहेब गाढवे


महाराजस्व अभियानामुळे
महसूल प्रशासन लोकाभिमुख होणार‍!
: तहसिलदार बाबासाहेब गाढवे

              चाळीसगांव, दिनांक 07 :-  सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरीत निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान राबविण्याच्या सुचना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या असून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण सात महसुल मुख्यालयी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्याचे आदेश तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आज आढावा बैठकीत दिले.

                     यावेळी गट विकास अधिकारी डॉ.आर.के.मोराणकर, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत, महावितरणाचे कार्यकारी अभियंता डी.के.मोहोड, लागवड अधिकारी पी.डी.खैरनार, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे,  यांच्यासह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसिलदार गाढवे म्हणाले की, महाराजस्व अभियानांतर्गत लोकाभिमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश राहणार असून गावपातळीपर्यंत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याने सर्व जनतेने यात सक्रीय सहभाग घेऊन लाभ घ्यावा.

                     दर ‍ महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हे अभियानाचे आयोजन करतांना ज्या बुधवारी शासकीय सुटी येईल त्यांच्या दुसऱ्या दिवशी आयोजन करण्यात यावे. या अभियानाच्या आयोजनाप्रसंगी  विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी नमूद दिवशी मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी तसेच चर्चासत्र, प्रबोधनपर कार्यक्रम, तक्रारी, गाऱ्हाणी या विस्तारीत समाधान योजनेत समाविष्ठ करण्यात येणार असून याचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचविण्याच्या सुचना देखील त्यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिल्यात.

                     तालुक्यातील मेहुणबारे, शिरसगांव, तळेगांव, हातले, खुडकी बु, बहाळ व चाळीसगांव या सातही मंडळ मुख्यालयी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या योजनेच्या अंमलबजावणी व नियोजनासाठी मंडळ अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी विस्तारीत समाधान योजनेचे आयोजन करणे, समन्वय साधने, प्राप्त तक्रारींचा संबंधीत विभागाशी पाठपुरावा करण्याबरोबर संबंधित विभागांशी समन्वय साधुन या योजनेचा अहवाल इतिवृत्तासह सादर करण्याचे आदेशही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी यावेळी दिले.

* * * * * * * *

कुष्ठरोग जनजागरण मोहिमेचा लाभ घ्यावा : डॉ.प्रमोद सोनवणे


कुष्ठरोग जनजागरण मोहिमेचा लाभ घ्यावा : डॉ.प्रमोद सोनवणे
 
चाळीसगांव, दिनांक 07 :-  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगुडे    सहाय्यक संचालक (आरोग्य) जळगाव डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यात दिनांक ३ ते १७ ऑक्टोंबर २०१५ या कालावधीत कृष्ठरोग जनजागरण मोहिम राबविली जात आहे, या ‍ मोहिमेचा शुभारंभ दि.२ ऑक्टोंबर,२०१५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपन्न झाला. या अभियानात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, निबंधस्पर्धा  व कुष्ठरोगाबाबत प्रश्नमंजुशा तसेच समाजातील लोक प्रतिनिधी व मान्यवरांना कुष्ठरोगाबाबत माहिती देवून त्यांच्या सहकार्याने या कुष्ठरोगाबाबत समाजात असलेला गैरसमज दुर करण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे प्रचार करणे, रोग निदान शिबीरांचे आयोजन करणे इत्यादी कार्यक्रमाद्वारे जनजागरण मोहिम राबविणार असल्याने तालुक्यातील सर्व संबंधितांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी केले आहे.

            या  मोहिमेदरम्यान आज दिनांक ०७ ऑक्टोंबर, २०१५ रोजी तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील ३५ वर्षीय महिला उपचारासाठी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आल्या असता येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ.हमीद पठाण यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली, तर रुग्णास कुष्ठरोग सांसर्गिक असल्याचा संशय आल्याने तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. तालुक्यातुन कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्याचा मानस असल्याने तालुक्यातील सर्व संबंधित नागरिकांनी आरोग्य केंद्रात व आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात जाऊन तपासणी व उपचार करुन घ्यावेत व कुष्ठरोग जनजागरण मोहिम यशस्वी करावी असे आवाहनही डॉ.सोनवणे यांनी केले आहे.

* * * * * * * *

चाळीसगाव येथे 9 ऑक्टोंबरला
कँसर निदान कार्यशाळेचे आयोजन

चाळीसगांव, दिनांक 07 :- स्व.चंदीराम बजाज हॉल सिन्धी कॉलनी स्टेशन रोड, चाळीसगाव येथे शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०१५ रोजी कँसर तज्ञ डॉ.निलेश चांडक, जळगांव हे कँसर निदान जनजागृती कार्यक्रमास मार्गदर्शन करणार आहेत. सदर कँसर निदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगावचे आमदार श्री.उन्मेश पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले असून कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सौ.आशालता साळुंखे, उप सभापती लताताई दौंड  तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती  सदस्य यांचेसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शामसुंदर  निमगडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जे.जे.मोरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

           तरी चाळीसगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांनी द्वीतीय वैदयकीय अधिकायांवर ओ.पी.डी. ची जबाबदारी सोपवून आपल्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेवीका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आरोग्य  सेविका व सहाय्यकांना  शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०१५ रोजी  सकाळी  ०९:०० वाजता  उपस्थित राहण्याच्या सुचना देवून आपणही स्वत: वेळेवर उपस्थित रहाण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव यांनी एका  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

* * * * * * * *

Monday, 5 October 2015

राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत 98 लाभार्थ्यांना धनादेश वाटप



राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत
98 लाभार्थ्यांना धनादेश वाटप
 
              चाळीसगांव, दिनांक 05 :- दारिद्रय रेषेखालील कुटूंबाचा कमविता व्यक्ती गमावलेल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी केंद्र शासनाची राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजना कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत चाळीसगांव तालुक्यातील एकूण 98 लाभार्थ्यांच्या वारसांना आज तहसिल कार्यालयात उमंग समाज शिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती संपदा उन्मेश पाटील यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नितीन पाटील,हिराशेठ बजाज, निलेश राजपूत, प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, संगायो नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, आदी उपस्थित होते.

                     शहरासह तालुक्यातील एकूण 98 लाभार्थ्याना एकूण 19 लाख 20 हजार इतक्या रकमेचे धनादेश वाटप करतांना मनस्वी आनंद होत असून कुटूंब प्रमुख गमावलेल्या कुटूंबाला अर्थसहाय्य देऊन आधार देण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे यावेळी उमंग समाज शिल्पी महिला ‍ परिवाराच्या संस्थापिका तथा आमदार उन्मेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती संपदा पाटील यावेळी म्हणाल्या.

                     यावेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी राष्ट्रीय सामाजिक कुटूंब अर्थसहाय्य योजनेबद्दल माहिती देतांना  सांगितले की, दारिद्र रेषेखालील कुटूंब प्रमुखाचा अपघाती अथवा ‍ नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटूंबाला आधार देण्यासाठी ही अर्थसहाय्य योजना कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा कुटूंबातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यू दिनांकापासून एक वर्षाच्या आत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेकरिता दारिद्र रेषेखालील कुटूंबातील कुटूंब प्रमुखाच्या मृत्यू दिनांकास सदर मयत व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अशा पात्र लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील मुळ अर्ज, दारिद्र रेषेखालील यादीत नाव समाविष्ठ असल्याचा पुरावा व मयत दाखला सादर करणे आवश्यक आहे. अशा पात्र लाभार्थ्यांच्या कुटूंबातील वारसांना रु. 20 हजार इतक्या रकमेचे अर्थसहाय्य देण्यात येते.

* * * * * * * *

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
 
              चाळीसगांव, दिनांक 05 :- भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी 1 जानेवारी 2016 याअर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
                     या कार्यक्रमांतर्गत दिनांक 8 ऑक्टोंबर 2015 (गुरूवार) ते 7 नोव्हेंबर 2015 (शनिवार) या कालावधीत नवीन नोंदणी फॉर्म क्र.6, नांव नोंदणी वगळणी फॉर्म क्रमांक 7, तपशील दुरूस्ती फॉर्म क्र.8, नांव स्थलांतर फॉर्म क्र.8-अ स्वीकारण्यात येणार असून सदरचे फॉर्म आपल्या यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करावे या कार्यक्रमांतर्गत दिनांक 11 ऑक्टोंबर व 18‍ ऑक्टोंबर 2015 या दिवशी  विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
                     तरी सर्व नवमतदारांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी असे आवाहन चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्री.मनोज घोडे पाटील व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी यांनी संयुक्तपणे केले आहे.

 * * * * * * * *

पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षणाचे आयोजन
लाभ घेण्याचे सहसंचालक कोषागारे बाळासाहेब घोरपडेंचे आवाहन

        चाळीसगांव, दिनांक 05 :- दैनंदिन शासकीय कामकाज, विशेषत: प्रशासकीय कामे व लेखाविषयक कामे करणाऱ्या पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना शासकीय नियम व पध्दतीची सविस्तर माहिती, विविध अधिनियम व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कामाचा निपटारा त्वरित व योग्य प्रकारे तर होतोच शिवाय वरिष्ठांना कामाचे निर्णय घेणे सुलभ होते. कर्मचाऱ्यास लेखानियमांचे ज्ञान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी या दृष्टीने वित्त व लेखा सेवा नियमासंबंधी नियमित  प्रशिक्षणवर्ग  वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था नाशिक येथे ‍ प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असतात त्या अनुषंगाने 13 व्या सत्राचे प्रशिक्षण वर्ग हे 20 ऑक्टोंबर, 2015 ते 7 जानेवारी, 2016 या 60 दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षण वर्गासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्र लेखा लिपीक यांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यासाठी विवरणपत्र क्रमांक 1 व त्यासोबत आवेदन पत्र (अ) मध्ये पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती कार्यालय प्रमुखांच्या शिफारशीसह पाठविण्याचे आवाहन लेखा व  कोषागारे  नाशिक विभागाचे सहसंचालक बाळासाहेब घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 * * * * * * * *

Friday, 24 April 2015

मतदारांच्या कार्डला आता आधार लिंकिंग निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा ! प्राताधिकारी गणेश मिसाळ



मतदारांच्या कार्डला आता आधार लिंकिंग
निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा !
                                               : प्राताधिकारी गणेश मिसाळ

              चाळीसगांव, दिनांक 24 :- निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरु असून आता मतदान कार्डास देखील आधारचीच जोडणी करण्याचा निर्णय घेत जोडणीसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराने त्याची त्वरित जोडणी करण्याचे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.
                     केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माहे मार्च ते जुलै 2015 दरम्यान याद्या प्रमाणीकरण आणि शुध्दीकरणाचा कार्यक्रम जाहिर केला आहे. ज्या मतदारांनी त्याचे अद्यावतीकरण करण्यासह दोन्ही नंबर लिंक केले नाही, अशा मतदारांना आगामी निवडणुकांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित त्याची जोडणी करणे अनिवार्य असल्याचे निवडणूक शाखेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदारांना मतदार कार्ड लिंक करता येईल आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे त्यासाठी आधार क्रमांकासह माहिती भरावी लागेल, त्याच बरोबर ज्या मतदारांना ऑनलाईन आधार क्रमांक मतदान कार्डबरोबर जोडणे शक्य नसेल अशा नागरिकांनी आपल्या संबंधित बि.एल.ओ.कडे सदर आधार कार्ड व मतदान कार्डच्या झेरॉक्स प्रती तात्काळ जमा करण्याचे आवाहनही प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.
मतदान कार्ड असे करता येईल लिंक
*   निवडणूक आयोगाच्या http://eci.nic.in  या संकेतस्थळावर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर आधार क्रमांक व 
      इतर माहिती भरता येईल.
*   मोबाईलवरुन 166 / 51969 या क्रमांकावर ECILINK<SPACE>EPIC NO<SPACE>AADHAR NO
     असा मेसेज पाठवूनही ते लिंक करता येईल.
*    http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपडेट युवर आधार इन इलेक्ट्रोरोल नंतर नाव, आधार 
      नंबर, मतदान कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, क्लिक सबमिट बटण या व्दारे लिंक करता येईल.
*    www.nvps.in  यातून आधार फिड लिंकवर जाता येईल.

                     तरी सर्व मतदारांनी आपले मतदान कार्ड आता आधारशी लिंक करण्यासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करुन मतदारयाद्या अद्यावतीकरणाच्या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे पाचोरा प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


* * * * * * * *

Tuesday, 24 March 2015

लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने जलयुक्त शिवार अभियान राबवावे : प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील


लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने
जलयुक्त शिवार अभियान राबवावे
: प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील

              चाळीसगांव, दिनांक 24 :-  सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 हे धोरण निश्चित करुन राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य आत्मा हा लोकसहभाग आहे. लोकसहभागातुन व स्वयंस्फुर्तीने अभियान राबविल्यास अभियान यशस्वी होऊन टंचाईवर यशस्वीपणे मात करणे शक्य होईल असे आवाहन पाचोरा तालुक्यातील लोहारा गावचे प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील यांनी लोहारा येथे केले.
                     राज्य व देशभरातुन अनेक कृषी पुरस्काराने सन्मानित झालेले व सेंद्रीय शेतीमध्ये वेगळी ओळख निर्माण करुन आपल्या यशस्वी कार्याचा ठसा देशभरात उमटविणारे पाचोरा तालुक्यातील लोहा-याचे प्रगतीशील शेतकरी विश्वासराव पाटील यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनिय कामकाज व अनुभव पहाता त्यांना जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हा स्तरावरील समितीवर तज्ञ सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. त्यांच्या शेतशिवाराची पहाणी करण्यासाठी पाचोरा प्रातांधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष गणेश मिसाळ, तालुका कृषी अधिकारी तथा समिती सदस्य सचिव दिपक ठाकूर, सरपंच अक्षय जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाणी दौ-यात श्री.पाटील बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत लोहारा गावाची निवड झाली असून विश्वासराव पाटील यांच्या कोरडवाहु शेतामध्ये जलसंधारण व मृदसंधारणाबाबत त्यांनी केलेल्या विविध कामांची पहाणी करतांना म्हणाले की, स्वत:च्या खर्चातुन 25 वर्षापुर्वी लोंदडी नाल्यावर केलेला सिमेंट बंधा-यामुळे त्यांच्या शेतीची वाढती उत्पादकता पहाता सर्व शेतक-यांनी शासनाच्या मदतीची वाट न पहाता ज्यांना शक्य असेल त्यांनी छोटे-छोटे बंधारे बांधले पाहिजेत. जिल्हयाभरात ज्या नाल्यांवर कृषी विभाग व लघुसिंचन विभाग यांच्याकडून सिमेंट नालाबांधची कामे झाली आहेत तेथील बांधामध्ये साचलेला गाळ व केरकच-यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. यासाठी  बांधाकाठच्या शेतक-यांनी एकत्र येऊन जे.सी.बी. च्या सहाय्याने खोदकाम करुन गाळ व कचरा काढून नाल्याची खोली व रुंदी वाढविल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढते व काढलेला गाळ हा सुपिक असल्यास शेतामध्ये टाकून शेतीची सुपिकता देखील वाढते. त्यामुळे उत्पादन वाढीवर निश्चीत परिणाम होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
                     लोहा-यामध्ये मागील वर्षी सुमारे 2200 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडीगचे म्हणजेच शेताच्या बांधाचे मजबुतीकरण करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात जिरण्यास मोठी मदत झाली तर भुजल पातळीत देखील मोठया प्रमाणात वाढ झाली. अशा प्रकारची कामे कृषी विभागामार्फत संपुर्ण जिल्हयात करण्यात येत आहे मात्र यामुळे शेतात पाणी साचुन पिकांचे नुकसान व जमीन खराब होईल या अज्ञानामुळे अनेक शेतकरी हे कंपार्टमेंट बंडींग फोडतात व केलेले जलसंवर्धनाचे काम व्यर्थ जाते. शेतक-यांनी चुकीच्या समजावर आधारित राहून असे बांध फोडु नये असे आवाहनही त्यांनी यांवेळी केले.            जिल्हयाभरात ज्या नाल्यांवर कोल्हापुरी पध्दतीने बंधारे झाले आहेत तेथील पाटया हया पावसाळयापुर्वी काढणे व ऑक्टोंबर वा नोव्हेंबर ‍ महिन्यात पुन्हा टाकणे हे काम आसपासच्या शेतक-यांनी स्वयंस्फुर्तीने समिती तयार करुन पुढाकार घेऊन केले पाहिजे. शिवारातील पाणी  जमिनीत जिरविल्यास त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात होऊन चांद्या पासून बांधा पर्यंत संपुर्ण परिसर सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
                     यावेळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ म्हणाले की, मागील दोन वर्षापुर्वी याच गावाला दर दिवसाला 24 टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात होता. त्यावरुन या गावातील पाणी टंचाईची ‍भिषणता लक्षात येते. त्यावर मात करण्यासाठी प्रगतिशील शेतकरी विश्वासराव पाटील यांनी जलसंधारणाच्या केलेल्या कामाचा आदर्श सर्व शेतक-यांनी घेतल्यास जिल्हाभरात जल व मृदसंधारणाचे प्रचंड मोठे काम होण्याचा आशावाद व्यक्त केला. तर तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकूर यांनी विश्वासराव पाटील यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांचा सत्कारदेखील केला. यावेळी सरपंच अक्षय जयस्वाल यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व शेतक-यांच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याची हमी घेतली. तर मंडळ अधिकारी महेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

* * * * * * * *

Sunday, 15 March 2015

ग्राहक जागरुक राहिल्यासच तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल : आमदार : उन्मेश पाटील

ग्राहक जागरुक राहिल्यासच
तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल
आमदार : उन्मेश पाटील

              चाळीसगांव, दिनांक 15 :- ग्राहक जागरुक राहिल्यासच तो ख-या अर्थाने ग्राहक राजा बनेल असे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी आज जागतिक ग्राहक दिनानिमीत्त तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे आयोजित कार्यक्रमात केले. प्रतिमा पुजन करुन प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार उन्मेश पाटील व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार उन्मेश पाटील हे होते.
                     अध्यक्षीय भाषणात आमदार उन्मेश पाटील  म्हणाले की,  ग्राहकांना आपल्या हक्काबद्दल पुर्ण जाणिव असने आवश्यक आहे. काही अज्ञानी ग्राहक व काही अनास्थादर्शक ग्राहकांमुळे ग्राहक हक्कात बाधा निर्माण होऊन व्यापारी व उत्पादक याचा फायदा घेतात. आमदार पाटील पुढे म्हणाले की, ग्राहक प्रबोधनासाठी व ग्राहक कायद्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रचार व प्रसार होण्यासाठी मी प्रायोजक म्हणून त्यासाठी वर्तमानपत्रांमधुन जाहिरात पत्रके, मुख्य चौकातील फलकाव्दारे जनजागृती करण्यासाठी लोकप्रतिनीधी या नात्याने माझ्याकडून मी स्वत: पंचवीस हजाराची मदत देण्यास तयार आहे. तसेच ग्राहक चळवळ अधिक बळकट होण्यासाठी ग्राहक संघटना, सार्वजानिक क्षेत्रातील संघटना, व्यापारी ठेकेदार, पुरवठादार, बि-बीयाणे व खत विक्रेते यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मौलीक सुचना देखील तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांना केली.
                     ग्राहक पंचायत चाळीसगांव अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र चाळीसगांव शाखेचे सचिव तथा ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक रमेश सोनवणे यांनी आप-आपल्या यथोचित भाषणात ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, ग्राहक कायद्याची निर्मीती, उद्देश, ग्राहक कायद्याचा इतिहास, ग्राहकांना मिळालेले न्याय, तक्रार करण्याची पध्दत, या विषयी विस्तृत माहिती देऊन काही प्रबोधनपर उदाहरणे दिली. व उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले.
                     मनुष्य हा आजन्म ग्राहक असतो म्हणून प्रत्येकाने एक जबाबदार ग्राहक बनावे, वस्तु घेतांना त्याची वैधता, आकारमान, दर, योग्यता या सर्व बाबी तपासल्यास आपली फसवणूक होणार नाही असे सांगून या कायद्याविषयी विस्तृत स्वरुपात विश्लेषण आपल्या प्रास्ताविकातुन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले.
                     या प्रसंगी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन चाळीसगांवचे सचिव विकास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहीदास पाटील, शाम शिरोडे, लालचंद बजाज, तालुका भाजपा अध्यक्ष के.बी.पाटील, कृष्णेश्वर पाटील, ग्रहक संघटना सदस्या डॉ.सुनिता घाटे, डॉ.मधुलिका महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बीएसएनएल, एमएसईबी  व वजनमापे कार्यालयाचे प्रतिनीधी, महसूल अधिकारी व कर्मचारी वर्गासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ यांनी मानले.

* * * * * * * *