Saturday, 5 December 2015

शाश्वत शेतीसाठी माती परिक्षण गरजेचे : आमदार उन्मेश पाटील


शाश्वत शेतीसाठी माती परिक्षण गरजेचे : आमदार उन्मेश पाटील

              चाळीसगांव, दिनांक 05:-  मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मृदा दिवस या दिवसाचे औचित्य साधून शाश्वत शेतीसाठी साठी माती परिक्षण करण्याचा संकल्प सर्व शेतकऱ्यांनी करावा व शाश्वत शेती करावी असे आवाहन आमदार उन्मेश पाटील यांनी कृषी विभागामार्फत आयोजित मृदा दिनाच्या कार्यक्रमात केले. शहरातील हिरापुर रोडवर असलेल्या गणेश मंगल कार्यालयात तालुका कृषी कार्यालयामार्फत मृदा दिनानिमीत्त शेतकऱ्यांना जमिनीचा मृद नमुना कसा घ्यावा, खताचा संतुलित वापर, शिफारशीनुसार खतांच्या मात्रा देणे, सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर अशा अनेक विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार बोलत होते.
                     मनुष्य ज्या प्रकारे आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत असतो त्याच प्रमाणे जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी माती परिक्षणासह पाणी परिक्षण हे गरजेचे असते, तर यामुळे आपण मातीचा सन्मान असून मातीविषयी मनुष्य प्राणी मात्राने व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. जमिनीचे आरोग्य चांगले राहील्यास आपोआप निसर्गासह सर्व मनुष्य प्राणी मात्रांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. शाश्वत शेती करण्यासाठी मोठया प्रमाणात आभ्यास साहित्य उपलब्ध असून त्याचाही वापर शेतकऱ्यांनी करावा. शाश्वत शेतीवर मार्च महिन्यामध्ये सुभाष पाळेकरांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असून त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी केले. प्रत्येक तालुक्यात मोबाईल सॉईल टेस्टींग लॅब कार्यान्वित करण्यात येणार असून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठीच उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या मोठया प्रमाणात योजना राबविल्या जातात त्याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांशी सुसंवाद साधुन गावपातळीपर्यंत त्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना करत त्यासंबंधीचे माहितीपत्रके सर्व शेतकऱ्यांना वितरीत करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या. आजच्या मृदा दिनाचे औचित्य साधत प्रातिनीधीक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करतांना यावेळी तालुक्यातील 1541 शेतकऱ्यांच्या शेतीच्या आरोग्य पत्रीकांचे वाटप होणार असून पुढील तीन वर्षामध्ये तालुक्यातील एकुण 64,866 इतक्या संपुर्ण खातेदारांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
                     कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपुत यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची थोडक्यात माहिती करुन दिली त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, घन लागवड कापुस विकास योजना, संकरीत तुर उत्पादन कार्यक्रम, आंतरपिक प्रोत्साहनपर कार्यक्रम आदी योजनांची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांना हरभरा पेरणी करावयाचा आहे अशा शेतकऱ्यांनी महाबिज कडील बियाणे रु. 25 प्रति किलो अनुदानावर उपलब्ध असून मे.पंकज व सुयोग कृषी केंद्र चाळीसगांव यांचेकडे 30 किलोची बॅगला रु.750 अनुदान वगळता रु. 1560 ला शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
                     एकात्मिक अन्नद्रव्य संकल्पना, माती नमुना घेण्याची कार्यपध्दती व फायदे तोटे, नमुना तपासणी नंतर अहवाल वाचन, रासायनिक, जैवीक, सेंद्रीय खताचा वापर, जमिनीची रचना, भौतीक व रासायनिक गुणधर्म, सामु-क्षारता, भुसूधारकाचा वापर, जलसंधारण, मृदसंधारण, हिरवळीच्या खताचा वापर अशा अनेक बाबींवर तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी पी.डी.पाटील, पी.डी.वाघ, सुशील पाटील, तोरणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले तर शिंदी येथील प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी शेतीचा आभ्यास करुन केलेल्या शेतीबद्दल स्वत:चे अनुभव कथन केले. यावेळी जेष्ठ तज्ञ रामभाऊ शिरोडे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रेरीत केले.
                     या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती आशालता साळुंखे, भाजपा जिल्हा सरचिटणीस देवयानी ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव, माजी सभापती संजय पाटील, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, पं.स.सदस्य दिनेश बोरसे, जि.प.सदस्य राजेश राठोड, अनिल निकम, ॲङ राजेंद्र सोनवणे, शिंदी गावचे प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब राऊत, विश्वजीत पाटील, रामभाऊ शिरोडे, सतिष पाटे आदि मान्यवर तसेच  विविध ग्रामपंचायतीचे सरपंचांसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment