Friday, 11 October 2013

पीक वीम्याकडे शेतक-यांनी संरक्षण कवच म्हणून पहावे ! कृषी राज्यमंत्री संजय सावकारे


पीक वीम्याकडे शेतक-यांनी  संरक्षण कवच म्हणून पहावे !

                        -  कृषी राज्यमंत्री संजय सावकारे  
                जळगाव, दि. 11 :- शेतक-यांनी आपल्या पीकाचा वीमा उतरावितांना त्याच्याकडे अतिरिक्त्‍ लाभ म्हणून न पहाता संरक्षण कवच म्हणून पहावे असे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ तालुक्यातील शिंदी या गावी आज केले. कोरडवाहू शेती अभियान 2013-2016 जिल्हास्तरीय उदघाटन समारंभात ते बोलत होते. शेतक-यांना मार्गदर्शन करताना सावकारे पुढे म्हणाले  पीक वीम्याचा हप्ता हा उत्पादन खर्चाचा केवळ एक ती दीड टक्के असून शासनही यात आपला सहभाग नोंदीत असते. 70 टक्के कोरडवाहू शेतीची उत्पादकता  वाढविण्यासाठी शासनाने कोरडवाहू अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी 150 कोटी रुपये अनुदान उपलब्ध आहे. या अभियाना अंतर्गत  शिंदी गावाची निवड झाली असून चालू आर्थिक वर्षासाठी 3 कोटी रुपयाची तरतूद केली असल्याचे सांगून संपूर्ण अभियानासाठी 6 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या  तीन वर्षात शेतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
             यावेळी सावकारे यांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या विविध भित्तीपत्रिका व माहिती पुस्तीकेचे प्रकाशन केले. तसेच शेतक-यांना निविष्ठाचे वाटपही करण्यात आले.
               प्रारंभी प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. किसन मुळे यांनी कोरडवाहू शेती अभियानातंर्गत घेण्यात येणारी जलसंधारणाची कामे, शेतकरी प्रशिक्षण, शैक्षणिक सहल, शेती  यांत्रिकीकरण, शेतकरी गट स्थापना, शेती शाळा याची माहिती देऊन शेतक-यांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
           या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य समाधान पवार, सरपंच नवसिंग राजपूत, नारायण कोळी, आत्माचे संचालक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक पी. के. पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. डी. महाजन, परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी झांबरे व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.
* * * * * * * * *

No comments:

Post a Comment