Wednesday, 23 October 2024

सणासुदीची काळात विशेष मोहिम अंतर्गत सहाय्यक आयुक्तांचे अन्न व्यावसायिंकाना निर्देश

            जळगाव, दिनांक 23 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : दिवाळी सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे  सणासुदीत मोठ्या संख्येने नागरिक वस्तू आणि अन्नपदार्थांची खरेदी करतात.  येणाऱ्या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन ईत्यादी अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात भेसळीच्या तक्रारी येतात या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांना सूचना दिल्या आहेत.

 

             या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई इत्यादी अन्न पदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादन व विक्री होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनातर्फे अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची  विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

 

            प्रशासनातर्फे ग्राहकांना सुरक्षीत व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न व्यावसायिकांना काही सुचना देखील देण्यात आल्या आहेत. यामध्ये मिठाई विक्रेत्यांनी कच्चे अन्न पदार्थ जसे दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी हे परवानाधारक / नोंदणीधारक व्यावसायिकांकडुनच खरेदी करावेत व त्यांची खरेदी बिले जतन करावीत.

 

            तसेच मिठाई विक्रेत्यांनी अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यासयोग्य पाण्याचा वापर करावा. मिठाई विक्रेत्यांनी अन्न पदार्थाची स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मिठाई विक्रेत्यांनी त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्त या बाबत कामगाराची वैद्यकीय तपासणी करावी. मिठाई विक्रेत्यांनी मिठाई तयार करतांना केवळ फुड ग्रेड खाद्यरंगाचाच मर्यादित वापर करावा.

 

            मिठाई विक्रेत्यांनी दुग्धजन्य पदार्थाची मिठाईचे सेवन त्वरित करण्याबाबत ग्राहकांना सुचित करावेत. मिठाई विक्रेत्यांनी माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकुन ठेवावे. मिठाई विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करतांना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळाच तळण्यासाठी वापरावे. मिठाई विक्रेत्यांनी स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणुन करु नये. मिठाई विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलांवर त्यांच्याकडील FSSAI परवाना क्रमांक नमुद करावा. मिठाई विक्रेत्यांनी दुध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा यासारख्या नाशवंत पदार्थांची वाहतुक योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करावी.

 

            अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 नियम व नियमने मधील तरतुदींचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा सुचना अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त  सं.कृ.कांबळे यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment