Sunday, 6 January 2013

पत्रकारांनी कोणत्याही प्रलोबनाला बळी न पडता व्यवस्थेशी संघर्ष करावा . . ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान

      जळगांव दिनांक 6:- पेडन्यूज हा खुल्या अर्थव्यवस्थेतून वृत्तपत्रात आलेला दोष आहे. त्यामुळे प्रत्येक पत्रकाराने जबाबदारीने व प्रामाणिकपणे  काम करुन कोणत्याही प्रलोबनाला बळी पडू नये. त्यामुळे या व्यवस्थेत राहून व व्यवस्थेशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केल्यास चित्र बदलेल असे प्रतिपादन महाराष्ट्र टाईम्सचे राजकीय संपादक संदीप प्रधान यांनी  केले. ते आज जळगांव जिल्हा पत्रकार संघामध्ये आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पेड न्यूज व आचार संहिता या विषयी पत्रकारांना मार्गदर्शन करत होते.
     यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त अध्यक्ष विजय पाटील, जि.प. चे अध्यक्ष दिलीप खोडपे, आमदार शिरीष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत काळुंखे, ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे , मा. श्री. वसंतराव वाणी आदिसह पत्रकार वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.
     पत्रकार प्रधान पुढे म्हणाले सन 1990 नंतर सर्वच क्षेत्रात बदल झालेले असून भ्रष्टाचाराचे प्रमाणही वाढले आहे व असाच बदल प्रसारमाध्यमात ही झालेला आहे तसेच पेडन्यूज ही विविध प्रकारे पूर्वीपासूनच सुरु आहे. परंतु खुल्या अर्थव्यवस्थेमुळे तिच्या स्वरुपात बदल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
     तसेच निवडणूक सुधारणामुळे प्रसारमाध्यमाचे महत्व वाढून पेडन्यूज संकल्पनेच्या विस्तारास अधिकच चालना मिळाल्याचे श्री. प्रधान यांनी सांगितले तर जय महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक तुलसीदास भोईटे यांनी पत्रकारितेसमोरील आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
     प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस संपादक संदीप प्रधान यांनी पुष्पहार अर्पण केले. व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.  तसेच दिल्ली येथील बलात्कार पिडीतेस श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
     राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव वाणी व आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी केले. तर प्रास्तावीक हेमंत काळूंखे यांनी केले व अशोक भाटीया यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment