Tuesday, 21 August 2012

जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौरांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या समन्वयातून एकत्रित कार्यक्रम घ्यावा -आरोग्यमंत्री

  मुंबई, दि. 21 : राज्यात ठिकठिकाणी उद्‌भवणाऱ्या साथीच्या आजारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून  एकत्रित कार्यक्रम  घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री  सुरेश शेट्टी यांनी आज येथे दिले.
   सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्यस्तरीय किटकजन्य व जलजन्य आजारांसंबंधी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध महापालिकांचे महापौर यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. मुंबईचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
      श्री. शेट्टी म्हणाले की, साथीचे आजार फैलावू नये यासाठी उपाययोजना करण्याऐवजी हे आजार उद्‌भवणारच नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले पाहिजे. जेणेकरून निष्पाप जीवांना प्राणास मुकावे लागणार नाही. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आरोग्य विभागाने एकत्रित कार्यक्रम हाती घ्यावा. मुख्य म्हणजे दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन श्री. शेट्टी म्हणाले की, नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण केले जात आहे.
-टेंडरींगच्या माध्यमातून औषध खरेदी
    आरोग्य विभागात आता ई-टेंडरींगच्या माध्यमातून औषधे खरेदी केली जात आहेत. त्यासाठी राज्यात विभागीयस्तरावर आठ ठिकाणी गोडाऊन बांधण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालय यांना औषधांची गुणवत्ता तपासून ती वितरित केली जाणार आहेत. विशेष म्हणजे राज्य शासनासाठी पुरविण्यात येणाऱ्या औषधांचे पॅकींग वेगळे केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध औषधांचे ऑनलाईन ड्रग इन्वेंटरी मॉनीटरींग केले जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये शासनामार्फत जेनरीक औषध विक्री स्टोअर्स
   राज्य शासनामार्फत जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी जेनरीक औषध विक्री  स्टोअर्स सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सध्या पुरवठादारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. रुग्णांना 24X7 अशी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. असे सांगून आरोग्यमंत्री शेट्टी म्हणाले की,राज्य शासनामार्फत राज्यात 10 ठिकाणी मेट्रो ब्लडबॅंक उभारण्यात येणार आहेत.
आपात्कालीन रुग्णवाहिका सेवांचे जाळे विस्तारणार 
येत्या दीड वर्षात राज्यात आपात्कालीन रुग्णवाहिका सेवांचे जाळे विस्तारणार असून सुमारे 937 रुग्णवाहिकांची सेवा राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे. यासेवेसाठी आयुर्वेदीक, युनानी आणि होमिओपॅथी अशा सुमारे तीन हजार डॉक्टरांचा समावेश केला जाणार आहे, असेही श्री. शेट्टी यांनी सांगितले                        
            ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी स्वच्छता आणि शुद्ध पाणी याविषयी व्यापक प्रमाणावर लोकजागृती करावी, असे आवाहनही श्री.पाटील यांनी यावेळी केले.
शाळेत हेल्थ क्लब सुरू करावेत
    राज्यमंत्री श्रीमती खान म्हणाल्या की, आरोग्य विषयक जागरुकता निर्माण होण्याकरीता प्रत्येक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले हेल्थ क्लब सुरू करावेत. जेणेकरून  अशा क्लबच्या माध्यमातून आरोग्य विषयक जाणीवजागृती मुलांमध्ये निर्माण होण्यास मदतच मिळेल.
    यावेळी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सादरीकरण केले. या कार्यशाळेस ठाणे, अकोला, रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, भंडारा, जळगाव, सांगली येथील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच नागपूर, जळगाव, सांगली, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महापालिकांचे महापौर उपस्थित होते.

क बाबी :
*हिवताप,जपानी मेंदूज्वर, डेंग्युताप या आजाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सन 2012 पर्यंत 50 टक्क्यांनी
 कमी करण्याचे उद्दीष्ट
*राज्यातील हिवतापग्रस्त अतिसंवेदनशील 20 जिल्ह्यांमध्ये विशेष फवारणी मोहीम
*किटकजन्य आजाराची माहिती होण्यासाठी किटकशास्त्रीय सर्व्हेक्षणात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
*डेंग्यु, चिकुनगुनिया आजाराच्या निदानासाठी राज्यात 23 ठिकाणी सेंटीनल सेंटर्स. त्यापैकी 8 नविन
  सेंटर्सची स्थापना
*दुषित पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्याची संख्या 20
 
0 0 0 0

No comments:

Post a Comment