Saturday, 8 October 2016

शासनाच्या योजना उपेक्षितांपर्यंत पोहचवून त्यांचा विश्वास संपादन करा : आमदार उन्मेश पाटील


शासनाच्या योजना उपेक्षितांपर्यंत पोहचवून
त्यांचा विश्वास संपादन करा
                                                : आमदार उन्मेश पाटील
        चाळीसगाव दि. 8 (उमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृध्द करणारी महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना फलदायी ठरत आहे. शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्या उपेक्षितांपर्यंत पोहचवून त्यांचा विश्वास संपादन करण्याच्या सुचना आज आमदार उन्मेश पाटील यांनी दिल्या.
            जिल्हाभरात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवर आधारित माहितीपट निर्मीती करुन शेतकऱ्यांमध्ये जलप्रबोधन होण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत माहितीपटाची निर्मीती करण्यात येत आहे. या माहितीपटाचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच मनोहर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाणे, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत, कृषी अधिकारी अनिल येवले, अविनाश चंदीले, अतुल चव्हाण, वनविभागाचे श्री.पाटील, श्री.शेख, सिंचन विभागाचे श्री.शिंपी, बावीस्कर, पानलोट सचिव देवेंद्र पाटील, चित्रीकरणासाठी आलेले ब्रिज कम्युनिकेशनचे संचालक मिलींद पाटील व त्यांची टिमसह ग्रामस्थ, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी महाळशेवगे येथील जलयुक्तच्या कामांचे ब्रिज कम्युनिकेशनमार्फत स्थळ चित्रीकरणासह ड्रोनच्या माध्यमातून हवाई चित्रीकरण करण्यात आले. यावेळी मुलाखतीमध्ये आमदार पाटील म्हणाले, महाळशेवगे येथे विविध विभागामार्फत जलयुक्तची 41 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. पैकी 36 कामे पुर्ण झाली असून यावर शासनाने 68 लाख इतका निधी खर्च केला आहे. या 36 कामांमुळे 253 टि.एम.सी. इतका पाणीसाठा झाल्यामुळे गावातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुखावला आहे. तालुक्यात पहिल्या टप्प्यात 24 तर दुसऱ्या टप्प्यात 20 गावांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील 940 प्रस्तावीत कामांपैकी 767 कामे पुर्ण झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 562 कामे प्रस्तावित करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. शासनामार्फत शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवित असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन उपेक्षितांपर्यंत योजना पोहचविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित विविध विभागांच्या  अधिकाऱ्यांना दिल्या.
            यावेळी गावातील लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तर कृषीसह, वनविभाग, सिंचन विभागामार्फत गावात झालेल्या जलयुक्तच्या कामांचे चित्रीकरणही करण्यात आले.

* * * * * * * *

Monday, 3 October 2016

‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने’मुळे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलणार : मुख्यमंत्री

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेमुळे
ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलणार : मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 3 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घोषित केलेल्या  व  लोकार्पण केलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणयोजनेमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलणार असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले.
            महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रोजगार हमी विभागातर्फे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणयोजना पुस्तिकेचे प्रकाशन तसेच फ्लेक्सचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रोहयो मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरजलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशीरोहयो सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर, श्यामसुंदर पालीवाल (राजस्थान)श्री. प्रकाश पागे तसेच वरिष्ठ अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ही एक अत्यंत महत्वाकांक्षी लोकोपयोगी योजना सुरु केली आहे. महात्मा गांधी यांनी दिलेला आदर्श  ग्रामविकासातून भारताच्या समृध्दीचा मार्गतसेच लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानहा नारा खऱ्या अर्थाने आज सार्थ झाला आहे. महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंतीच्या या पवित्र दिनी हा त्यांना मानाचा मुजरा आहे. त्यांची तत्वे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणया योजनेमुळे आज खरी साकार होणार आहेत.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे तसेच ग्राम निर्मल व स्वच्छ करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न या योजनेमुळे साकार होणार आहे. नरेगाच्या माध्यमातून समृध्दी आली आहे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेबाबत रोहयो मंत्री रावल, रोहयो सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
श्री. रावल म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात देखील या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे व्हावीत याकरिता रोजगार हमी योजना विभागाने 'समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना' तयार केली आहे. या योजनेंतर्गत प्रमुख 11 कलमी कामे मोहीम स्वरुपात घेण्याचे ठरवून योजनेंतर्गतचा खर्च सुमारे 10,000 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेमुळे ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होऊन शेतकरी समृध्द होईल. पुढच्या काळापर्यंत या योजनेतील सर्व कामे पूर्ण केली जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. भापकर म्हणाले की, अहिल्यादेवी सिंचन विहीरी, अमृतकुंड शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे, अंकुर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड, संगोपन व संरक्षण तसेच ग्राम सबलीकरणाची समृद्ध ग्राम योजना ही 11 कलमी कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

००००

राज्यातील नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना लाभणार कोरियाचे आधुनिक तंत्रज्ञान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सार्वजनिक बांधकाम विभाग व कोरिया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार
राज्यातील नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना लाभणार
कोरियाचे आधुनिक तंत्रज्ञान
                                         -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक विकसित राज्य आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात नागरी विकासाचे प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूतसोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी कोरियाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा राज्याला उपयोग होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
        मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या उपस्थितीत आज सार्वजनिक बांधकाम विभाग व कोरिया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन (KLHC) यांच्यात राज्यातील नागरी पायाभूत प्रकल्पांना सहकार्यकरण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मदन येरावार, भारतातील कोरियाचेराजदूत किम साँग वून, कोरीया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन (KLHC) व्यवस्थापकीय संचालक ली की येओल, संचालक सॉन यँग हून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव (बांधकाम) सी. पी. जोशी, सचिव (रस्ते) एस. बी. तामसेकर आदी उपस्थित होते.
      यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने राज्यात नागरी विकासाचे विविध प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्र हे विकसित राज्य असल्याने जगातील अनेक देशांनी राज्यातील या विविध विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली आहे. त्याचबरोबर या प्रकल्पांना सहकार्य करण्यासाठी अनेक देश स्वत:हून पुढे येत आहेत. कोरिया सरकारच्या सहकार्याने कोरिया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन (KLHC) ने राज्यातील स्मार्ट सिटी, मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे वर उभारण्यात येणारी 24 हरित शहरे, बांद्रा शासकीय वसाहतीचा पुर्नविकास आणि राज्यातील रस्ते व पुलांचा विकास या प्रकल्पांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याचे ठरविले आहे ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कोरिया सरकारचे व कंपनीचे अभिनंदन केले. भविष्यातही राज्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी कोरिया सरकारचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
        यावेळी भारतातील कोरीयाचे राजदूत किम साँग वून म्हणाले की, कोरिया सरकार महाराष्ट्र राज्यातील विविध विकास प्रकल्पांना नागरी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देईल.
        राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि कोरिया लॅन्ड ॲन्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन (KLHC) च्या वतीने व्यवस्थापकीय संचालक ली की येओल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.                     

000000

जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्काराची घोषणा

जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणाऱ्या
पत्रकारांसाठी पुरस्काराची घोषणा
मुंबई, दि.3 : उत्कृष्ट लिखाणाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.
जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणारे पत्रकार आणि जलयुक्त शिवारअभियानाची त्या त्या परिसरात जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यास योगदान देणारे पत्रकार या पुरस्कारांसाठी पात्र राहणार आहे.
  या पुरस्काराचे पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असे दोन गट करण्यात आले आहे. पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर तर इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरावर हे पुरस्कार देण्यात येणार आहे.
  राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
  पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 35 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 25 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. विभागस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 30 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 20 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 15 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 12 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 51 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. पुरस्काराचा कालावधी हा एप्रिल ते मार्च असा राहील.
  पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील दैनिके, साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा तर इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी मराठी भाषेतील वृत्तकथेचा विचार करण्यात येईल.
          राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी जलसंधारणाचे महत्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लिखाण करुन या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.


* * * * * *

Sunday, 2 October 2016

शहरातील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे : पोलीस निरीक्षक बुधवंत

शहरातील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे
                                            : पोलीस निरीक्षक बुधवंत
चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) : चाळीसगाव शहरात होणा-या चो-या व गुन्हयांना आळा घालण्यासाठी  नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे नागरिकांनी बाहेरगावी जातांना किंवा बाजारात खरेदी  किंवा अन्य कामांसाठी बाहेर जातांना आपल्या शेजारच्यांना योग्य कल्पना द्यावी जेणे करून आपण बाहेरून परत येईपर्यंत आपले शेजारी आपल्या घराकडे योग्यप्रकारे लक्ष ठेवू शकतील.
      बाहेरगावी जातांना आपल्याकडील मौल्यवान वस्तु व रोख रक्कम घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी  तसेच आपल्या शेजारी व परिसरातील बंद घरांमध्ये काही संशियत हालचाली आढळल्यास त्वरीत जवळच्या पेालीस चौकीशी किंवा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी चांगल्या दर्जाचे कडी कोंडे व कुलूपांचा वापर करावा, बाहेर जातांना दारे ,खिडक्या व्यवस्थित बंद केल्याची खात्री करूनच घरा बाहेर पडावे. घराच्या परिसरात रात्रीच्या वेळेस चांगला प्रकाश राहील असे दिवे वापरावेत.
      नेहमी बाहेर किंवा बाहेर गावी जातेवेळी  शेजा-यांना घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करावी तथापि शेजा-यांना आपण बाहेर गावी जात असल्याची कल्पना देत असताना आजूबाजूला अनोळखी वा संशियत व्यक्ती नाही याची प्रथम खात्री करून घ्यावी.
घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी
            शहरातील बहुतांश घरमालक हे आपली वास्तु भाडेतत्वार देत असतात. मात्र अशा भाडेकरुंची माहिती ही नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक असुनही त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळते. यासाठी शहरातील सर्व घरमालकांनी आपल्या भाडेकरुंची माहिती विहीत नमुन्यात त्यांच्या छायाचित्रांसह नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.
            नागरिकांनी अशा स्वरूपाची दक्षता घेऊन सतर्कता बाळगल्यास चो-या व अनुचीत प्रकार रोखण्यास नक्कीच मदत होईल असे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

चाळीसगाव पंचायत समिती आरक्षण सोडत 5 ऑक्टोंबर रोजी

चाळीसगाव पंचायत समिती आरक्षण सोडत 5 ऑक्टोंबर रोजी
             
चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या 18 ऑगस्ट आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्तांकडील 28 सप्टेंबर 2016 च्या आदेशान्वये जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणामधील नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील/सर्वसाधारण प्रवर्गातील) आरक्षणाची सोडत संबंधित तालुक्यांच्या मुख्यालयी   काढण्यात येणार आहे.
       चाळीसगाव पंचायत समितीचे आरक्षण सोडत नगरपालीका सभागृह, चाळीसगाव येथे बुधवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित केलेली आहे. आरक्षण सोडत चाळीसगाव महसूल उप विभागाचे उप विभागीय अधिकारी शरद भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीस प्रारंभ
             
चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) :  भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पदवीधर मतदार संघाची मतदार यादी अद्यावत करण्याचे निर्देश असल्याने तालुक्यात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आता 1 नोव्हेंबर,2016 या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. सन 2010 च्या मतदार यादीत तसेच गेल्या वर्षी ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2015 मध्ये विशेष मोहिमेत नाव नोंदणी केलेल्या मतदारांना आता नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीच्या कार्यक्रमात प्रथम शनिवार दिनांक 1 ऑक्टोंबर, 2016 विभागीय आयुक्त यांचे कडून सूचना प्रसिध्द करण्यात आली असून शनिवार दिनांक 15 ऑक्टोंबर, 2016  रोजी जाहीर सुचनेची पहिली पुर्नप्रसिध्दी, मंगळवार दिनांक 25 ऑक्टोंबर2016 जाहीर सुचनेची दुसरी पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार आहे. तर शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज क्रमांक 18 स्वीकारण्याची अंतीम मुदत देण्यात आली आहे.  शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2016 मतदार संघाची प्रत तयार करुन प्रारूप मतदार यादी छपाई करण्यात येईल. बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येईल.  23 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2016 या कालावधीत दावे व हरकती दाखल करणे, सोमवार दिनांक 26 डिसेंबर,2016 दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येईल.  तर शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर,2016 रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येईल.
मतदार नोंदणीसाठीचे फॉर्म सर्व संबंधित कार्यालयांकडे उपलब्ध असून www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन Downoad  Forms  या लिंकवरही उपलब्ध आहेत. मतदार नोंदणी अर्ज उप विभागीय कार्यालये, तहसिल कार्यालय तसेच मंडळ अधिकारी कार्यालयात स्विकृत करण्यात येणार असून या मतदार नोंदणी कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन प्रातांधिकारी शरद पवार व तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.

* * * * * * * *

भास्कराचार्य गणित नगरीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा : विभागीय आयुक्त एकनाथ डवले


भास्कराचार्य गणित नगरीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा
                                              : विभागीय आयुक्त एकनाथ डवले
       चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे भास्कराचार्यांच्या नावाने जागतिक दर्जाची गणित नगरी उभारण्यासाठी वनविभागासह शिक्षण व सार्वजानिक बांधकाम विभागांनी तांत्रीक बाबींचा सखोल अभ्यास करुन सर्वसमावेशक आराखडा व अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सुचना नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या.
            पाटणादेवी येथील भास्कराचार्य गणित नगरीच्या स्थळ निरीक्षणप्रसंगी वन विभागाच्या विश्रामगृहात आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, मुख्य वनसंरक्षक धुळे उदय आवसक (भा.व.से.), विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरगाबाद श्री.धामगे, सहाय्यक वन संरक्षक (वन्यजीव) औरंगाबाद श्री.जगत, उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, अधिक्षक अभियंता (सा.बा.) श्री.पांढरे, प्रांताधिकारी शरद भगवान पवार, तहसिलदार कैलास देवरे, प्रा.लक्ष्मीकांत पाठक, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी पाटणा एल.एम.राठोड यांच्यासह भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, सार्वजानिक बांधकाम, महावितरण, शिक्षणाधिकारी माध्यमिक आदि  विभागांचे प्रमुख या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            तालुक्याचे गतवैभव आणि वारसा जतन करण्याबरोबरच भास्कराचार्य गणित नगरी साकारतांना पर्यावरणाच्या पोषकतेसह वन्यजीवाला हानी पोहचणार नाही याची दक्षता घेऊन आराखडा तयार केल्यास या जागतिक दर्जाच्या गणित नगरीमुळे पर्यटन विकासालाही गती मिळू शकेल. यासाठी सर्व विभागप्रमुखांनी समन्वयासह सकारात्मक विचाराने सर्वसमावेशक आराखडा तयार करुन येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पाटणादेवी परिसराची ओळख गणिताची ज्ञानार्जन भूमी म्हणून व्हावी : आमदार उन्मेश पाटील
इ.स. 1114 ते 1185 या कालखंडात भास्कराचार्यांनी अंकगणित, बीजगणित, त्रिकोणमिती, खगोलशास्त्र, नक्षत्रशास्त्र आदि ज्ञानशाखांमध्ये बहुमोल योगदान दिले म्हणून त्यांना गणितसूर्य भास्कराचार्य असे संबोधले जाते. अशा या गणिती भास्कराचार्यांनी या परिसरात केलेल्या या महान कार्यामुळे पाटणादेवी परिसराची ओळख गणिताची ज्ञानार्जन भूमी म्हणून सर्वसामान्यांना व्हावी.  गणित विषयाची भिती नष्ट होऊन अद्यावत आणि जागतिक दर्जाच्या भास्कराचार्य मॅथ सिटीमुळे भावी पिढीला गणिताबद्दल आकर्षण, गणिताचे हसत-खेळत शिक्षण आणि संशोधन करण्यास मोठा हातभार लागू शकेल असा विश्वासही आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
            यावेळी आमदार उन्मेश पाटील यांनी तयार केलेल्या गणित नगरीवर आधारित चित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले तर प्रा.ल.वी.पाठक, राजेश ठोंबरे व पाटण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड यांनी परिसराची सखोल माहिती आयुक्त श्री.डवले यांना सादर केली.
* * * * * * *